अध्याय तिसरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय तिसरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय तिसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात- नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते, आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे शुभ होते, (त्यावेळी भगवान प्रगट झाले.)
            त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या, नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, सरोवरांमध्ये कमळे उमलली होती, वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या, त्यांवर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते, पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहात होता, ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले.
            असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली, तेव्हा स्वर्गामध्ये दैवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया आप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सोम्य गर्जना करू लागले. जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र ! सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णु देवरुपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा, तसे प्रगट झाले.
            वसुदेवांनी पाहिले की, त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरुळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता. पुत्राच्या रूपाने स्वत: भगवंतच आले आहेत, असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला, या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याचवेळी ब्राह्मणांना दहा हजार गाई दान देण्याचा संकल्प केला. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले.

आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरूषोत्तम आहात, हे मी जाणले. आपण केवलस्वरूप अनुभवगम्य व आनंदस्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. आपणच स्वर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच आसूनही नव्याने प्रविष्ट झालात, असे वाटते. जोपर्यंत महत्तत्त्व इत्यादी कारणतत्त्वे वेगवेगळी असतात, तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते, पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादी सोळा विकारांशी एकरूप होतात, तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यांत ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते. परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत. कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे, तीमध्ये ती अगोदरपासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता, तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही. कारण आपण सर्व काही आहात, सर्वांच्या अंतर्यामी आणि आत्मस्वरुप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही. म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत. तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल ? जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो, तो अज्ञानी होय; कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वाग्विलासाखेरीज दुसरे काहीही नाही, हे सिद्ध होते. विचारांतून ज्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही, परंतु जी बाधित होते, तिला खरे समजनारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल ? हे प्रभो ! आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात, असे म्हणतात. ही गोष्ट सर्वसत्ताधीश परब्रह्य अशा आपल्याशी विसंगत नाही. कारण तीन्ही गुणांचे आश्रय आपणच आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो. आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्त्वमय शुक्लवर्ण (पोषणकारी विष्णूरूप) धारण करता, उत्पत्तीसाठी रज:प्रधान रक्तवर्ण (सृजनकारी ब्रह्मरूप) आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रधान कृष्णवर्ण (संहारकारी रुद्ररूप) यांचा स्वीकार करता. प्रभो ! आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या आधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. हे देवाधिदेवा ! दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्याचे दूत, तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आताच्या आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल.
            श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! इकडे देवकीने पाहिले की, आपल्या पत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली. परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली.

देवकी म्हणाली - प्रभो ! वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म, ज्योति:स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिर्वचनीय, निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते, बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू, आपण स्वतः आहात ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य-दोन परार्ध वर्षे-समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात, पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात, कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते, त्यावेळी एकमेव आपणच शेष (शिल्लक) राहता. म्हणूनच आपले नाव "शेष" असेही आहे. हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो ! निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागांत विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्वशक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. प्रभो ! हा जीव मृत्यूरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे. परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेत आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. प्रभो ! आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात; म्हणून आपण भ्यालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणार्‍या माणसांसमोर हे प्रगट करू नका. हे मधुसुधना ! तुझा जन्म माझ्यापासून झाला, ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे. हे विश्‍वात्मक ! आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. जसे एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परम पुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात, ही आपली अद्भुत मनुष्यलिलाच नाही का ?
            श्रीभगवान म्हणाले- हे माते ! स्वायंभुव मन्वन्तरामध्ये पूर्वजन्मी तू पृश्नी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. तुम्ही पाऊस, वारा,ऊन, थंडी, उन्हाळा इत्यादी त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुऊन टाकले. तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिलात. माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत. माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्षें निघून गेली. हे पुण्यमयी देवी ! त्या वेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो; कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते. त्या वेळी तुम्हा दोघांची अभिलाशा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो आणि 'वर मागा' म्हणतात तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. त्या वेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता. तुम्हांला संततीही नव्हती. म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हांला प्राप्त झाला आणि मी तिथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले.

या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य कुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी 'पृश्निगर्भ' या नावाने प्रख्यात झालो. नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्या वेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझे नाव उपेन्द्र होते. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत. हे माते ! तुमच्या या तिसऱ्या जन्मातसुद्धा मी त्याच रुपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो. माझे वचन नेहमी सत्य असते.
            मी तुम्हांला माझे हे रुप यासाठी दाखविले की, तुम्हांला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे. मी जर असे केले नसते. तर केवळ मनुष्यशरीरावरून माझा अवतार ओळखू आला नसता. तुम्ही दोघांनी माझा अवतार ओळखू आला नसता. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा. अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हांला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल.
            श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता-पिता (त्यांच्याकडे) पाहात असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले. तेव्हा वसुदेवांनी भगवंतांच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सूतिकाग्रहाच्या बाहेर निघावे, असे ठरविले. त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली. त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रयांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाज्यांजवळ पोहोचले, तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे. त्यावेळी ढग हळू-हळू गर्जना करीत वर्षाव करीत होते. म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवित भगवंताच्या पाठोपाठ चालू लागला. त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता, त्यामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. तरीही ज्याप्रमाणे सितापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती, त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली. नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहीले की, सगळे गोप गाढ झोपी गेले आहेत. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपविले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले. कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरूणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. तिकडे नंदपत्नी यशोदेला मुल झाल्याचे समजले. परंतु दमल्यामुळे व योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मुल पुत्र की कन्या हे समजले नाही.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तिसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - मनुपुत्र राजा शर्याती वेदपारंगत होता. त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते. त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती. एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. सुकन्या आपल्या मैत्रिणीसह वनात फिरत-फिरत झाडांचे सौंदर्य पाहात होती. तिने एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या. दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले. त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले. त्याचवेळी राजा शर्यातीच्या सैनिकांचे मल-मूत्र थांबले. हे पाहून शर्यातीला अत्यंत आश्चर्य वाटले. तो आपल्या सैनिकांना म्हणाला. "अरे ! तुम्ही महर्षी च्यवनांच्याबाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना ? आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे. " तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली, " माझ्याकडूनच काही चूक घडली आहे. अजाणतेपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे. " आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला. त्याने स्तुती करून वारुळात असलेल्या च्यवन-मुनींना कसेबसे शांत केले. त्यानंतर च्यवन-मुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला.
            इकडे सुकन्या अतिशय रागीट च्यवनमुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेच वागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करू लागली. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनीकुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचे यथोचित्त स्वागत करून म्हटले, " आपण दोघेजण समर्थ आहात; म्हणून मला तारुण्यावस्था प्रधान करा. तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या. आपण सोमपान करण्याचे अधिकार नाहीत, हे मी जाणतो. तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देईन. " वैद्यशिरोमणी अश्विनीकुमारांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद देऊन म्हटले, " ठीक आहे. " आणि त्यांना सांगितले की " हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे. आपण याच्यामध्ये स्नान करावे. "च्यवन मुनींचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या. सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते. आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनीकुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला. नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले. त्या तिघांच्याही गळ्यांत कमळांच्या माळा, कानांत कुंडले होती. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. तिघेही एकसारखे दिसत होते. ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील, असे होते. साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सुर्यासारखे तेजस्वी आहेत, असे पाहिले, तेव्हा त्यांतून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनीकुमारांना शरण गेली. तिचे पातिव्रत्य पाहून अश्विनीकुमार संतुष्ट झाले. त्यांनी तिला तिचा पती दाखविला आणि नंतर च्यवन मुनींची आज्ञा घेऊन विमानातून ते स्वर्गाकडे गेले.

            एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरता शर्याती च्ववन मुनींच्या आश्रमात आला. तेथे त्याने पाहिले की, आपल्या सुकन्याजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे. सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले. शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले, " कुलटे ! हे तू काय केलेस ? सर्वांना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलेस ! तू त्यांना म्हातारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस. तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता. ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली ? तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे. तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस ! " राजा शर्यातीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले, " बाबा ! हे आपले जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत." यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून शर्याती आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले.
            महर्षी च्यवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसूनसुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनीकुमारांना सोमपान करविले. शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले. महर्षी च्यवनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला. तेव्हा सर्व देवांनी अश्विनीकुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले. वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनीकुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते.
परीक्षिता ! शर्यातीला उत्तानबर्ही, आनर्थ आणि भूरिषेण असे तीन पुत्र होते. आनर्तापासून रेवत झाला. महाराज ! रेवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी वसविली होती. तेथेच राहून तो आनर्त इत्यादी देशांवर राज्य करीत होता. त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकांमध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव हसून त्याला म्हणाले.
            राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक नाहीत. मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. राजा ! त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर. ज्यांचे नाम, लीला इत्यादींचे श्रवण- किर्तन अतिशय पवित्र आहे, तेच प्राण्यांचे जीवनसर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत.ककुद्मीने ब्रह्मदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला. यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते. ककुद्मीने आपली सर्वांगसुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या बद्रीकाआश्रमाकडे निघून गेला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तिसरा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी,मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असूर नाही, मनुष्य किंवा पशु-पक्षी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही, तो गुण नाही, कर्म नाही, कार्य नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहाते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे.जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामुग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रम्ह परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योग्याच्या द्वारे कर्म, कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपांमध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो, आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंतांना मी शरण आलो आहे.
श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहीत भगवंताची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रुपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वत: प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्रला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्वुरो, भगवान, आपणास नमस्कार असो. "गजेंद्रला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्रला सोडविले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तिसरा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंतांची स्तुती करू लागला.
गजेंद्र म्हणाला - जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञरूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतनस्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रतीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे, हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही; परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्र्वांना पाहातात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यावेळी लोक, लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहातो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. जे नटाप्रमाणे अनेक वेश धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, हे प्रभु माझे रक्षण करोत. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे, असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गती होत. ज्यांना जन्म-कर्म नाम-रूप नाही, की ज्यांच्यात गुण-दोष नाहीत. असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात. त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्यसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहेत. माझ्या त्यांना नमस्कार. स्वयंप्रकाश, सर्वांचे साक्षी (अशा) परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...