भाग - ५ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग - ५ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ५

श्री गणेशाय नमः श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भारताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहात होत्या. श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला. आणि प्रजेने श्रीरामांना भक्तीभावाने नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने, आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली. भरताने हातात पादुका घेतल्या. बिभीषणाने उत्कृष्ट चौवऱ्या, सुग्रीवाने पंखा आणि श्रीहनुमंतांनी पांढरे छत्र धरले. परीक्षिता, शत्रुघ्नाने धनुष्य व भाता, सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू, अंगदाने सोन्याचे खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतली. या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले. योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या. भाट स्तुती करू लागले. राजा ! ग्रह-ताऱ्यांनी चंद्र शोभावा, तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते.

            अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या आयोध्यानगरीत प्रवेश केला. त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौशल्या, अन्य माता, गुरुजन, बरोबरीचे मित्र आणि लहान यांच्या यथायोग्य सन्मान केला. तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. श्रीसीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले. प्राण्यांच्या संचाराने मृतशरीरे उठावी, त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसून घेतले आणि नेत्रांतील अश्रुंनी त्यांना अभिषेक केला. त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला. त्यानंतर वसिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधीपूर्वक भगवंतांच्या जटा उतरविल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला, त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्रांच्या पाण्याने व इतर द्रव्यांनी अभिषेक केला. अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे, पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले. सर्व बंधू आणि श्रीजानकीदेवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले. त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते. भारताने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली. तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला. त्यानंतर ते, आपापल्या धर्मामध्ये तत्पर व वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले. त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती. जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले, तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते, परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते. परीक्षिता ! त्यावेळी वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत. इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत. वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय आणि थकवा, नाममात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे, त्यांचा मृत्यूही होत नसे. भगवान श्रीरामांनी एकपत्नीव्रत घेतले होते. त्यांचे चरित्र राजर्षीसारखे पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते. पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुनांनी पतीचे चित्त वेधून घेत असत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ५

श्री गणेशाय नमः श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो, त्याचे धन हिरावून घेतो, कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो, तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो, आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्यशरीर प्राप्त करतो, त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही, तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे, असे समजावे. सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणाऱ्या मला जे शरण येतात, ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पादन करणाऱ्या कारणांमुळे मोहित होत नाहीत. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे अतिशय कठीण आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे, त्यामुळे वर यांनी विजय मिळवला आहे. त्या मायेवर याने विजय मिळविला आहे. तू पाहतच आहेस की, एवढे दुःख भोगूनसुद्धा हा खचला नाही. याचे धन हिरावून घेतले, राजपदावरून याला दूर केले, याची निंदा केली, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भर्त्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो.पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या दैवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही, ते स्थान मी त्याला दिले आहे. सावर्णी मंन्वन्तरामध्ये हा माझा परम भक्त इंद्र होईल. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा,ग्लानी, शत्रूकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह, स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात, त्या सुतल लोकात जा. मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत. मग इतरांची काय कथा ! जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील, त्यांचा माझे चक्र नाश करील. तुझे, तुझ्या अनुयायांचे आणि (तुझ्या) भोगसामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीर बली, तु मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहाशील. दानव आणि दैत्यांच्या संसार्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल, तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ५

श्री गणेशाय नमः जे विवेकी पुरुष सोनुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वेत आणि द्रव्याद्वेत अशा त्रिविध अद्वेताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे 'भावाद्वैत'.(परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) युधिष्ठीरा! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वत: परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे 'क्रियाद्वैत' होय. स्वतः स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, याच प्रकारचा विचार म्हणजे 'दद्रव्याद्वैत' होय.
            युधिष्ठीरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तीकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठीरा, हेच पहा ना! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले.
            पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अत्यंत प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलाचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह(वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हे आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शुध्द जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवासुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने ग्रहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो.
            या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रम्ह मनुष्यरूपात गुप्तरुपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहीत, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत!
श्रीशुक म्हणतात- देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली.भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.अशाप्रकारे मी तुला दक्षकन्यांचा वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असूर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...