स्कन्ध सातवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्कन्ध सातवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ५

श्री गणेशाय नमः जे विवेकी पुरुष सोनुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वेत आणि द्रव्याद्वेत अशा त्रिविध अद्वेताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे 'भावाद्वैत'.(परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) युधिष्ठीरा! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वत: परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे 'क्रियाद्वैत' होय. स्वतः स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, याच प्रकारचा विचार म्हणजे 'दद्रव्याद्वैत' होय.
            युधिष्ठीरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तीकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठीरा, हेच पहा ना! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले.
            पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अत्यंत प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलाचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह(वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हे आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शुध्द जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवासुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने ग्रहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो.
            या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रम्ह मनुष्यरूपात गुप्तरुपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहीत, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत!
श्रीशुक म्हणतात- देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली.भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.अशाप्रकारे मी तुला दक्षकन्यांचा वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असूर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ४

श्री गणेशाय नमः वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तीपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चतुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्यदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना 'इष्ट' म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पानपोई घालने यांसारखी लोकोपयोगी कामे ही 'पूर्तकर्मे' होत.ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यानंतर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सुक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धुमाभिमानी दैवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सुक्षम देह अनुक्रमे वनस्पती,अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्यांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादीसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्ण समुदायाला 'अ उ म' या तीन स्वरांच्या रूपात राहाणाऱ्या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राण्यामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याहृ, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले 'विश्व' शरीर सुक्ष्मामध्ये विलीन करून सुक्षम उपाधियुक्त 'तैजस' होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक 'प्राज्ञ' होतो. नंतर त्या शरीराचा लय करून 'तुरीय' रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहातो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्राह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही.
            पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारुपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तू़च्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खाऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्याला अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून - सुक्ष्मभुतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवाचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी-निषेधाचे शास्त्र असते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे. राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामदी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्यानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही.
            जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा,कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रत्तांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मुर्खाची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करीत ?
            उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे - शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे.( ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) राग, द्वेष, लोभ,शोक, मोह,भय, मद, मान,अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपाट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद,भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही वेळा सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. हा मनुष्यशरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. अन्यथा, बेसावध जीवाला हे इंद्रियरुप दुष्ठ घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरुप लुटारूंच्या हातात देतील.ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमय संसाराच्या विहिरीत ढकलून देतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीरनिर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता आजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीपरायण पुरूषाची निवृत्ती त्याची उपजीविका चालविते, आत्मसुखात रममाण होणार्‍या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते,जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुठ्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अंध:पतित होतात.
            संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. आध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योगसाधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. आधिभौतिक दु:खाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि अध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्त्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्र्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात.
            शास्त्रामध्ये जितके नेयम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नेयमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत. उलट अनर्थकारक फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपर्च्श्रेमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरुपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योगसाधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणाऱ्यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देते. अन्नसमर्पण करतेवेळी देव, ऋषि, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वत:ला सुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे.
            धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतः ही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहींसिने नाही. ज्या लोकांना सद्धर्मपानाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांची हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशूपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या, मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे.
            विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत.अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा. धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो 'विधर्म' होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म 'परधर्म' होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे 'उपधर्म' किंवा 'उपमा' होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा 'छल' होय. आपल्या आश्रमाहुन वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो 'आभास' होय. आपल्याला स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. ज्यांच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजारपटीने फळ मिळते.
            युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरवली आहे. राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो.त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादीची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरुपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठीरा, भगवंत या मनुष्यदी शरीरांमध्ये त्यांच्या वेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत.
            युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्य परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रध्देने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतू जे माणसांचा द्वेष करतात. त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधूळीने तिन्ही लोक पवित्र करतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामुग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. जर आपला अधिकार इत्यादी, आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे.
            धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र,जसे चित्रा, विशाखा, जेष्ठा इतक्यादिंनी युक्‍त असेल ती पौर्णिमा; मग त्यादिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्मनक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत. तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः युधिष्ठिराने विचारले - हे देवर्षी, माझ्यासारखा ग्रहाशक्त माणूस सहजपने कोणत्या साधनेने हे पद प्राप्त करू शकेल ?
            नारद म्हणाले ? राजा ! मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थधर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी. सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे. जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहात नाही, तसेच सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल, तसतशी आपोआप सुटणाऱ्या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणहून सोडावी. बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी. अधिक नको. आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा. माता-पिता, बंधू-बांधव, पुत्र-मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील, त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा.
            बुद्धिमान पुरूषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. जेवढ्यावर भूक भागेल, तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे, असे मानतो, तो चोर होय. तो शिक्षेला पात्र ठरतो. हरिण,उंट, गाढव,वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणे समजावे. तसे पाहता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे ? गृहस्थाश्रमी मनुष्यानेसुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. आपल्याकडील सर्व सामुग्री कुत्री, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतरच स्वतः उपयोगात आणावी. एवढेच काय,जिला मनुष्य आपली समजतो, त्या आपल्या पत्नीलासुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे. जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात, प्रसंगी आपले आई-बाप आणि गुरूलासुद्धा मारतात, त्या पत्नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले, त्याने नित्यविजयी भगवंतांवरसुद्धा विजय मिळविला असे समजावे. शेवटी किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कोठे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा. जर वस्र नेसावयाचे असेल, तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तूंखेरीज, त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. संन्याशाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वत:तच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा. हे संपूर्ण विश्व, कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारणस्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे. आत्म्याकडेच लक्ष असणाऱ्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही, असे समजावे. शरीराच्या अवश्य होणाऱ्या मृत्यूचे किंवा अनिश्र्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये. सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या काळाची फक्त वाट पाहात राहावे. अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांची आवड नसावी. आपल्या जीवननिर्वाहासाठी काही काम करू नये. केवळ वाद-विवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. शिष्यसमुदाय जोडू नये, पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत. शांत, समदर्शी, महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही. आपल्या आश्रमाची चिन्हे त्याने धारण करावीत किंवा करू नयेत. त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह असो; परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे. त्याने अत्यंत विचारशील असावे, परंतु लोकांत वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे. स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की, हा मुका आहे.

            याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे. भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता. त्याने पाहिले की, सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते. त्यांचे कर्म, रूप, वाणी आणि वर्ण-आश्रम- चिन्हे यांवरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत, हे लोकांना समजू शकत नव्हते. भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला. ब्रह्मण, उद्योगी आणि भोगी पुरुषांच्याप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे की, उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते. याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहाता. म्हणून आपल्याजवळ धन नाही. मग आपल्याला भोग कोठून मिळणार ? भोगाखेरीजच आपले हे शरीर धष्टदुष्ट कसे ? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल, तर सांगावे. आपण विद्वान, समर्थ आणि चतुर आहात. आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे. असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहूनसुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय ?

             नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

             अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...