अध्याय विसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय विसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय विसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात-परीक्षिता! आता मी राजा पूरुच्या वंशाचे वर्णन करीन. याच वंशात तुझा जन्म झाला आहे. याच वंशातील वंशज पुष्कळसे राजर्षी आणि ब्रह्मर्षीसुद्धा झाले आहेत. पूरुचा पुत्र जनमेजय झाला. जनमेजयाचा प्रचीन्वान, प्रचीन्वानाचा प्रवीर, प्रविराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला. चारूपदापासून सुद्यु, सुद्यूपासून बहुगव, बहुगवापासून संयाती, संयातीपासून अहंयाती आणि अहंयातीपासून रौद्राश्व झाला.

            विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिये उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे ऋतेयू, कुक्षेयू, स्थंडिलेयू, कृतेयू, जलेयू, संततेयू, धर्मेयू, सत्येयू, व्रतेयू आणि सर्वात लहान वनेयू, असे दहा पुत्र झाले.
            परीक्षिता! त्यांपैकी ऋतेयूचा पुत्र रंतिभार झाला आणि रंतिभाराचे सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले. अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते. कण्वाचा पुत्र मेधातिथी झाला. याच मेधातिथीपासून प्रस्कण्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले. सुमतीचा पुत्र रैभ्य झाला. याच रैभ्याचा पुत्र दुष्यंत होता.

            एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता. तेथे तो कण्व मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. त्या आश्रमात देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसली होती. तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता. त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहीत झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला. तिला पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला. त्याच्या मनात कामवासना जागृत झाली. थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने स्मित हास्य करीत तिला त्याने विचारले, "कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या हे देवी! तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस? माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी! या निर्जन वनात तु कशासाठी राहातेस? हे सुंदरी! मला निश्चितपणे असे वाटते की, तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस. कारण पुरुवंशीयांचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही."

            शकुंतला म्हणाली- "आपले म्हणणे बरोबर आहे. मी विश्वामित्रांची कन्या आहे. मेनकेने मला वनांमध्ये सोडून दिले होते. महर्षी कण्वांना हे माहित आहे. मी आपली काय सेवा करू? हे कमलनयना! आपण येथे बसावे आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावे. आश्रमात अन्न आहे. आपली इच्छा असेल तर भोजन करावे. आणि योग्य वाटत असेल तर येथेच राहावे.

            "हे सुंदरी ! तू कुशिकवंशात जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे. कारण राजकन्या स्वत:च आपल्याला योग्य असा पती वरतात. " शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश, काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंताने गांधर्वविधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला. अमोघवीर्य दुष्यंताने शकुंतलेशी सहवास केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला. योग्यवेळी शकुंतलेला एक पुत्र झाला.

            वनामध्ये कण्वांनी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले. तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे.
            भगवंतांचा अंशा अंशांशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणीरत्न शकुंतला पतीकडे आली. आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र याचा दुष्यंताने जेव्हा स्वीकार केला नाही, तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली. "माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे. वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो. कारण पिताच पुत्ररूपाने उत्पन्न होतो; म्हणून दुष्यंता ! तू शकुंतलेचा त्याग करु नकोस. आपल्या पुत्राचे पालन-पोषण कर राजन ! वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे. हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे. "

            दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा जन्म भगवंतांच्या अंशापासून झाला होता. आजसुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गाइली जाते. त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिन्ह होते आणि पायांवर कमलपुष्पाचे. महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर त्याला अभिषेक झाला. भरत अतिशय शक्तिशाली राजा होता. ममताचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित म्हणून नेमून गंगातीरावर पंचावन्न आणि यमुनातीरावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले. या यज्ञांमध्ये त्यांनी अपरंपार धनाचे दान केले. भरताने अग्नीस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली होती. त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक-एक बद्व (१३०८४) गाई दिल्या होत्या. अशा प्रकारे भरताने १३३ यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केले. शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळवून श्रीहरींना प्राप्त करून घेतले. यज्ञामध्ये "मष्णार ' नावाचे एक कर्म असते. त्यामध्ये भरताने सुवर्णविभूषित, पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले. भरताने जे महत्कर्म केले, ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकणार नाही. स्वर्गाला कोणी हात लावू शकतो काय ? भरताने दिग्विजय करतेवेळी किरात, हूण, यवन, अंध्र, कंक,शक, म्लेंच्छ इत्यादी सर्व ब्राह्मणद्रोही राजांना मारून टाकले. पूर्वी बलवान असुरांनी देवांवर विजय मिळवून ते रसातळात राहू लागले होते. त्यावेळी ते देवांगनांना रसातळात घेऊन गेले होते. भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणले. त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते. भरताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व देशांचे एकछत्री राज्य केले. शेवटी सर्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर्य, सार्वभौम संपत्ती, अखंड साम्राज्य आणि हे जीवनसुद्धा मिथ्या आहे, असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशू, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंत:करण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंजऱ्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्ण, वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्ष:स्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्ष:स्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरूण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हस्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले.
परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांच्यामध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ड्धनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहीत सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्नजडित कमरपट्ट्यसह पितांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - २

श्री गणेशाय नमः सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे,परंतु खोटे बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होत नाही. " ब्राह्मणांना बसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकाला, दारिऱ्याला, दुःखाच्या समुद्राला, राजाच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादि ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देऊन जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही, तर त्या त्यागापासून काय फायदा ? दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करूनसुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे ? हे ब्रह्मण, यापूर्वी ज्या दैत्यराज्यांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक-परलोक तर काळाने खाऊन टाकला; परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. गुरुदेव, युध्दात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत; परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रध्देने दान करतात, असे लोक मात्र दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्त्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले ? म्हणून मी या ब्रह्मचाऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन. माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले, तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही. कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे. जर हे पवित्रकीर्ती भगवान विष्णूच असतील, तर यश मिळविल्याखेरीज राहाणार नाहीत. युद्धात मला मारूनसुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील, तर युद्धात माझ्याकडून मारले जातील.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला. "मूर्खा, तू स्वतःला मोठा पंडित समजतोस ! गर्विष्ठ अशा तु माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल. " आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतरसुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळाला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले. त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली. तिने चरणप्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. बलीने मोठ्या आनंदाने स्वतःते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. एकाच वेळी हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, कींपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले, हे केवढे कठीण काम केले बरे !
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजन, कुलगुरु शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ, राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला.
बली म्हणाला - भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की, ज्यामुळे अर्थ, काम, यश आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. परंतु गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे "मी तुला देणार नाही" असे या ब्राह्मणाला कसे सांगू ? या पृथ्वीने म्हटले आहे की, " असत्याहून मोठा असा कोणताच धर्म नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...