श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते ? तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्यानिवासी प्रजाजन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत ?
श्रीशुक म्हणतात - त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः निजजनांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तीच्या मदरसाने भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की, ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सभाग्रहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्णकलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांसह सुपारीचे घोष, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरसे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगल चित्रांनी आणि पाना-फुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करित की, "महाराज ! पूर्वी आपणास वराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता. आता आपण तिचे पालन करावे. " पुष्कळ वर्षानंतर महाराज आलेले कळले, तेव्हा सर्व स्त्रि-पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन पाहात पाहात त्यांच्यावर भगवंतांना फुलांचा वर्षाव करीत.
अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पुर्वज राजे राहात असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते की ज्यातील संपत्ती कधी संपत नसे. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळशा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबराची दारे पोवळ्यांनी मडविलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरश्या होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगी-बेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोगसामग्री, सुगंधी धूप, दीप, तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महान अतिशय सजविलेले होते. अलंकार यांनी ते महाल अतिशय सजविलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री-पुरुष तेथे राहात कसत. आत्माराम जितेंद्रय पुरुषांत अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्नी श्रीसीतादेवींसह आनंदात राहात असत. सर्व स्त्री-पुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ-काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा