अध्याय बारावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय बारावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०३ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय बारावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - कुशाचा पुत्र झाला अतिथी, त्याचा निषेध. निषधाचा नभ. नभाचा पुंडरिक आणि पुंडरीकाचा क्षेमधन्वा. क्षेमधन्व्याचा देवानीक, देवानीकाचा अनीह, अनीहाचा पारियात्र, पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ. हा सूर्याचा अंश होता.

वज्रनाभापासून खगण, खगणापासून विधृती, विधृतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला. हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता. कोसल-देशनिवासी याज्ञवल्क्य ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्मयोगाचे शिक्षण घेतले. तो योग्य हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता.

हिरण्यनाभाचा पुष्य, पुष्याचा ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण, अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरु झाला. मरूने योगसाधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो. कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करील.

मरूपासून प्रसुश्रुत, त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षणाचा जन्म झाला. अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाहृ. विश्वसाहृचा प्रसेनजित, प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्बल झाला. परीक्षिता ! या बृहद्बबलाला तुझ्या पित्याने अभिमन्यूने मारले.

इक्ष्वाकुवंशाचे इतके राजे होऊन गेले. आता येथून पुढे होणाऱ्यांविषयी ऐक.बृहद्लाचा पुत्र बृहद्रण. बृहद्रणाचा उरुक्रिय, त्याचा वत्सवृद्ध, वत्सवृद्धाचा प्रतिव्योम, प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक. दिवाकाचा वीर सहदेव, सहदेवाचा बृहदक्ष, बृहदश्र्वाचा भानुमान, भानुमानाचा प्रतीकाश्व आणि प्रतीकाश्र्वाचा पुत्र होईल सुप्रतिक. सुप्रतीकाचा मरुदेव, मरुदेवाचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा पुष्कर, पुष्कराचा अंतरिक्ष, अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजित होईल. अमित्रजितापासून बृहद्राज, बृहद्राजापासून बर्ही,बर्हीपासुन कृतंजय, कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल. संजयाचा शाक्य, त्याचा शुद्धोद, शुद्धोदाचा लांगल, लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होईल. क्षुद्रकापासून रणक, रणकापासून सुरथ आणि क्षुरथापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल. हे सर्वजण बृहद्लाचे वंशज होतील. इक्ष्वाकूंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील. कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होऊन जाईल.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वत:ला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. शंकरसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तिणीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने, उपवने. तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आच्श्रर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? भगवंतांनी पाहिले की,भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरूषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरुपी मायेने पूर्णपणे मोहीत होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहीत करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांच्या निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरुपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. " देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तु पाहिलीस ना ? मी सर्व कालांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद त्यांचे वर्णन करू शकत नाहीत.
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परिक्षिता, ज्यांनी समुद्र-मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र-मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली, तेव्हा ते गुढपणे हसून शंकरांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - ज्यावेळी अमृतकलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्रीरूप धारण केले होते. हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन. परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावांना उत्तेजित करणारे आहे.
श्रीशुक म्हणतात - असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहात तेथेच बसून राहिले. इतक्यात त्यांना एक उपवन दिसले. त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्याने तिचे स्तन आणि त्यावरील हार हालत होते. त्यावेळी वाटत होते की, जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणिक सावरिती आपली पालवी सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे, तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळे भोर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता. जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत, तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. चेंडूने खेळता खेळता किंचित लाजत स्मित हास्य करून तिरप्या नजरेने तिने शंकरांकडे बघितले. अशा तिला पाहताच शिव स्वत:ला विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहाता पाहाता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की, त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही.मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार ? एकदा मोहिनीच्या हातातुन चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. तीसुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. त्यावेळी शंकर पाहात असतानाच वाऱ्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली. मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोहर होते. जेथे दृष्टी पडेल, तेथे मन गुंतत असे. मोहिनीसुद्धा आपल्यावर आसक्त आहे, असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातुर झाले आणि पार्वती समोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्यापाठोपाठ गेले.
शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती. परंतु ती एके ठिकाणी थांबत नसे. भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तिणीच्या पाठीमागे धावत जातो. त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. हत्ती हत्तिणीला आलिंगन देतो, तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला, तेव्हा तिचे केस विस्कटले.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले.
श्रीमहादेव म्हणाले - देवाधिदेवा, आपण विश्वव्यापी, जगदीश्वर तसेच जगत्स्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थाचे मूळ कारण, ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरुपाला आदी मध्य आणि अंत नाहीत, ज्यांच्यामध्ये द्रष्टा-दृश्य, भोक्ता-भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य, चिन्मात्र ब्रम्ह आपणच आहात. कल्याणी इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आशक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृतस्वरुप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासूनसुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंदस्वरुप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जिवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणारे आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जिवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकाररूपाने असणारे सोने आणि मुळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत, जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खऱ्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्याकारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणांमुळे भेद आहे, असे वाटते. प्रभो, काहीजण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृति आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर माणतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, सत्या, ईशाना आणि अनुग्रह-या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष म्हणतात, तर दुसरे काहीजण स्वतंत्र, अविनाशी, महापुरुष माणतात, प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी-जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत, तेसुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत, तर ज्यांचे चित्त मायेने मोहीत आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार ? प्रभो ! आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायुप्रमाणे आकाशात अदृश्य राहूनसुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंद-मोक्ष हे सर्व जणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले,ते रुप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हांला ते पाहण्याची उत्कंठा आहे.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...