श्री गणेशाय नमः हैहयाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की, आपल्या सेनेतील सैनिक, त्यांचे धनुष्य-बाण, ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वत: त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन धडकला. त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणाऱ्यांत अग्रगण्य होते. त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले. आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार, तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले. त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले. वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले.
शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली. ती अत्यंत दुःखी होती. त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहिष्मती नगरीत आपण जे काही केले, ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले. ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले. "महावीरा परशुरामा ! तू मोठेच पाप केलेस. कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास ! पुत्रा ! आपण ब्राह्मण आहोत ! क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत. एवढेच काय, सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत. क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात.
पुत्रा ! सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे.जा ! भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुऊन टाक."
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।