श्री गणेशाय नमः श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भारताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहात होत्या. श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला. आणि प्रजेने श्रीरामांना भक्तीभावाने नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने, आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली. भरताने हातात पादुका घेतल्या. बिभीषणाने उत्कृष्ट चौवऱ्या, सुग्रीवाने पंखा आणि श्रीहनुमंतांनी पांढरे छत्र धरले. परीक्षिता, शत्रुघ्नाने धनुष्य व भाता, सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू, अंगदाने सोन्याचे खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतली. या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले. योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या. भाट स्तुती करू लागले. राजा ! ग्रह-ताऱ्यांनी चंद्र शोभावा, तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते.
अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या आयोध्यानगरीत प्रवेश केला. त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौशल्या, अन्य माता, गुरुजन, बरोबरीचे मित्र आणि लहान यांच्या यथायोग्य सन्मान केला. तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. श्रीसीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले. प्राण्यांच्या संचाराने मृतशरीरे उठावी, त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसून घेतले आणि नेत्रांतील अश्रुंनी त्यांना अभिषेक केला. त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला. त्यानंतर वसिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधीपूर्वक भगवंतांच्या जटा उतरविल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला, त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्रांच्या पाण्याने व इतर द्रव्यांनी अभिषेक केला. अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे, पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले. सर्व बंधू आणि श्रीजानकीदेवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले. त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते. भारताने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली. तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला. त्यानंतर ते, आपापल्या धर्मामध्ये तत्पर व वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले. त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती. जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले, तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते, परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते. परीक्षिता ! त्यावेळी वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत. इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत. वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय आणि थकवा, नाममात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे, त्यांचा मृत्यूही होत नसे. भगवान श्रीरामांनी एकपत्नीव्रत घेतले होते. त्यांचे चरित्र राजर्षीसारखे पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते. पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुनांनी पतीचे चित्त वेधून घेत असत.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।