भाग - ३ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग - ३ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

११ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हैहयाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की, आपल्या सेनेतील सैनिक, त्यांचे धनुष्य-बाण, ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वत: त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन धडकला. त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणाऱ्यांत अग्रगण्य होते. त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले. आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार, तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले. त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले. वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले.

            शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली. ती अत्यंत दुःखी होती. त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहिष्मती नगरीत आपण जे काही केले, ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले. ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले. "महावीरा परशुरामा ! तू मोठेच पाप केलेस. कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास ! पुत्रा ! आपण ब्राह्मण आहोत ! क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत. एवढेच काय, सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत. क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात.

            पुत्रा ! सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे.जा ! भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुऊन टाक."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः बिछान्यावर उर्वशी नाही, असे पाहून राजा खिन्न झाला. त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते. तो तिच्यासाठी शोकविहृल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुक मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले. "प्रिये ! थांब, थांब. हे निष्ठुरे ! निदान आज तरी मला सुखी केल्यावाचून तू जाऊ नकोस. ये. आपण दोघे काही वार्तालाप करू. देवी ! आता या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला नाही, म्हणून तू याला आता लांब फेकून दिले आहेस. म्हणून माझे हे सुंदर शरीर आता येथे पडेल आणि लांडगे व गिधाडे यांना खाऊन टाकतील."

            उर्वशी म्हणाली- "तू पुरुष आहेस. असा मरू नकोस. या लांडग्यांनी तुला खाऊ नये. स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते. स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे ह्रदय अगदी एकसारखे असते. स्त्रिया निर्दय, क्रूर, असहनशील आणि धाडसी कामे आवडणाऱ्या असतात. थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करुन आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात. सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते. भोळ्याभाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने कुलटा आणि स्वैर बनतात. हे राजा, प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहाशील. तेव्हा तुला आणखीही मुले होतील. "

            उर्वशी गर्भवती आहे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला. एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला. तोपर्यंत उर्वशी एका वीर-पुत्राची माता झाली होती. उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला. पुन्हा विरहदुःखाने अत्यंत दिन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली. "तू या गंधर्वाची स्तुती कर. हे मला तुझ्याकडे सोपवतील. "तेव्हा पुरूरव्याने गंधर्वाची स्तुती केली. परीक्षिता ! पुरूरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. ही उर्वशी आहे, असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसर्‍या वनात फिरू लागला.

            जेव्हा तो सावध झाला, तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले, तेव्हा त्याच्या हृदयात तीन्ही वेद प्रगट झाले. नंतर जेथे त्याने अग्नीपात्र टाकले होते, तेथे तो गेला. आता त्या ठिकाणी शमीवृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता, तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या. नंतर त्याने उर्वशीलोकांची प्राप्ती व्हावी, या इच्छेने खालील अरणीला उर्वशी, वरच्या अरणीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्र्यांनी मंथन केले. त्या मंथनामुळे 'जातवेदा' नावाचा अग्नी प्रगट झाला. राजा पुराव्याने अग्नीदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरूरव्याने त्या तीन अग्नींच्या द्वारे सर्वदेवस्वरूप, इंद्रियातीत, यज्ञपती भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला.

            त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ॐकार हाच वेद होता. सर्व वेद-शास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती. देव फक्त नारायणच होता. आणखी कोणी नव्हते. अग्नी एकच होता आणि 'हंस' हा एकच वर्ण होता.
परीक्षिता ! त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरूरव्यापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला. पुराव्याने अग्नीचा संतानरूपाने स्वीकार करून गंधर्वलोकांची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते ? तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्यानिवासी प्रजाजन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत ?

            श्रीशुक म्हणतात - त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः निजजनांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तीच्या मदरसाने भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की, ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सभाग्रहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्णकलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांसह सुपारीचे घोष, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरसे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगल चित्रांनी आणि पाना-फुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करित की, "महाराज ! पूर्वी आपणास वराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता. आता आपण तिचे पालन करावे. " पुष्कळ वर्षानंतर महाराज आलेले कळले, तेव्हा सर्व स्त्रि-पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन पाहात पाहात त्यांच्यावर भगवंतांना फुलांचा वर्षाव करीत.

            अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पुर्वज राजे राहात असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते की ज्यातील संपत्ती कधी संपत नसे. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळशा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबराची दारे पोवळ्यांनी मडविलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरश्या होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगी-बेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोगसामग्री, सुगंधी धूप, दीप, तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महान अतिशय सजविलेले होते. अलंकार यांनी ते महाल अतिशय सजविलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री-पुरुष तेथे राहात कसत. आत्माराम जितेंद्रय पुरुषांत अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्नी श्रीसीतादेवींसह आनंदात राहात असत. सर्व स्त्री-पुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ-काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला. जेव्हा मोठ-मोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत, तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठ-मोठे शिलाखंड थरथर कापत असत. यानंतर भगवंतांनी बिभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव,नील, हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानरसेनेच्या बरोबर लंकेत प्रवेश केला. हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती. त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याची ठिकाणे, खेळाची मैदाने, धान्याची गोदामे, खजिने, दरवाजे, फटाके, सभागृहे, सज्जे आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली. त्यांनी तेथील आसने,ध्वज, सोन्याचे कळस आणि चौक तोडून-फोडून टाकले. हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे. हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती, पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले. राक्षसांची ती विशाल सेना तलवारी, त्रिशूळ, धनुष्ये, प्रास, ऋष्टी, शक्ती, बाण, भाले, खड्गे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळें अजिंक्य होती. भगवान श्रीरामांनी सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, गंधमादन, नील,अंगद, जांबवान, पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला. श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती, राक्षसांच्या हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष, पर्वतशिखरे, गदा आणि बाणांनी मारू लागले. वास्तविक श्रीसीतादेवीना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते, त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते.

            राक्षसराज रावणाने जेव्हा पाहिले की, आपली सेना नष्ट होऊ लागली आहे, तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून, श्रीरामांच्यावर चालून आला. त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला. श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले, तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला. श्रीराम त्याला म्हणाले, "नीच राक्षसा ! कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस. तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल ? ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्वसंपन्नसुद्धा टाळू शकत नाही, त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो. " अशा प्रकारे रावणाची निर्भर्त्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदार्ण केले. जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातुन खाली पडतात, त्याप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला. त्यावेळी त्याचे बांधव "हाय हाय" करून ओरडू लागले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - ३

श्री गणेशाय नमः बारा वर्षांनंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने त्यांना अडविले. कारण तिला त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वैशिष्ठांनी मदयन्तीच्या ठिकाणी गर्भाधान केले. मदयंतीने सात वर्षंपर्यंत गर्भ धारण केला. परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्मा (दगडा) च्या आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याचे 'अश्मक' नाव ठेवले. अश्मकापासून मुलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला नि:क्षत्रिय करीत होते, तेव्हा स्त्रियांनी याला लपून ठेवले होते. म्हणून त्याचे एक नाव 'नारीकवच' असे पडले. त्याला मूलक यासाठी म्हणतात की, पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवृर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ. दशरथाचा ऐडविड आणि ऐडविडाचा विश्वसह. विश्वसहाचा पुत्रच चक्रवर्ती खट्वांग झाला. युद्धामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला होता. देवतांकडून त्याला जेव्हा समजले कि, आपले आयुष्य फक्त दोन घटकाच शिल्लक आहे. तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंतांचे ठिकाणी स्थिर केले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की, "माझ्या कुलाची इष्ट देवता ब्रह्मण आहे. त्यांच्यापेक्षा अधिक माझे माझ्या प्राणावरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्याइतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझे मन अधर्माकडे कधी गेले नाही. पवित्रकीर्ती भगवंतांच्या व्यतिरिक्त मी आणखी कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही.तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितले. परंतु मी त्या भोगांची अजिबात लालसा धरली नाही; कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो होतो. ज्या देवतांची इंद्रिये आणि मने विषयांमध्ये भटकत असतात, त्या देवता सत्वगुणप्रधान असूनसुद्धा आपल्या हृदयात विराजमान, सदैव प्रियतमाच्या रूपाने राहाणाऱ्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाहीत. तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, ते कसे जाणू शकतील ? ईश्वराच्या मायेचा खेळ असणाऱ्या, गंधर्वनगरांसारख्या या विषयांना मी सोडून देत आहे. कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणाऱ्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांनाच शरण जात आहे. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता, त्याचा त्याग केला आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला.ते स्वरुप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सुन्यासमानच आहे. परंतु ते शून्य नाही, परम सत्य आहे. भक्तजन त्यास वस्तूचे "भगवान वासुदेव" या नावाने वर्णन करतात.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अंत:पुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौभरी मुनींना नेऊन सोडले. तेव्हा त्या पन्नासही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आशक्त झाले की, त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, " हे तुला योग्य नाही, मलाच योग्य आहेत. " ऋग्वेदी सौभरींनी त्या सर्वांचे पाणिग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामुग्रींनी सुसज्य अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसेच सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, असने, वस्त्रे, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तमोउत्तम वस्त्रे, अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्रि-पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत. कुठे पक्षी चिवचिवाट करीत, तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत. काही ठिकाणी भाट त्यांच्या किर्तीची प्रशंसा करीत असत. सात द्विपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता, सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्र्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम या संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशाप्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थसुखात रममाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबानी आग तृप्त होत नाही, त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत.

            ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशारीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्वसुद्धा घालवून बसलो. ते पुढे विचार करू लागले - " अरे ! मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो. माझे झालेले हे अध:पतन तर पहा ! मी दीर्घकालपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत. एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतांमध्येच लावावे. संगतीच जर करावयाची असेल, तर भगवंतांच्या अनन्नप्रेमी निष्ठावान महात्म्यांशीच करावी. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यातील माशांचा संग झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि पुन्हा संतानांच्या रूपाने पाच हजार झालो. विषयांमध्ये सत्वबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझे मन इतक्या विविध लालसांनी भरले आहे की, त्यांना अंतच नाही. अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीलाच सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परम संयमी सौभरींनी तेथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नीसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्निमध्ये लीन होऊन जातात, त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - १
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

१२ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - ३

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राज्याच्या गुणांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले. दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला. इतके दिवसपर्यंत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊनच राहिला.

            जेव्हा दुर्वास निघून गेले, तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले. आपल्यामुळे दुर्वासांना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली. या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊनही त्यांनी तो भगवंतांचाच महिमा मानला. अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रह्म परमात्मा श्रीभगवंतांविषयी भक्ती वाढवित होता. त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते.

            त्यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वत: वनात निघून गेला. तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला. महाराज अंबरीषाचे हे परम पवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो, तो भगवंतांचा भक्त होतो.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ३

श्री गणेशाय नमः त्यांना पाहाताच राजा उठून उभा राहीला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वासमुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार-विनिमय केला.तो म्हणाला," ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही, असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो." असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहात राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे, हे ओळखले. त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले. "राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा ! हा कसला विष्णुभक्त ! मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. तो प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायाच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहुन एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूत्कारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दूर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे, असे पाहिले, तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्यामागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले, तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वासमुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा तर ते अधिकच घाबरले आता शोधत ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा.
            ब्रह्मदेव म्हणाले - दोन परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरुप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील, त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरु आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. असे अग्नीमध्ये तापविल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तीमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा अंधळा अंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रयांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे. अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररुपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्‍या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्‍या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला 'मत्स्यपुराण' म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हायव्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रीस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात
घेऊन केला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ३

श्री गणेशाय नमःविंध्यावली म्हणाली - प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत, तेच स्वतःला याचा स्वामी माणतात. आपणच याचे उत्त्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वत:ला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार ? ( असल्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊल ठेवण्याकरता तुमच्‍याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो, हे बलीचे म्हणणे निर्लज्जपणाचे आहे.)
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशू, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंत:करण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंजऱ्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्ण, वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्ष:स्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्ष:स्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरूण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हस्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले.
परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांच्यामध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ड्धनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहीत सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्नजडित कमरपट्ट्यसह पितांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी असे म्हटल्यावर बळीराजाला हसू आले. तो म्हणाला, "ठीक आहे. तुझी इच्छा असेल, तेवढेच घे." असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्यांनी झारी हातात घेतली. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्वकाही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले.
शुक्राचार्य म्हणाले- विरोचनकुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. आपले सर्वस्व जाईल, हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचाऱ्याचे रूप घेतले आहे. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि किर्ती, तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहेत. तीन पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मुर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल; कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. जे दान दिल्यानंतर जीवननिर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाहीत. ज्यांचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो, तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी, अशा पाच कारणांसाठी विभागतो, तोच इह-परलोकी सुख मिळवितो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो, ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे, हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फुल, फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फुल, फळ कसे राहणार? असते हेच शरीररुपी वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तत्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. "हां, मी देईन" हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव, जो पुरुष "हां, मी देईन" असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. तो मागणाऱ्याला सर्वकाही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. याच्या उलट, "मी देणार नाही" हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. स्त्रियांना वश करण्यासाठी, हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राण संकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - ३

श्री गणेशाय नमः भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मणभोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसापर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मणभोजन घालावे.
            फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहानमोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या कडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृतस्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने, त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गाई इत्यादी दान करून संतुष्ट करावे. हीसुद्धा भगवंतांचीच आराधना होय.प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा घ्यावी. तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दीनदुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न-वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले, असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत्कथा यांच्यायोग्य भगवंतांचे पूजन करावे.
ही भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव "पयोव्रत" असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते. तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवंती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून, शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे; म्हणून याचे नाव 'सर्वयज्ञ' आणि 'सर्वव्रत' असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात, तेच खरे नियम होत. तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपच्श्रर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तु या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वत:ला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. शंकरसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तिणीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने, उपवने. तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आच्श्रर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? भगवंतांनी पाहिले की,भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरूषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरुपी मायेने पूर्णपणे मोहीत होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहीत करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांच्या निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरुपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. " देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तु पाहिलीस ना ? मी सर्व कालांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद त्यांचे वर्णन करू शकत नाहीत.
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परिक्षिता, ज्यांनी समुद्र-मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र-मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, " हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. " ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. म्हणून इंद्राने सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली. गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसऱ्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले.
नारद म्हणाले - दिवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा.
श्रीशुक म्हणतात - देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणाऱ्या बलीला पराजित होउनसुद्धा खेद झाला नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करत होता. बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरून हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपराजिताशी, अश्‍विनीकुमार वर्षपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले. राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमाबरोबर वायुचे युद्ध झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता, जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्नीदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्षाची कामदेवाशी,उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची ब्रहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्र्चराशी लढाई होऊ लागली.निवातकवचांच्या बरोबर मृरुद़णांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला.
अशा प्रकारे असूर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि समुहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशू, तलवारी,मुद्गल,आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती कि, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढायचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रकट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - ३

श्री गणेशाय नमः यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारूणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातुन एक अत्यंत अलौकीक पुरुष प्रकट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्नकुंडले होती. रुद्र छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशांशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक 'धन्वंतरी' या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दिनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, " देवांनो" ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो."
परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरु झाले. सर्वजण म्हणू लागले, " मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही. " हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. " एवढ्यात सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भीती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायांतील नूपुर रुणझुण रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात. हे गिरीशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रीपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहातात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहाता. म्हणून जे लोक आपल्याला असक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठूर आहात असे म्हणतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादीकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगाण केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणिमात्रांचे सुहृद भगवान शंकर करूणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले.
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पाहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या शरण अभंग प्राण्यांना सज्जन दुसऱ्याच्या प्राण्याचे क्षणभंगुर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो.
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून विष पिण्याची तयारी केली.देवांना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वत:च ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे.
सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप,अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - ३

श्री गणेशाय नमः स्वत: उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज,अंडज, स्वेदज, आणि उद्धिज्ज, असे चार प्रकारचे प्राणी राहातात. ते परम स्वतंत्र परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवोत. हे परम शक्तिशाली पाणी त्यांचे वीर्य आहे. यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. ते परम ऐश्वर्यशाली परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवो. श्रुती सांगतात देवांचे अन्न,बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे. तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृध्दि करणारा आहे. अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होवोत. सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुक आहे. यज्ञ-यागादी कर्मकांडासाठी याचा जन्म झाला आहे. हा अग्नीच शरीरात जठराग्निरूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न, पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्याच्या द्वारे जीव देवयानमार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो, जो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे, जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे, असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक, शरीरिक आणि इंद्रियसंबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे. ते चक्रवर्ती सम्राट आहेत, तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत, असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या कानापासून दिशा, हृदयापासून इंद्रियगोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे, जे प्राण, इंद्रिये, मन, उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या बलापासुन इंद्र, प्रसन्नतेपासून सर्व देवगन, क्रोधापासून शंकर, बुद्धीपासून ब्रह्मदेव, इंद्रयांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या वक्ष:स्थळापासून लक्ष्मी, सावलीपासून पितृगण, स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रकट झाल्या आहेत. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय, वैश्य हे जांघा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती, नाकापासून कांती, स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम, भुवयांपासून यम आणि डोळ्याच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. शास्त्र असे सांगते की, पंचमहाभूते, काल, कर्म, स्वत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत, जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान 'नेति नेति' शब्दांनी ज्यांचे वर्णन करतात, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ते मातेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृतीमध्ये आसक्त होत नाहीत, जे वायूप्रमाणे समान व असंग असतात, ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत, त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत.
प्रभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो. तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हांस दाखवावे.प्रभो, आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हांला कठीण असणारी कामे सहज करता. विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत, त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते, किंवा मिळतही नाही. परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात,ती मात्र आनंददायक आणि सफल असतात. भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही. कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहेत. झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणे होय. त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याचीसुद्धा आराधना होय. ज्यांच्या लीलांचे रहस्य तार्काच्या पलीकडचे आहे, जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहूनसुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत, तसेच सध्या सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत, अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तिसरा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी,मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असूर नाही, मनुष्य किंवा पशु-पक्षी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही, तो गुण नाही, कर्म नाही, कार्य नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहाते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे.जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामुग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रम्ह परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योग्याच्या द्वारे कर्म, कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपांमध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो, आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंतांना मी शरण आलो आहे.
श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहीत भगवंताची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रुपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वत: प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्रला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्वुरो, भगवान, आपणास नमस्कार असो. "गजेंद्रला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्रला सोडविले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...