अध्याय सोळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय सोळावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सोळावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी "जशी आपली आज्ञा" म्हणून स्वीकार केला. त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून ते आपल्या आश्रमात परत आले. एकदा रेणुका गंगेवर गेली होती. गंधर्वराज चित्ररथ कमळपुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत, असे तिने तेथे पाहिले.ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. परंतु तेथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला. हवनाची वेळ टळून गेली असे पाहून ती महर्षी जमदग्नि शाप देतील असे वाटून भयभीत झाली. लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. पत्नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाले- "पुत्रांनो ! या पापिणीला ठार करा." परंतु त्यांनी तसे केले नाही. यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले. कारण आपल्या पित्याचे योगसामर्थ्य आणि तपश्चर्येचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते. या कृत्यामुळे सत्यवतीनंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले- "पुत्रा ! तुझी इच्छा असेल, तो वर माग. " परशुराम म्हणाले- "तात ! माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवोत. तसेच मी त्यांना मारले होते, याची त्यांना आठवण न उरो. " परशुरामांनी असे म्हणताच झोपेतून उठावे ,त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले. परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता.

            परीक्षिता ! सहस्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते, त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभरसुद्धा चैन पडत नसे. एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेले होते. ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्रबाहूची मुले तेथे येऊन पोहोचली. त्यावेळी जमदग्नी अग्निशाळेमध्ये पवित्रकीर्ती भगवंतांचेच चिंतन करण्यात मग्न होऊन बसले होते. त्याच वेळी त्या पाप्यांनी त्यांना मारले. परशुरामाची माता रेणुका दिनपणे त्यांना प्रार्थना करीत होती, परंतु ते नीच क्षेत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले. सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकूळ झाली. ती हातांनी आपली छाती बडवित "रामा ! पुत्रा रामा ! लवकर ये, " अशा हाका मारत जोरजोराने रडू लागली. परशुरामांनी लांबूनच आईचा "हे राम !" असा करूण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारले आहे. त्यावेळी परशुरामांना अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर क्रोध, असहिष्णुता, मानसिक व्यथा आणि शोकावेगाने ते दिड्मूढ झाले. " हाय तात ! आपण महात्मे व धर्मनिष्ठ होता. आपण आम्हांला येथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेलात !" अशाप्रकारे विलाप करुन त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावांकडे सोपविले आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला.

             परीक्षिता ! परशुरामांनी माहिष्मती नगरीत जाऊन सशस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या (छाटलेल्या) मस्तकांनी नगरीच्या मधोमध एका मोठा पर्वतच उभा केला. त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती, नीच क्षेत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती. त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली. तिला पाहूनच ब्राह्मणद्रोह्यांचे हृदय भयाने कापत असे. भगवंतांनी पाहिले की, सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत. म्हणून हे राजन ! त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि समंतपंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले. परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्याद्वारे सर्वदेवमय आत्मस्वरुप भगवंतांचे पूजन केले. यज्ञामध्ये त्यांनी पूर्वदिशा होत्याला, दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला, पश्चिम दिशा अध्वर्यूला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गागात्याला दिली. तसेच आग्नेय इत्यादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या. कश्यपांना मध्मभूमी दिली. उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसर्‍या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले. त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापातून मुक्त झाले आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागले. महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली. परशुरामांकडून सन्मानित होऊन ते सप्तऋषींच्या मंडळात सातवे ऋषी झाले. परीक्षिता ! कमललोचन जमदग्नीनंदन भगवान परशुराम पुढील मन्वन्तरामध्ये सप्तषींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. ते आजसुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत. तेथे सिद्ध, गंधर्व आणि चारण त्यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात. सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशाप्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला.

            प्रज्वलित अग्नीप्रमाणे परम तेजस्वी विश्वामित्र गाधीचे पुत्र झाले. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले. परीक्षिता ! विश्वामित्रांना शंभर पुत्र होते. त्यांपैकी मधल्या पुत्राचे नाव 'मधुच्छंद' होते. म्हणून सर्व पुत्र 'मधुच्छंद' या नावानेच प्रसिद्ध झाले. भृगुवंशी अजीगर्ताचा पुत्र जो शुन्य:शेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचे एक नाव देवराज असेही होते. विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले, " तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा. " जो हरीश्र्चद्राच्या यज्ञामध्ये यज्ञपशु म्हणून विकत आणला होता, तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी शुन्य:शेप होय. विश्वामित्रांनी प्रजापती, वरूण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडविले. हाच शुनःशेप देवतांच्या यज्ञात देवांनी विश्वामित्रांना दिला होता. म्हणून "देवै: रात: " या व्युत्पत्तीनुसार गाधिवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला. विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे जेष्ठ होते, त्यांना, शुन:शेपाला मोठा भाऊ मानावा, ही गोष्ट आवडली नाही. यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की, दुष्टांनो ! तुम्ही म्लेंच्छ व्हा, " अशाप्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंच्छ झाले, तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुच्छंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की,. " तात ! आपण आम्हांला जी आज्ञा कराल, तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. " असे म्हणून मधुच्छंदाने मंत्रदृष्ट्या शुन:शापाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले, " आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत. " तेव्हा विश्वामित्र आपल्या या आज्ञाधारक मुलांना म्हणाले " तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले. म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे. मी तुम्हांला आशीर्वाद देतो की, तुम्हांलासुद्धा सुपुत्र प्राप्त होतील. हा देवराज तुमच्याच गोत्राचा आहे. तुम्ही यांच्या आज्ञेत राहा. " विश्वामित्रांचे अष्टक, जय, क्रतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते. अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारणाने त्याचे प्रवरही अन्य झाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - ३

श्री गणेशाय नमः भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मणभोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसापर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मणभोजन घालावे.
            फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहानमोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या कडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृतस्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने, त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गाई इत्यादी दान करून संतुष्ट करावे. हीसुद्धा भगवंतांचीच आराधना होय.प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा घ्यावी. तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दीनदुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न-वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले, असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत्कथा यांच्यायोग्य भगवंतांचे पूजन करावे.
ही भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव "पयोव्रत" असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते. तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवंती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून, शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे; म्हणून याचे नाव 'सर्वयज्ञ' आणि 'सर्वव्रत' असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात, तेच खरे नियम होत. तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपच्श्रर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तु या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - २

श्री गणेशाय नमः अदितीने विचारले - भगवन, जगदीश्वर भगवंतांची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की, ज्यामुळे ते सत्यसंकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील. हे ब्राह्मणश्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे. ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील, तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा.
            कश्यप म्हणाले - संतान असावे असे मला जेव्हा वाटले, तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले, तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्लपक्षात बारा दिवसापर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि परम भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावास्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. "हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो ! तू माझी पापे नष्ट कर. " यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्त्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी पूजा स्थल सूर्य किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. (प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आवाहन करावे.) हे प्रभो, आपण सर्वशक्तीमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात; म्हणूनच आपणास "वासुदेव" म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सुक्षम आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायणीय आणि उदयनीय करणे ही दोन कर्मे ही मस्तके आहेत. प्राप्त:काळ मध्याहृकाळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत. चार वेद शिंगे आहेत. गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले, फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्वशक्तिसंपन, सर्व विद्यांचे अधिपती आणि भुतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर-नारायण ऋषीच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात, आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात; वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत.भगवान हृषीकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध,धूप इत्यादी अर्पण करून व्दादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी‌. ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप-गूळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वत: खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिना घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसांनंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली, तेव्हा ते अदितिच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की, तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तिथे जाऊन आसनावर बसले, तेव्हा अदितिने विधिपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले. "कल्याणी, या वेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आलेले नाही ना ? धर्म बुडाला नाही ना ? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना ? प्रिय, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत, त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणार आहे. त्या गृहस्थाश्रमींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना ? (किंवा) तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करता ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील, म्हणून तर तू उदास नाहीस ना ? आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊनसुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरी निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल, म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का ? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मूख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हींचे पूजन केले, तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुझ्या बर्‍याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना ?
आदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मण ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तिस्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे आग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही ? हे मरीचीपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहाण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढली आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील.
श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यानी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कोणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही ही बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्ताचे दुःख दूर करणाऱ्या, जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...