अध्याय पंधरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय पंधरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

११ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हैहयाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की, आपल्या सेनेतील सैनिक, त्यांचे धनुष्य-बाण, ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वत: त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन धडकला. त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणाऱ्यांत अग्रगण्य होते. त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले. आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार, तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले. त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले. वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले.

            शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली. ती अत्यंत दुःखी होती. त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहिष्मती नगरीत आपण जे काही केले, ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले. ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले. "महावीरा परशुरामा ! तू मोठेच पाप केलेस. कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास ! पुत्रा ! आपण ब्राह्मण आहोत ! क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत. एवढेच काय, सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत. क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात.

            पुत्रा ! सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे.जा ! भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुऊन टाक."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले- त्यावेळेच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की, ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला ?

            श्रीशुक सांगू लागले - त्यावेळी हैहयवंशाचा अधिपती अर्जुन होता. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारे सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले. तो योगेश्वर झाला होता. आणिमादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे. एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्त्रबाहु अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता. त्या वेळी मदोन्मत्त होऊन सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले, ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही. जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली, तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस्त्याच्या सांगण्यावरून सोडून दिले.

            एके दिवशी सहस्त्रबाहु अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. दैववंशात तो जमदग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला. तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनुच्या प्रतापाने सेना, मंत्री आणि वाहनांसह हैहयाधिपतीचे आतिथ्य केले. जमदग्नी मुनींचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्याने त्यांच्या आदरसत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरविले. त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळेच नेण्याची सेवकांना आज्ञा केली. तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनुला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेले. तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीगत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले. ते आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमानणारा सिंह हत्तीच्या राजाच्या मागे धावतो, त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले.

            अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता, तेवढ्यात त्याने पाहिले की, परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत. त्यांनी हातात धनुष्य-बाण आणि परशु घेतला होता, शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणाप्रमाणे चमकत होत्या. त्यांना पाहाताच त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टी, तोफा, शक्ती इत्यादी अयुधांनी सुसज्ज हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षौहिणी फौज पाठविली. भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता.बस्स ! ते शत्रूच्या सेनेचा निःपात करीत जात होते. जेथे जेथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत तेथे तेथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात, मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०९ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात- परीक्षिता ! उर्वशीपासून आयू, श्रुतायू, सत्यायू,रय, विजय आणि जय असे पुरूरव्याला सहा पुत्र झाले.

            श्रुतायूचा पुत्र वसुमान, सत्यायूचा श्रुतंजय,रयाचा एक आणि जयाचा अमित. विजयाचा भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जहृ होता. ज्याने गंगेला आपल्या ओंजळीत घेऊन पिऊन टाकले, तोच हा जहृ होय. जहृचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा अजक.अजकाचा पुत्र कुश. कुशांबू,तनय,वसू आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते. यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता.

            गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचीक ऋषींनी तिला मागणी घातली. हा वर कन्येसाठी योग्य नाही, असे वाटून गाधी ऋचीकाला म्हणाला.

            "मुनेश्वर ! आम्ही कुशिक आहोत. आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शिल्करुपाने द्या. त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा. " गाधी असे म्हणाला, तेव्हा ऋचीक मुनींना त्याच्या आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला. एकदा महर्षी ऋचीकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महर्षी ऋचीकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघीसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले. सत्यवतीच्या आईला वाटले की, ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल, म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला. तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत: खाल्ला मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले, " तू मोठा अनर्थ केलास ! आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल. " सत्यवतीने ऋचीक मुनींना प्रसन्ना करून प्रार्थना केली की, " असे होऊ नये. " तेव्हा ते म्हणाले- "ठीक आहे. पुत्राऐवजी तुझा नातू तसा होईल. " नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला. सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी 'कौशिकी' नदी झाली. रेणू ऋषींची कन्या रेणुका होती. जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले. जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान परशुराम होते. त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कि, हैहयवंशाचा नाश करण्यासाठी स्वत: भगवंतांनीच हा अशावतार ग्रहण केला होता. त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षेत्रीयहीन केले. क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता, तरीसुद्धा ते क्षेत्रिय दुष्ट, ब्राह्मणांचे द्वेष्टे,रज-तमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते. म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवांगनांच्या केसांच्या अंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहत असते. सोनेरी खिडक्‍यांमधून अगुरूचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो. त्याच मार्गावरून देवांगना ये-जा करतात. मोत्यांच्या झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात. सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात. गच्च्यांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात. मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगणा गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी,टाळ, ऋष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्यदेवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे, दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत. हे दोष ज्यांच्या अंगी असतील तेच तिथे जातात. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंक वाजविला.
बलीने युध्दाची मोठी तयारी केली आहे. हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरू बृहस्पती यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला. भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही, असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे, ते कळत नाही. मला वाटते, यावेळी बलीला कोणीच, कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलयकालच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे.तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील. जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यांतील ज्वालांनी दिशा भस्म करुन टाकील, असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय ? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे की, ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे, ते आपण मला सांगा.
देवगुरु म्हणाले - इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत, तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पाहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करीत, तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला, तेव्हा ते स्वच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर वीरोचनपुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला. तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी शंभर अश्वमेध यज्ञ करविले.त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकांत प्रसिद्ध कीर्ती, दाही दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मणदेवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वत:ला कृत्यकृत्य मानू लागला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर मग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले ? माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळविण्याची इच्छा करणार्‍या बलीला त्यांनी महाभिषेकविधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजीत नावाचा यज्ञ करविला. हविर्द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामुग्री मिळवून त्यांच्याचकरवी स्वस्तिवाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदिक्षणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली, भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून, धनुष्य, तलवार, बाणांचे बाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा, तसा शोभला. त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य,बल आणि सामर्थ्य असणारे दैत्यसेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली.
            अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्षांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळा-फुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगणा तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत. ती मोठमोठे, वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्माने त्या नगरीची निर्मिती केली आहे. संभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी षोडषवर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी देदीप्यमान दिसतो, तशा दिसतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ५

श्री गणेशाय नमः जे विवेकी पुरुष सोनुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वेत आणि द्रव्याद्वेत अशा त्रिविध अद्वेताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे 'भावाद्वैत'.(परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) युधिष्ठीरा! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वत: परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे 'क्रियाद्वैत' होय. स्वतः स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, याच प्रकारचा विचार म्हणजे 'दद्रव्याद्वैत' होय.
            युधिष्ठीरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तीकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठीरा, हेच पहा ना! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले.
            पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अत्यंत प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलाचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह(वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हे आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शुध्द जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवासुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने ग्रहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो.
            या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रम्ह मनुष्यरूपात गुप्तरुपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहीत, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत!
श्रीशुक म्हणतात- देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली.भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.अशाप्रकारे मी तुला दक्षकन्यांचा वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असूर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ४

श्री गणेशाय नमः वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तीपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चतुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्यदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना 'इष्ट' म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पानपोई घालने यांसारखी लोकोपयोगी कामे ही 'पूर्तकर्मे' होत.ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यानंतर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सुक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धुमाभिमानी दैवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सुक्षम देह अनुक्रमे वनस्पती,अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्यांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादीसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्ण समुदायाला 'अ उ म' या तीन स्वरांच्या रूपात राहाणाऱ्या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राण्यामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याहृ, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले 'विश्व' शरीर सुक्ष्मामध्ये विलीन करून सुक्षम उपाधियुक्त 'तैजस' होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक 'प्राज्ञ' होतो. नंतर त्या शरीराचा लय करून 'तुरीय' रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहातो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्राह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही.
            पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारुपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तू़च्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खाऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्याला अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून - सुक्ष्मभुतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवाचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी-निषेधाचे शास्त्र असते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे. राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामदी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्यानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही.
            जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा,कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रत्तांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मुर्खाची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करीत ?
            उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे - शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे.( ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) राग, द्वेष, लोभ,शोक, मोह,भय, मद, मान,अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपाट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद,भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही वेळा सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. हा मनुष्यशरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. अन्यथा, बेसावध जीवाला हे इंद्रियरुप दुष्ठ घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरुप लुटारूंच्या हातात देतील.ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमय संसाराच्या विहिरीत ढकलून देतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीरनिर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता आजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीपरायण पुरूषाची निवृत्ती त्याची उपजीविका चालविते, आत्मसुखात रममाण होणार्‍या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते,जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुठ्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अंध:पतित होतात.
            संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. आध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योगसाधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. आधिभौतिक दु:खाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि अध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्त्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्र्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात.
            शास्त्रामध्ये जितके नेयम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नेयमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत. उलट अनर्थकारक फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपर्च्श्रेमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरुपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योगसाधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणाऱ्यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देते. अन्नसमर्पण करतेवेळी देव, ऋषि, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वत:ला सुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे.
            धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतः ही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहींसिने नाही. ज्या लोकांना सद्धर्मपानाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांची हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशूपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या, मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे.
            विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत.अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा. धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो 'विधर्म' होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म 'परधर्म' होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे 'उपधर्म' किंवा 'उपमा' होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा 'छल' होय. आपल्या आश्रमाहुन वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो 'आभास' होय. आपल्याला स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...