भाग - २ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग - २ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले- त्यावेळेच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की, ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला ?

            श्रीशुक सांगू लागले - त्यावेळी हैहयवंशाचा अधिपती अर्जुन होता. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारे सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले. तो योगेश्वर झाला होता. आणिमादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे. एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्त्रबाहु अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता. त्या वेळी मदोन्मत्त होऊन सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले, ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही. जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली, तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस्त्याच्या सांगण्यावरून सोडून दिले.

            एके दिवशी सहस्त्रबाहु अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. दैववंशात तो जमदग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला. तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनुच्या प्रतापाने सेना, मंत्री आणि वाहनांसह हैहयाधिपतीचे आतिथ्य केले. जमदग्नी मुनींचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्याने त्यांच्या आदरसत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरविले. त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळेच नेण्याची सेवकांना आज्ञा केली. तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनुला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेले. तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीगत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले. ते आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमानणारा सिंह हत्तीच्या राजाच्या मागे धावतो, त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले.

            अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता, तेवढ्यात त्याने पाहिले की, परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत. त्यांनी हातात धनुष्य-बाण आणि परशु घेतला होता, शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणाप्रमाणे चमकत होत्या. त्यांना पाहाताच त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टी, तोफा, शक्ती इत्यादी अयुधांनी सुसज्ज हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षौहिणी फौज पाठविली. भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता.बस्स ! ते शत्रूच्या सेनेचा निःपात करीत जात होते. जेथे जेथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत तेथे तेथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात, मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरूरवा म्हणाला - हे सुंदरी ! तुझे स्वागत असो. बैस. मी तुझी काय सेवा करू ? तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळापर्यंत चालत राहो.

            उर्वशी म्हणाली - हे सुंदरा ! कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही ? कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही. राजन ! जो पुरुष रूप-गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो, तोच स्त्रियांना हवाहवासा वाटतो. म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन. परंतु महाराज ! मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे. आपण यांचे रक्षण करावे.

            हे वीरशिरोमणी ! मी फक्त तूप खाईन आणि मैथुनाव्यातिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये. मनस्वी पुरुरव्याने "ठीक आहे" असे म्हणून तिची अट मान्य केली. आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला "पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भूत आहे. तुझा भावही अलौकिक आहे. तर मग हे देवी ! स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही ?"

            तो पुरुषश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार करू लागला. उर्वशीच्या शरीरातुन कमलकेसरासारखा सुगंध येत होता. राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंदविहार केला. तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध हरपून जात असे. उर्वशी नाही, असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविले. "उर्वशीखेरीज मला हा स्वर्ग सुना सुना वाटतो, " असे तो म्हणाला. मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते, ते त्यांनी चोरले. पुत्रासमान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले. तेव्हा ती म्हणाली, अरेरे ! स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुसकासारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला. यांच्यावर विश्वास ठेवल्याकारणाने माझा सर्वनाश झाला. लुटारूंनी माझ्या मुलांना पळवून नेले. पहाना ! हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिऊन झोपून राहातो. जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा. त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वागबाणांनी राजाला घायाळ केले. तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला. तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या.राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. (झाली ! ती लगेच त्याला सोडून निघून गेली.)

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता ! जनकाचा उदावसू, त्याचा नंदिवर्धन, नंदीवर्धनाचा सुकेतू, त्याचा देवरात, देवराताचा बृहद्रथ,बृहद्रथाचा महावीर्य, महावीर्याचा सुधृती, सुधृतीचा धृष्टकेतू, धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मुरु नावाचा पुत्र झाला. मरूचा अप्रतीपक, प्रतीपकाचा कृतिरथ, कृतिरथाचा देवमीढ, देवमीढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला. महाधृतीचा कृतीरात, कृतिराताचा महारोमा, महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्गरोमाचा पुत्र झाला हृस्वरोमा. ह्याच हृस्वरोमाचा पुत्र सीरध्वज होता. तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता, तेव्हा त्याच्या सीराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रगट झाली. म्हणून त्याचे नाव "सीरध्वज" असे पडले. सीरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे कृतध्वज आणि मितध्वज असे दोन पुत्र झाले. कृतध्वजाचा केशिध्जव आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला. केशिध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता.

            खांडीक्य कर्मकांड जाणणारा होता. केशिध्वजाला भिऊन तो पळून गेला. केशिध्वजाचा पुत्र भिनुमान आणि भानूमानाचा शतद्युम्न होता. शतम्नापासून शुची, शुचीपासून सनद्वाज, सनद्वाजापासून ऊर्ध्वकेतू, ऊर्ध्वकेतूपासून अज, अजापासून पुरुजित, पुरुजितापासून अरिष्टनेमी, अरिष्टनेमीपासून श्रुतायू, श्रुतायूपासून सुपार्श्वक, सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला. क्षेमधीपासून समरथ, समरथापासून सत्यरथ, सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरूपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला. हा अग्नीचा अंश होता.

            उपगुप्ताचा वस्वनन्त, वस्वनन्ताचा युयुध, युयुधाचा सुभाषण, सुभाषणाचा श्रुत, श्रुताचा जय, जयाचा विजय आणि विजयाचा ऋत नावाचा पुत्र झाला.
            ऋताचा शुनक, शुनकाचा वीतहव्याचा धृती, धृतीचा बहुलाश्व, बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला ‌.
            परीक्षिता ! मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे "मैथिल" म्हणविले जातात. हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असूनसुद्धा सुख दुःख इत्यादी द्वंद्वांपासून मुक्त होते. कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असता त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्नीला म्हणत होता. तू दुष्ट आणि कुलटा आहेस. तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस. स्त्रीलोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही. मूर्ख लोकांना खूष ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिऊन सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मीकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मीकींनी त्यांचे जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश व लव अशी नावे ठेवली. परीक्षिता ! लक्ष्मणाला अगंद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भारतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते. तसेच शत्रूघ्नालाही दोन पुत्र झाले - सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला. त्याने त्यांची सर्व संपत्ती म्हणून ती श्रीरामाकडे सोपविली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधुचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसविली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकीच्या हाती सोपविले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धीपुर:सर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त, विषयी पुरुषांच्यासबंधी काय सांगावे ?

            यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचार्य धारण करून तेरा हजार वर्षेपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले.

            भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ कसा असू शकेल ? देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नाव्हे की, त्यांनी शास्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहाता, शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे साहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती ? ही सर्व त्यांची लीलाच आहे.

            ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीसुद्धा आज उजळ करते, मोठ-मोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट जेथे टिकवतात, त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांच्या सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले ते सगळे अयोध्यानिवासीसुद्धा त्याच लोकी गेले, जेथे योगी योगसाधनेने जातात. राजा ! जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते. आणि तो सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता ! रावणाने जेव्हा सीतेच्या रूप-गुणांविषयी ऐकले, तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतुर झाले. त्याने मारीचाला अद्भुत हरणाच्या रूपात तिच्या पूर्णकुटीजवळ पाठविले. तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला. जसे दक्षप्रजापतीला वीरभद्राने मारले होते, तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तात्काळ मारून टाकले. नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्रीरामलक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदनी श्रीसीतादेवींचे अपहरण केले त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने, भाऊ लक्ष्मणासह, जंगलामध्ये दीनवाणे होऊन फिरू लागले.जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात, त्यांची अशीच गती होते, हेच जणू त्यांनी दाखविले. यानंतर, ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत्सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती, त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला. पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्यापाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला. त्यानंतर वानरांच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला. ब्रह्मदेव आणि शंकर ज्याच्या चरणांची पूजा करतात, तेच मनुष्यरुप भगवान श्रीराम वानरसेनेसह समुद्रतटावर पोहोचले.( तेथे तीन रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही, तेव्हा) भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली, त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले. भ्याल्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली, तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादि वस्तू घेऊन समुद्र भगवंतांच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला. "अनंता ! आम्ही मूढ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी, आदीकारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही. आपण सर्व गुणांचे स्वामी आहात. म्हणून जेव्हा आपण सत्त्वगुणाचा स्वीकार करता, तेव्हा दैवतांची, रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता, तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते. हे वीरशिरोमणे ! आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रिलोक्याला रडवणाऱ्या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या. येथे माझ्यावर एक सेतू बांधा. त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठ-मोठे नरपती दिग्विजय करीत येथे येतील, तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील. "

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवन ! आम्ही हे जाणू इच्छितो की, महात्मा सौदासाला गुरु वशिष्ठांनी शाप का दिला ? जर यात काही गुप्त नसेल तर सांगावे.

            श्रीशुक म्हणाले - सौदास एकदा शिकारीसाठी गेला होता. तेथे त्याने एका राक्षसाला मारले आणि त्याच्या भावाला सोडून दिले. त्याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आचाऱ्याचे रुप घेऊन तो त्याच्या घरी आला. एक दिवस भोजनासाठी जेव्हा गुरु वशिष्ठ राजाच्या घरी आले, तेव्हा त्याने मनुष्याचे मांस शिजवून त्यांना वाढले. भगवान वसिष्ठांनी अभक्ष्य मांस वाढताना पाहून रागावून राजाला झटकन शाप दिला की, " या कृत्यामुळे तू राक्षस होशील. " हे राक्षसाचे काम आहे, असे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी तो शाप फक्त बारा वर्षाच्यापुरताच ठेवला. त्यावेळी सौदाससुद्धा आपल्या ओंजळीत पाणी घेऊन गुरु वशिष्ठांना शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. परंतु मदयंतीने त्याला अडविले. तेव्हा सौदासाने दिशा, आकाश आणि पृथ्वी ही सर्व जीवमय आहेत, असा विचार करून ते शापजल आपल्या पायांवर टाकले. ( म्हणूनच त्याचे नाव 'मित्रासह' असे पडले.) त्या पाण्यामुळे त्याचे पाय काळे झाले होते, म्हणून त्याचे नाव 'कल्माषपाद'असेही पडले. आता तो राक्षस झाला होता. राक्षस झालेल्या कल्माषपादाने एके दिवशी एका वनवाशी ब्राह्मण दांपत्याला एकांतात असताना पाहिले. कल्माषपादाला भूक लागली होती (म्हणून) त्याने ब्राह्मणाला पकडले. ब्राह्मणपत्नीची कामना पूर्ण झाली नव्हती. ती म्हणाली "राजा ! तू राक्षस नाहीस. महाराणी मदयंतीचा पती आणि इश्वाकुवंशाचा वीर महारथी आहेस. असा अधर्म करू नकोस. मला संतानाची इच्छा आहे आणि या ब्राह्मणाची सुद्धा कामना अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून मला हा माझा पती परत दे. हे मनुष्यशरीर जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून हे वीरा ! शरीराची हत्या म्हणजे सर्व पुरुषार्थांची हत्या, असे म्हटले जाते. शिवाय, हा ब्राह्मण विद्वान आहे. तपश्चर्या, शील इत्यादी गुणांनी संपन्न आहे. जो सर्व पदार्थामध्ये असूनही त्यांच्या वेगवेगळ्या गुणांमुळे लपून राहिलेला आहे, त्या पुरुषोत्तम परब्रह्याची, सर्व प्राण्यांच्या आतम्याच्या रूपामध्ये हा आराधना करू इच्छितो. हे धर्म जाणणाऱ्या राजा ! जसा पित्याच्या हातून पुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या श्रेष्ठ राजर्षीच्या हातून श्रेष्ठ ब्रह्मर्षीचा वध होणे कसे योग्य आहे ? तू सन्माननीय आहेस. असे असता तू परोपकारी, निरपराध, वैदिक आणि ब्राह्मवादी ब्राह्मणाचा, गाईचा वध करावा तसा वध करणे कसे योग्य आहे ? असे असताही जर तू याला खाणार असशील, तर अगोदर मला खा; कारण याच्याशिवाय मी मेल्यासारखीच असून एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. " असे काकुळतीने बोलून ती अनाथ असल्यासारखी रडू लागली. परंतु शापाने मूढ झाल्यामुळे सौदासाने, वाघाने एखाद्या पशूला खावे, त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. ब्राह्मणपत्नीने गर्भाधानास उद्युक्त झालेल्या पतीला राक्षसाने खाल्लेले पाहून तिला अतिशय शोक झाला. तिने संतापून राजाला शाप दिला. "अरे पाप्या ! मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लेस. म्हणून मुर्खा ! तू जेव्हा स्त्रीबरोबर संग करण्यास जाशील, तेव्हा तुझाही मृत्यू होईल, ही गोष्ट मी तुझ्या निदर्शनाला आणते. " अशा प्रकारे मित्रसहाला शाप देऊन पतिलोकात जाऊ इच्छिणारी ब्राह्मणपत्नी, आपल्या पतीच्या अस्थींनी धगधगनाऱ्या चितेत उडी घेऊन स्वतः सती गेली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - २

श्री गणेशाय नमः सगराची दुसरी पत्नी केशिनी. हिच्यापासून त्याला असमंजस नावाचा मुलगा झाला होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहात असे. असमंजस मागच्या जन्मी योगी होता. आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता. परंतु आताही त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. म्हणून बांधवांना प्रिय वाटणारा नाही असे काम तो करी. तो कधी कधी नींद्य कर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असे दाखवी. इतकेच काय, खेळताना मुलांना शरयू नदीत टाकून देई. अशा प्रकारे त्याने लोकांना उद्विग्न केले होते. शेवटी त्याचे असे उपद्व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेही टाकून त्याचा त्याग केला. त्यानंतर असमंजसाने योग्यबलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तेथून निघून गेला. आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली, तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजालासुद्धा पश्चात्ताप झाला. यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याने, आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने जाऊन, त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले. भगवंतांचे अवतार कपिल-मुनी तेथेच बसले होते. थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्र मनाने त्यांची स्तुती केली.

            अंशुमान म्हणाला - भगवन ! अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शिकले नाहीत. इतकेच काय, पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकले नाहीत. आम्ही तर त्यांच्या मन, शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत. तर मग आम्ही आपल्याला कसे बरे समजू शकू ? जगातील शरीर धारण करणारे जीव सत्त्वगुण, रजोगुण किंवा तमोगुनप्रधान आहेत. ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ, तर सुषुप्ति अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहातात. कारण, ते आपल्या मायेने मोहित आहेत. त्यांची दृष्टी बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहातात, परंतु स्वत:च्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहात नाहीत. आपण ज्ञानघन आहात. सनंदनादी मुनी, आत्मस्वरूपाच्या अनुभवाने मायेच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान, यांना दूर सारून आपलेच चिंतन करीत असतात. मायेच्या गुणांनी भुलून गेलेला मी मूर्ख आपले चिंतन कसे करणार ? माया, तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मे तसेच कर्मांच्या संस्कारांनी बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच. आपल्याला नाव नाही की रूप नाही. आपल्यामध्ये कार्य नाही, की कारण नाही. आपण सनातन आत्मा आहात. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच आपण हे शरीर धारण केले आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे. याला सत्य समजून लोभ, ईर्ष्या आणि मोहामुळे लोकांचे चित्र, शरीर तसेच घर इत्यादीमध्ये भटकत राहाते. सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या हे प्रभो ! कामना, कर्म आणि इंद्रियांचा आश्रय असणारा, माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे.

            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कपिल देवांच्या प्रभावाचे जेव्हा अंशुमान याने असे वर्णन केले, तेव्हा त्यांनी मनोमन अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - "पुत्रा ! हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञपशू आहे. याला तू घेऊन जा. तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगाजलानेच होईल. त्याला दुसरा कोणताही उपाय नाही. "अंशमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला. सगराने त्या यज्ञपशूच्या द्वारा यज्ञाची समाप्ती केली.
            तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपविला आणि तो स्वत: विषयांविषयी नि:स्पृह आणि बंधनमुक्त झाला. महर्षी और्व यांनी दाखविलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - २

श्री गणेशाय नमः तो जी जी वेळ सांगे, त्याची वरूण वाट पाहात असत. रोहिताला जेव्हा समजले की, वडील आपले बलिदान करू इच्छितात. तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसांनंतर त्याला समजले की, वरूण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे. यामुळे त्याला जलोदर झाला आहे. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला. परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले.ते रोहिताला म्हणाले, " पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले." इंद्रांचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर मनातच राहिला. अशा प्रकारे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहिताने आपल्या वडीलांकडे जाण्याचा विचार केला. परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत. अशाप्रकारे सहा वर्षे रोहित मनातच राहिला. सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला, तेव्हा त्याने अजीगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शुनःशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशु बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी, श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरूण इत्यादी देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले. संयमी जमदग्नी अध्वर्यू झाले. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गगाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरीचंद्राला एक सोन्याचा रथ दिला.

            शुन: शेपाचे माहात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरीश्र्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करुन, आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले. नंतर अहंकाराला महत्तत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. त्यानंतर निर्वाणसुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही, आणि ज्याच्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला .

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरंजयाचा पुत्र अनेना होता. त्याचा पुत्र पृथू झाला. पृथूचा विश्वरन्धी, त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्र्व. युवनाश्र्वाचा पुत्र झाला शाबस्त. त्याने शाबस्तुतीपुरी वसविली. शाबस्ताचा पुत्र बृहदश्र्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्र्व झाला. हा अत्यंत बलशाली होता. त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी आपली एकवीस हजार पुत्र बरोबर घेऊन धुंधू नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणूनच त्याचे नाव 'धुंधुमार' असे पडले. धुंधू दैत्याच्या मुखातील आगीमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले. फक्त तीनच जिवंत राहिले. परीक्षिचा ! जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे दृढाश्व, कपिलाश्र्व आणि भद्राश्र्व अशी होती. दृढाश्र्वापासून हर्यश्र्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला.

            निकुंभाचा बर्हणाश्र्व, त्याचा कृशाश्र्व, सेनजित आणि सेनजिताचा युवनाश्र्व नावाचा पुत्र झाला. युवनाश्र्वाला संतान नव्हते. म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यासह वनामध्ये निघून गेला. तेथे दयाळू ऋषींनी युवनाश्वाकडून एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ करविला. रात्रीच्या वेळी युवनाश्र्वाला तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला. परंतु ऋषी झोपलेले आहेत, असे पाहून अभिमंत्रित केलेले पाणीच तो प्याला. परीक्षिता ! जेव्हा ऋषी उठले, तेव्हा कलशात पाणी नाही, असे पाहून त्यांनी विचारले की, " हे कोणाचे काम आहे ? पुत्र उत्पन्न करणारे पाणी कोण प्याले ?" भगवंतांच्या प्रेरणेने राजा युवनाश्र्वच ते पाणी प्याला, असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले, " धन्य आहे ! दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय. "यानंतर प्रसवसमय आल्यावर युवनाश्र्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला. त्याला रडताना पाहून कृषी म्हणाले - "हे बालक दुधासाठी फार रडत आहे. तर मग आता हे कोणाचे दूध पिणार ? " तेव्हा इंद्र म्हणाला, "(मां धाता) माझे पिणार ? " "पुत्रा ! तू रडू नकोस. " असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली. (कारण तो इंद्र योगा इंद्रयागावातून जन्मला होता.) ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्र्व यालासुद्धा मृत्यू आला नाही. तो तिथेच तपश्चर्या करून मुक्त झाला. इंद्राने त्याचे नाव त्रसद्दस्यू असे ठेवले. कारण रावण इत्यादी दस्यू (लूटमार करणारे) त्याला भीत असत. युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता (त्रसद्दस्यू) चक्रवर्ती राजा झाला. भगवंतांकडून मिळालेल्या तेजामुळे त्याने एकट्यानेच सात द्विपे असलेल्या पृथ्वीचे पालन केले. तो जरी आत्मज्ञानी होता, तरीसुद्धा त्याने मोठ-मोठ्या दक्षिणायुक्त यज्ञांनी स्वयंप्रकाश, सर्वदेवस्वरुप, सर्वात्मा तसेच इंद्रियातीत अशा यज्ञस्वरुप प्रभूंची आराधना केली. यज्ञाची सामग्री, मंत्र, विधीविधान, यज्ञ, यजमान, ऋत्विज,धर्म, देश आणि काल, हे सर्व तर भगवंतांचेच स्वरूप आहे. जेथून सूर्याचा उदय होतो, तो सगळा भूभाग युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता याचाच होता.

            मांधात्याची पत्नी शशीबिंदूचि कन्या बिंदुमती ही होती. तिच्यापासून पुरूकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे तीन पुत्र झाले. त्यांना पन्नास बहिणी होत्या. त्या पन्नास-जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरले. परम तपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्‍चर्या करीत होते. तेथे त्यांनी पाहिले की, एक मत्स्यराज आपल्या पत्नीस सुख उपभोगीत आहे. त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्येसुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी त्याच्याकडे पन्नास कन्यांपैकी एक कन्या मागितली. राजा म्हणाला, " ब्रह्मन ! स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले, तर आपण तिला घेऊन जा." सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजले. त्यांनी विचार केला की, राजाने अशासाठी हे रूक्ष उत्तर दिले की, " आता मी वृद्ध झालो आहे, माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत. केस पिकले आहेत आणि माण हलू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. ठीक आहे ! मी आता स्वत:ला असा सुंदर बनवीन की, राजकन्याच काय पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील. " असा विचार करून समर्थ सौभरीने तसेच केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - २

श्री गणेशाय नमः दुर्वास म्हणाले-धन्य आहे! आज मी भगवंतांच्या भक्तांचे महत्व पाहिले. राजन! मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस. ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे,‌ त्या साधुपुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे? आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे? ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो, या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते? महाराज! आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले. कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केलेत.

            राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहात होता. आता त्याने दूर्वासांचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले. राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाले. आणि राजाला आदराने म्हणाले, "राजन! आता आपणही भोजन करावे." भगवंतांचे भक्त असणाऱ्या आपले दर्शन, स्पर्श, संवादाने मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आणि उपकृत झालो आहे. स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील. ही पृथ्वीसुद्धा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणाले - भाग्यवान अंबरीषाला सप्तव्दीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या, तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानीत असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो, हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ) वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये, वाणी भगवद़ॖणानुवर्णनामध्ये, हात हरीमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंगप्रत्यंग भगवभ्दक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादसेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे, भगवंतांना सर्वांत्मा तसेच सर्वस्वरूप समजून, त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष, इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवद्भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने 'धन्व' नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ, असित, गौतमी इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत, तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रुपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायिलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यामुळे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणार्‍या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोगसामुग्री आनंदित करू शकत नव्हती.तिला होणार्‍या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळू हळू त्याने सर्व प्रकारच्या आशक्तींचा त्याग केला. घर, स्त्रि, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती,रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे, असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रुंना भयभीत करणारे आणि भगवदक्तांचे रक्षण करणारे सुदर्शनचक्र दिले होते.
            एकदा त्याने आपल्यासारखाच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंत:करणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गाई पाठविल्या. त्या गाईची शिंदे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गाई गरीब, तरुण, दिसावयास सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, " बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की,"आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत. " तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. " वडील म्हणाले, " मुला ! तु त्यांचे म्हणणे ऐकू नकोस." अंगिरस-गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्र्वदेवसूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील, तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा." आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरसगोत्राच्या ब्राह्मणांनीसुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले.
            नाभाग ते धन घेऊ लागला, तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला- "या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे, ते सर्व धन माझे आहे."
             नाभाग म्हणाला, "ऋषींनी हे धन मला दिले आहे; म्हणून माझेच आहे. " यावर तो पुरुष म्हणाला, "आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, "दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की, यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील, तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल. म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे." नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, " प्रभू ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत, असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्रह्मण ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो. "( तेव्हा भगवान रुद्र म्हणाले), " तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तूसुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. " एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो, तो प्रतीभावत, वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपालासुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही.
            राजाने विचारले - भगवन ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळुन गेला. तो म्हणाला, "मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात ?" आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुशोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की, आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे ? हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्मपदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होईल होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परम प्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हांला दर्शन दिले आहे, ते अतिशय अद्भुत आहे.
            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपति मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर काल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - सत्यव्रता, आजपासून सातव्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सुक्षम शरीरे घेऊन सप्तर्षीसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहानमोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल, तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील, तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने, ज्याचे नाव 'परब्रम्ह' आहे, तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरुप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिले की, प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहेत. पाहाता-पाहाता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली, तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षीसह तीत बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, "राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हांला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील." त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांचे ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. भगवंतांच्या सांगण्यानुसार ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला.
            सत्यव्रत म्हणाला - जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादि अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात, तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हांला मुक्ती देणारे परम गुरु आपणच आहात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः शुक्राचार्य म्हणाले - भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील ? कारण मंत्रांचे, अनुष्ठानपद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूंविषयाचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. तथापि अनंता, आपणच जर म्हणत असाल, तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परम कल्याण आहे.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षीसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पीतर, मनू, दक्ष,भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांच्या अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला.
परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वाच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले. इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगु इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगन, भगवंतांच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली.
परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रदृष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्भूत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परम गती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे किर्तन होते, ते कर्म सफल होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रल्हाद म्हणाले - प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले, हेच चांगले झाले. ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केलीत, असेच मला वाटते. आत्म्याला मोहित करणाऱ्या राज्यलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने कोण जाणू शकेल ? सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला- श्रीनारायणदेवांना मी नमस्कार करतो.
        श्रीशुक म्हणतात - राजा, प्रल्हाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते. हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्‍नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून, भयभीत होऊन, भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमीनीकडे पाहात ती भगवंतांना म्हणाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की, दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत, तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले. नंद, सुनंद, जय,विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विष्वकसेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. ते पार्षद आपल्या सैन्यात सैनिकांना मारीत आहेत आणि तेही संतापलेले आहेत, असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवूण त्यांना युद्धापासून परावृत केले. त्याने विप्रचित्ती, राहू, नेमी, या दैत्यांना संबोधून म्हटले," माझे म्हणणे ऐका. लढाई करू नका. परत फिरा. आम्हांला ही वेळ अनुकूल नाही. दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो, त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे. जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता, तोच भगवान काल आता यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे.बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय, यांपैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही. जेव्हा देव अनुकूल होते, तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते. पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत. दैव अनुकूल झाले, तर आम्हीसुद्धा यांना जिंकू. म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळीची वाट पहा. "
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्यसेनापती रसातळाला निघून गेले. हे गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षिराज गरुडाने वरुणाच्या पाशांणी बलीला बांधले. त्यादिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले, तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व देशांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान बलीला म्हणाले, "हे असुरा, तू मला तीन पावले जमीन दिली होतीस. दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले, आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर. जीथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात, जीथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात, आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या अधिपत्याखाली होती. तुझ्यादेखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. तू जी प्रतिज्ञा केली होतीस, ती पूरी केल्याकारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर.
जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशाप्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच; पण त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तीमान आहे, या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला 'देतो' म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षपर्यंत नरकयातना भोग.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - २

श्री गणेशाय नमः सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे,परंतु खोटे बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होत नाही. " ब्राह्मणांना बसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकाला, दारिऱ्याला, दुःखाच्या समुद्राला, राजाच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादि ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देऊन जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही, तर त्या त्यागापासून काय फायदा ? दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करूनसुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे ? हे ब्रह्मण, यापूर्वी ज्या दैत्यराज्यांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक-परलोक तर काळाने खाऊन टाकला; परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. गुरुदेव, युध्दात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत; परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रध्देने दान करतात, असे लोक मात्र दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्त्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले ? म्हणून मी या ब्रह्मचाऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन. माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले, तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही. कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे. जर हे पवित्रकीर्ती भगवान विष्णूच असतील, तर यश मिळविल्याखेरीज राहाणार नाहीत. युद्धात मला मारूनसुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील, तर युद्धात माझ्याकडून मारले जातील.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला. "मूर्खा, तू स्वतःला मोठा पंडित समजतोस ! गर्विष्ठ अशा तु माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल. " आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतरसुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळाला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले. त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली. तिने चरणप्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. बलीने मोठ्या आनंदाने स्वतःते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. एकाच वेळी हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, कींपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले, हे केवढे कठीण काम केले बरे !
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - २

श्री गणेशाय नमः हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरडा करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाहीत. ते कोठेच नाहीत. असे पाहून तो म्हणू लागला, "मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही, अशा लोकी निघून गेला असावा. बस ! आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रल्हादनंदन विरोचन फार मोठा ब्राह्मणभक्त होता. इतका की, त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे, गृहस्थ, ब्राह्मण, आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको. कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकतेइतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही.
बली म्हणाला - ब्राह्मणकुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे; परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना ?म्हणून आपला फायदा-तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय ? हे ब्रह्मचारी,जो एक वेळ माझ्याकडे आला, त्याला पुन्हा कधी कोणाकडून ही काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेवढ्या भुमीची आवश्यकता असेल, तेवढी माझ्याकडुन मागून घे.
श्रीभगवान म्हणाले - राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल, तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. जो तीन पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही; कारण सातही द्वीपे मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहातेच. मी असे ऐकले आहे की, पृथू, गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होते. परंतु इतके धन आणि भोग मिळूनसुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहाणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा, तिन्ही लोकांचे राज्य मिळूनसुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण, दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर असे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देणाऱ्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यकतेइतकेच धन जवळ बाळगावे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - २

श्री गणेशाय नमः त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्‍वमेध यज्ञ करीत आहे, असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावलापावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर 'भृगुकच्छ' नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बळीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले, तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला, असे वाटले. परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की, यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनत्कुमार तर येत नाहीत ना ? शिष्यांसह भृगू याप्रकारे अनेक कल्पना करीत होते, त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजिन आणि मस्तकावर जटा होत्या. अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह, त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्निसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहानलहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केली. देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते, तेच अत्यंत मंगल, लोकांचे पाप-ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले.
बली म्हणाला - हे ब्राह्मणकुमार, आपले स्वागत असो. आपणांस मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ? आर्य, असे वाटते की, आज ब्रह्यर्षीची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला. हे ब्राह्मणकुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्षाने पृथ्वीही पवित्र झाली. हे सर्वपूज्य ब्राह्मणकुमार, असे वाटते की, आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मणकन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ, असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - २

श्रीभगवान म्हणाले - हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. तुझी अशी इच्छा आहे की. आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. तुझी अशीसुद्धा इच्छा आहे की, तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील, तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे. अदिती, तुला असेही वाटते की, तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही, असे मला निश्चितपणे वाटते. कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे, म्हणून मला यासंबंधी काही-ना-काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुति केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपच्या तपश्र्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानाचे रक्षण करीन. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पाहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील, तितके ते अधिक सफल होते.
श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत. ही दुर्मिळ गोष्ट जाणुन कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधियोगाने जाणले की, भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायु जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत. तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्राह्मण्यदेवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. प्रश्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या, वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभो, आपणच सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंत:करणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. प्रभो, आपणच संसाराचे आदि अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरूषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याप्रमाणे आपणसुद्धा कालरुपाने हे विश्व स्वतः बरोबर वाहून नेता. आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींनासुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या दैवतांना केवळ आपलाच आधार आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...