अध्याय आठवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय आठवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - २

श्री गणेशाय नमः सगराची दुसरी पत्नी केशिनी. हिच्यापासून त्याला असमंजस नावाचा मुलगा झाला होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहात असे. असमंजस मागच्या जन्मी योगी होता. आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता. परंतु आताही त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. म्हणून बांधवांना प्रिय वाटणारा नाही असे काम तो करी. तो कधी कधी नींद्य कर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असे दाखवी. इतकेच काय, खेळताना मुलांना शरयू नदीत टाकून देई. अशा प्रकारे त्याने लोकांना उद्विग्न केले होते. शेवटी त्याचे असे उपद्व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेही टाकून त्याचा त्याग केला. त्यानंतर असमंजसाने योग्यबलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तेथून निघून गेला. आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली, तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजालासुद्धा पश्चात्ताप झाला. यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याने, आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने जाऊन, त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले. भगवंतांचे अवतार कपिल-मुनी तेथेच बसले होते. थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्र मनाने त्यांची स्तुती केली.

            अंशुमान म्हणाला - भगवन ! अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शिकले नाहीत. इतकेच काय, पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकले नाहीत. आम्ही तर त्यांच्या मन, शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत. तर मग आम्ही आपल्याला कसे बरे समजू शकू ? जगातील शरीर धारण करणारे जीव सत्त्वगुण, रजोगुण किंवा तमोगुनप्रधान आहेत. ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ, तर सुषुप्ति अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहातात. कारण, ते आपल्या मायेने मोहित आहेत. त्यांची दृष्टी बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहातात, परंतु स्वत:च्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहात नाहीत. आपण ज्ञानघन आहात. सनंदनादी मुनी, आत्मस्वरूपाच्या अनुभवाने मायेच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान, यांना दूर सारून आपलेच चिंतन करीत असतात. मायेच्या गुणांनी भुलून गेलेला मी मूर्ख आपले चिंतन कसे करणार ? माया, तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मे तसेच कर्मांच्या संस्कारांनी बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच. आपल्याला नाव नाही की रूप नाही. आपल्यामध्ये कार्य नाही, की कारण नाही. आपण सनातन आत्मा आहात. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच आपण हे शरीर धारण केले आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे. याला सत्य समजून लोभ, ईर्ष्या आणि मोहामुळे लोकांचे चित्र, शरीर तसेच घर इत्यादीमध्ये भटकत राहाते. सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या हे प्रभो ! कामना, कर्म आणि इंद्रियांचा आश्रय असणारा, माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे.

            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कपिल देवांच्या प्रभावाचे जेव्हा अंशुमान याने असे वर्णन केले, तेव्हा त्यांनी मनोमन अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - "पुत्रा ! हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञपशू आहे. याला तू घेऊन जा. तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगाजलानेच होईल. त्याला दुसरा कोणताही उपाय नाही. "अंशमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला. सगराने त्या यज्ञपशूच्या द्वारा यज्ञाची समाप्ती केली.
            तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपविला आणि तो स्वत: विषयांविषयी नि:स्पृह आणि बंधनमुक्त झाला. महर्षी और्व यांनी दाखविलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - रोहिताचा पुत्र हरित होता. हरिताचा पुत्र चंप झाला. त्यानेच चंपापुरी वसविली होती. चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला. विजयाचा भरूक, भरूकाचा वृक आणि वृकाचा पुत्र बाहुक झाला. शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतले, तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला.वनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्नीसुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली. परंतु ती गर्भवती आहे, हे महर्षी और्व यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबविले. जेव्हा तिच्या सवतींना हे माहित झाले, तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले. पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला. विषासह (गर) जन्म झाल्याकारणाने 'सगर' नाव पडले. हा अतिशय किर्तीमान होता.

सगर चक्रवर्ती होता. त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता. सगराने आपले गुरुदेव और्व यांची आज्ञा मानून तालजंघ, यवन, शक, हैहय आणि बर्बर जातीच्या लोकांचा वध केला नाही, परंतु त्यांना विद्रूप केले. त्यांपैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले, काहींना दाढी-मिशा ठेवण्यास सांगितले, काहींना केस मोकळे सोडावयास सांगितले, तर काहींचे अर्धे मुंडन केले. सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली, नेसण्याची नाही; आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यासच सांगितले, वस्र पांघरण्यास नव्हे. यानंतर राजा सगराने और्व ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद व देवतामय, आत्मस्वरूप सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना केली. त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता, तो इंद्राने चोरून नेला. त्यावेळी सुमवतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ट मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली. पण जेव्हा घोडा सापडला नाही, तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली, खोदता-खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल-मुनींजवळ आपला घोडा दिसला. घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्रे हातात घेऊन "हाच आमचा घोडा चोरणारा चोर आहे, आणि वर डोळे मिटून बसला आहे. मारा, मारा ह्या नीचाला," असे म्हणत त्यांच्याकडे धावले. त्याचवेळी कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या. इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती. म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला. यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन, तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले. सगराचे पुत्र कपिलमुनींच्या क्रोधामुळे जळून गेले. हे म्हणणे योग्य नाही. कारण ते तर शुद्ध सत्त्वगुणाचे आश्रय आहेत. त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते. क्रोधरुपी तमोगुण त्यांच्यामध्ये असणे कसे शक्य आहे बरे ? पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय ? हा संसार-सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे. याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. परंतु कपिल मुनींनी या जगात सांख्यशास्त्ररुपी एक अशी भक्कम नाव बनविली आहे की,मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती तिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते. ते केवळ परम ज्ञानीच नव्हेत, तर स्वतः परमात्मा आहेत. हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांचे ठिकाणी कशी असेल बरे ?

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - ३

श्री गणेशाय नमः यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारूणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातुन एक अत्यंत अलौकीक पुरुष प्रकट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्नकुंडले होती. रुद्र छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशांशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक 'धन्वंतरी' या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दिनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, " देवांनो" ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो."
परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरु झाले. सर्वजण म्हणू लागले, " मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही. " हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. " एवढ्यात सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भीती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायांतील नूपुर रुणझुण रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - २

श्री गणेशाय नमः ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्यमुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरूष आढळला नाही. जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणारे नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषय सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल ज्यांच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत.
असा विचार करुन श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांना वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. आणिमादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात; परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत. म्हणून तिने त्यांनाच वरले. जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधून गुंजारव करीत आहेत. अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्ष:स्थळाकडे पाहात ती त्यांच्याजवळच उभी राहिली. त्रैलोक्यनिर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्रीलक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्ष:स्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ-नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली, तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्य आणि लोभी झाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदीत झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनु प्रगट झाली. हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामुग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल, असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. नंतर उच्चै:श्रावा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्याची बळीने इच्छा प्रगट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील, असे त्याला शिखरांसारखे चार दात होते. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला. तूं ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणार होता. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगत झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ती लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, तारूण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की, ही आपल्याला मिळावी. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मुर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यांतुन पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गाईनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतुने चैत्र-वैशाखात मिळणारी सर्व फुलेफळे आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या.मेघ देह धारण करून मृदंग, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्या वेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरूणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...