अध्याय तेविसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय तेविसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेविसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात -अनुला सभानर, चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले. सभानगराचा कालनर, कालनगराचा सृजन, सृजनाचा जनमेजय, जनमेजयाचा महाशील, महाशीलाचा पुत्र महामना. महामनाला उशीनर आणि तितीक्षू असे दोन पुत्र झाले. उशीनरला शिबी, वन, शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले. शिबीला वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकेय असे चार पुत्र झाले. तितिक्षूला रुशद्रथ, रूशद्रथाचा हेम, हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र होता.

            राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग, वंग, कलिंग, सुह्य, पुंड्र आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले. यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसविले. अंगाचा पुत्र झाला खनपान. खनपानाचा दिविरथ, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ. हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनीबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग. रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही, तेव्हा गणिकांकरवी नृत्य, संगीत, वाद्ये, हाव-भाव, आलिंगन आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणविले, तेव्हा पाऊस पडला. जेव्हा त्यानेच इंद्र-देवतेला उद्देशून यज्ञ केला, तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथानेसुद्धा त्याच्याचकरवी यज्ञ करवून चार पुत्र प्राप्त करून घेतले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष.

            पृथुलाक्षाचे बृहद्रथ, बृहत्कर्मा आणि बृहद्भानू असे तीन पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना झाला आणि बृहन्माचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्नीचे नाव संभूती होते. तिच्यापासून विजय झाला. विजयाचा धृती, वृत्तीचा धृतव्रत, धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला.

            अधीरथाला संतान नव्हते. एके दिवशी तो गंगातटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला. कुंतीला तो कुमारी अवस्थेत झाला होता. अधीरथाने त्यालाच आपला पुत्र मानले. त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव वृषसेन होते. ययातीचा पुत्र द्रुह्यूपासून बभ्रूचा जन्म झाला. बभ्रुचा सेतू, सेतूचा आरब्ध, आरब्धाचा गांधार, गांधाराचा धर्म, धर्माचा धृत,धृताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता होय. प्रचेताला शंभर पुत्र झाले. ते उत्तर दिशेला म्लेंच्छांचे राजे झाले. तुर्वसूचा वह्नी, वह्नीचा भर्ग, भर्गाचा भानुमान, भानुमानाचा त्रिभानू, त्रिभानूचा उदारबुद्धी करंधम आणि करंधमाचा पुत्र मरुत्त होता. मरुत्त निपुत्रिक होता, म्हणून त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानले होते. परंतू दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला. परीक्षिता! आता मी ययातीचा जेष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो.

            यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्यांची सर्व पापे नाहीशी करणारा आहे. जो मनुष्य याचे श्रवण करेल, तू सर्व पापांपासून मुक्त होईल. या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला होता. यदूला सहस्त्रजित, क्रोष्टा, नल आणि रिपू असे चार पुत्र होते. सहस्त्रजितापासून शतजित याचा जन्म झाला. शतजिताचे महाहय, वेणुहय आणि हैहय असे तीन पुत्र होते. हैहयाचा धर्म, धर्माचा नेत्र, नेत्राचा कुंती, कुंतीचा सोहंजी, सोहंजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता. भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले. कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. त्याने भगवंतांचे अंशावतार श्रीदत्तात्रेय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. स्पोर्ट टीव्ही वरील कोणताही सम्राट यज्ञ, दान, तपश्चर्या, योग, शास्त्रज्ञान, पराक्रम, विजय, इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही. सहस्त्रबाहू अर्जुन पंचाऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला. या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही. त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते. त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि उर्जित.

            जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंघ होते. तालजंघाला शंभर पुत्र झाले. त्या तालजंघ नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला. त्या शंभर पुत्रांमध्ये वितीहोत्र सर्वात थोरला होता. वितिहोत्राचा पुत्र मधू. मधूचे शंभर पुत्र होते. त्यातील सर्वात थोरला वृष्णी होता. राजा! ह्याच मधू, वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव, वार्ष्णेय आणि यादव या नावांनी प्रसिद्ध झाला. यदुनंदन क्रोष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते. वृजिनवानाचा पुत्र श्वाही, श्र्वाहीचा रुशेकू, रुशेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते. तो परम योगी, महान भोगैश्वर्यसंपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता. तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता. परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या. त्यांपैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती. अशी त्याची शंभर कोटी मुले होती. त्यांपैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते. पृथुश्रवाच्या पुत्राचे नाव धर्म होते. धर्माचा पुत्र उशना. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते. उशनाचा पुत्र रुचक. रुचकाला पाच पुत्र झाले. त्यांची नावे ऐक. पुरुजीत, रुक्म, रुक्मेषू, पृथू आणि ज्यामघ. ज्यामघाच्या पतीचे नाव शैब्या असे होते. ज्यामघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झाले नाही. परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही. एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचे अपहरण केले. जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले, तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली- "कपट्या! माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसवून आणले आहेस?" ज्यामघ म्हणाला- "ही तुझी सून आहे." शैब्या हसून पतीला म्हणाली,

            "मी तर पहिल्यापासूनच वांझ आहे आणि मला कोणी सवतही नाही. तर मग मी माझी सून कशी होईल?" ज्यामघ म्हणाला, "राणी! तुला जो पुत्र होईल, त्याची ही पत्नी होईल." राजा ज्यामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला. योग्यवेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव विदर्भ ठेवले. त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः शुक्राचार्य म्हणाले - भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील ? कारण मंत्रांचे, अनुष्ठानपद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूंविषयाचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. तथापि अनंता, आपणच जर म्हणत असाल, तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परम कल्याण आहे.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षीसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पीतर, मनू, दक्ष,भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांच्या अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला.
परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वाच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले. इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगु इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगन, भगवंतांच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली.
परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रदृष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्भूत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परम गती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे किर्तन होते, ते कर्म सफल होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा सांधूना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्गगद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला.
            बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला, तेव्हा तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या असुरावर केलीत.
            श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वत: उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की, माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली.
            प्रल्हाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्ष्मी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मत:च दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्णदृष्टी कशी काय वळली ? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळताखेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता !
            श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहील्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील.
श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्धबुद्धी प्रल्हादांनी 'ठीक' असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले. ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहाते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...