श्री गणेशाय नमः बारा वर्षांनंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने त्यांना अडविले. कारण तिला त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वैशिष्ठांनी मदयन्तीच्या ठिकाणी गर्भाधान केले. मदयंतीने सात वर्षंपर्यंत गर्भ धारण केला. परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्मा (दगडा) च्या आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याचे 'अश्मक' नाव ठेवले. अश्मकापासून मुलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला नि:क्षत्रिय करीत होते, तेव्हा स्त्रियांनी याला लपून ठेवले होते. म्हणून त्याचे एक नाव 'नारीकवच' असे पडले. त्याला मूलक यासाठी म्हणतात की, पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवृर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ. दशरथाचा ऐडविड आणि ऐडविडाचा विश्वसह. विश्वसहाचा पुत्रच चक्रवर्ती खट्वांग झाला. युद्धामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला होता. देवतांकडून त्याला जेव्हा समजले कि, आपले आयुष्य फक्त दोन घटकाच शिल्लक आहे. तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंतांचे ठिकाणी स्थिर केले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की, "माझ्या कुलाची इष्ट देवता ब्रह्मण आहे. त्यांच्यापेक्षा अधिक माझे माझ्या प्राणावरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्याइतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझे मन अधर्माकडे कधी गेले नाही. पवित्रकीर्ती भगवंतांच्या व्यतिरिक्त मी आणखी कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही.तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितले. परंतु मी त्या भोगांची अजिबात लालसा धरली नाही; कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो होतो. ज्या देवतांची इंद्रिये आणि मने विषयांमध्ये भटकत असतात, त्या देवता सत्वगुणप्रधान असूनसुद्धा आपल्या हृदयात विराजमान, सदैव प्रियतमाच्या रूपाने राहाणाऱ्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाहीत. तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, ते कसे जाणू शकतील ? ईश्वराच्या मायेचा खेळ असणाऱ्या, गंधर्वनगरांसारख्या या विषयांना मी सोडून देत आहे. कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणाऱ्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांनाच शरण जात आहे. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता, त्याचा त्याग केला आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला.ते स्वरुप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सुन्यासमानच आहे. परंतु ते शून्य नाही, परम सत्य आहे. भक्तजन त्यास वस्तूचे "भगवान वासुदेव" या नावाने वर्णन करतात.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।