अध्याय अकरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय अकरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते ? तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्यानिवासी प्रजाजन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत ?

            श्रीशुक म्हणतात - त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः निजजनांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तीच्या मदरसाने भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की, ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सभाग्रहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्णकलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांसह सुपारीचे घोष, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरसे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगल चित्रांनी आणि पाना-फुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करित की, "महाराज ! पूर्वी आपणास वराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता. आता आपण तिचे पालन करावे. " पुष्कळ वर्षानंतर महाराज आलेले कळले, तेव्हा सर्व स्त्रि-पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन पाहात पाहात त्यांच्यावर भगवंतांना फुलांचा वर्षाव करीत.

            अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पुर्वज राजे राहात असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते की ज्यातील संपत्ती कधी संपत नसे. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळशा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबराची दारे पोवळ्यांनी मडविलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरश्या होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगी-बेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोगसामग्री, सुगंधी धूप, दीप, तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महान अतिशय सजविलेले होते. अलंकार यांनी ते महाल अतिशय सजविलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री-पुरुष तेथे राहात कसत. आत्माराम जितेंद्रय पुरुषांत अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्नी श्रीसीतादेवींसह आनंदात राहात असत. सर्व स्त्री-पुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ-काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असता त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्नीला म्हणत होता. तू दुष्ट आणि कुलटा आहेस. तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस. स्त्रीलोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही. मूर्ख लोकांना खूष ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिऊन सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मीकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मीकींनी त्यांचे जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश व लव अशी नावे ठेवली. परीक्षिता ! लक्ष्मणाला अगंद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भारतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते. तसेच शत्रूघ्नालाही दोन पुत्र झाले - सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला. त्याने त्यांची सर्व संपत्ती म्हणून ती श्रीरामाकडे सोपविली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधुचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसविली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकीच्या हाती सोपविले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धीपुर:सर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त, विषयी पुरुषांच्यासबंधी काय सांगावे ?

            यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचार्य धारण करून तेरा हजार वर्षेपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले.

            भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ कसा असू शकेल ? देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नाव्हे की, त्यांनी शास्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहाता, शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे साहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती ? ही सर्व त्यांची लीलाच आहे.

            ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीसुद्धा आज उजळ करते, मोठ-मोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट जेथे टिकवतात, त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांच्या सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले ते सगळे अयोध्यानिवासीसुद्धा त्याच लोकी गेले, जेथे योगी योगसाधनेने जातात. राजा ! जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते. आणि तो सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीरामांनी वसिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्वदेवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अध्वर्यूला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती, ती त्यांनी आचार्यांना दिली. त्यांना माहीत होते की, संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ नि:स्पृह ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्यालंकारच शिल्लक राहिले.

            जेव्हा आचार्यादी ब्राह्मणांनी पाहिले की, भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंत:करणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले. " प्रभु ! आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञानांधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हांला काय दिले नाहीत बरे ? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरणकमल दिले आहेत. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्ट दैवत मानता. भगवान ! अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, " हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. " ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. म्हणून इंद्राने सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली. गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसऱ्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले.
नारद म्हणाले - दिवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा.
श्रीशुक म्हणतात - देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणाऱ्या बलीला पराजित होउनसुद्धा खेद झाला नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमूची,बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केली. पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली. नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे,रथ,ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्राप्त:काळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश आणि पृथ्वी उजळून शोकतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली.
परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करू लागला. "इंद्रा, आता तू वाचत नाहीस ! "अशी आरोळी ठोकीत सैन्याच्या घंटा असलेल्या एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला नमूचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आच्श्रर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, " सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ?" पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या प्रर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्र्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले. मुर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन उठून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरूनसुद्धा खाली ढकलून देतो. अरे मतिमंदा, आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो.
            बली म्हणाला - जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात, त्या सर्वांनाच जयपराजय, यशापयश किंवा मृत्यु क्रमाने प्राप्त होतोच. म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. हे तुम्हांला माहीत दिसत नाही ! या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही.
            श्रीशुकदेव म्हणतात - वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारले. त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. सत्यवादी, देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला. तो पाणउतारा त्याला सहन झाला नाही. शत्रूंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासुर, आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महावलीने ऐरावतावरसुद्धा गदेचा एक तडाखा दिला. गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूच्छित होऊन पडला. त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडवले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...