अध्याय चौदावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय चौदावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०८ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः बिछान्यावर उर्वशी नाही, असे पाहून राजा खिन्न झाला. त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते. तो तिच्यासाठी शोकविहृल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुक मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले. "प्रिये ! थांब, थांब. हे निष्ठुरे ! निदान आज तरी मला सुखी केल्यावाचून तू जाऊ नकोस. ये. आपण दोघे काही वार्तालाप करू. देवी ! आता या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला नाही, म्हणून तू याला आता लांब फेकून दिले आहेस. म्हणून माझे हे सुंदर शरीर आता येथे पडेल आणि लांडगे व गिधाडे यांना खाऊन टाकतील."

            उर्वशी म्हणाली- "तू पुरुष आहेस. असा मरू नकोस. या लांडग्यांनी तुला खाऊ नये. स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते. स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे ह्रदय अगदी एकसारखे असते. स्त्रिया निर्दय, क्रूर, असहनशील आणि धाडसी कामे आवडणाऱ्या असतात. थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करुन आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात. सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते. भोळ्याभाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने कुलटा आणि स्वैर बनतात. हे राजा, प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहाशील. तेव्हा तुला आणखीही मुले होतील. "

            उर्वशी गर्भवती आहे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला. एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला. तोपर्यंत उर्वशी एका वीर-पुत्राची माता झाली होती. उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला. पुन्हा विरहदुःखाने अत्यंत दिन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली. "तू या गंधर्वाची स्तुती कर. हे मला तुझ्याकडे सोपवतील. "तेव्हा पुरूरव्याने गंधर्वाची स्तुती केली. परीक्षिता ! पुरूरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. ही उर्वशी आहे, असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसर्‍या वनात फिरू लागला.

            जेव्हा तो सावध झाला, तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले, तेव्हा त्याच्या हृदयात तीन्ही वेद प्रगट झाले. नंतर जेथे त्याने अग्नीपात्र टाकले होते, तेथे तो गेला. आता त्या ठिकाणी शमीवृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता, तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या. नंतर त्याने उर्वशीलोकांची प्राप्ती व्हावी, या इच्छेने खालील अरणीला उर्वशी, वरच्या अरणीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्र्यांनी मंथन केले. त्या मंथनामुळे 'जातवेदा' नावाचा अग्नी प्रगट झाला. राजा पुराव्याने अग्नीदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरूरव्याने त्या तीन अग्नींच्या द्वारे सर्वदेवस्वरूप, इंद्रियातीत, यज्ञपती भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला.

            त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ॐकार हाच वेद होता. सर्व वेद-शास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती. देव फक्त नारायणच होता. आणखी कोणी नव्हते. अग्नी एकच होता आणि 'हंस' हा एकच वर्ण होता.
परीक्षिता ! त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरूरव्यापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला. पुराव्याने अग्नीचा संतानरूपाने स्वीकार करून गंधर्वलोकांची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरूरवा म्हणाला - हे सुंदरी ! तुझे स्वागत असो. बैस. मी तुझी काय सेवा करू ? तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळापर्यंत चालत राहो.

            उर्वशी म्हणाली - हे सुंदरा ! कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही ? कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही. राजन ! जो पुरुष रूप-गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो, तोच स्त्रियांना हवाहवासा वाटतो. म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन. परंतु महाराज ! मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे. आपण यांचे रक्षण करावे.

            हे वीरशिरोमणी ! मी फक्त तूप खाईन आणि मैथुनाव्यातिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये. मनस्वी पुरुरव्याने "ठीक आहे" असे म्हणून तिची अट मान्य केली. आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला "पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भूत आहे. तुझा भावही अलौकिक आहे. तर मग हे देवी ! स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही ?"

            तो पुरुषश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार करू लागला. उर्वशीच्या शरीरातुन कमलकेसरासारखा सुगंध येत होता. राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंदविहार केला. तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध हरपून जात असे. उर्वशी नाही, असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविले. "उर्वशीखेरीज मला हा स्वर्ग सुना सुना वाटतो, " असे तो म्हणाला. मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते, ते त्यांनी चोरले. पुत्रासमान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले. तेव्हा ती म्हणाली, अरेरे ! स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुसकासारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला. यांच्यावर विश्वास ठेवल्याकारणाने माझा सर्वनाश झाला. लुटारूंनी माझ्या मुलांना पळवून नेले. पहाना ! हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिऊन झोपून राहातो. जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा. त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वागबाणांनी राजाला घायाळ केले. तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला. तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या.राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. (झाली ! ती लगेच त्याला सोडून निघून गेली.)

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो. या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठ-मोठ्या पवित्रकीर्ती राजांचे वर्णन आहे.

हजारो मस्तके असणाऱ्या विराटपुरुष नारायणांच्या नाभिसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते. त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला. यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. देवगुरु बृहस्पतींनी आपली पत्‍नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली. परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की, त्याने तिला मुळीच परत दिले नाही. याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली. देवराज इंद्रानेसुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली. अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला.

त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली. यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भर्त्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. तेव्हा तारा गर्भवती आहे, असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले. " दष्टे ! माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक. हे स्त्रिये, मी तुला जाळून टाकणार नाही. कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तिची इच्छा आहे. पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली. तिने सोन्यासारख्या चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला. त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनीही वाटू लागले की, हा आपल्याला मिळावा. आता ते एकमेकांशी "हा तुझा नाही, माझा आहे. " असे म्हणत जोरजोराने भांडू लागले. ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता, लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या मातेच्या दिखाऊ लज्जेने रागावून बोलक म्हणाला, "दुराचारिणी ! तू बोलत का नाहीस ! मला लवकर सांग तुझे कुकर्म. " त्याचवेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले. तेव्हा तारा हळूच म्हणाली 'चंद्राचा.' म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले. परीक्षिता ! ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव 'बुध' असे ठेवले. कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला.

परीक्षिता ! बुधापासून इलेला पुरूरवा झाला. याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे. एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरूरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते. ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरूरव्याकडे आली. उर्वशीला जरी मित्रावरूणांच्या शापामुळेच मृत्युलोकात यावे लागले होते, तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे, असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली. देवांगना उर्वशीला पाहून पुरूरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले. त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. गोड शब्दांत तो म्हणाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौदावा

श्री गणेशाय नमः राजाने म्हटले - भगवन, हे मनू इत्यादी आपापल्या मन्वन्तरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात, ते मला सांगा.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! मनू, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत. राजन, भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले, त्यांच्याच प्रेरणेने मनू इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवतात. चारी युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो, तेव्हा ऋषी आपल्या तपश्र्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातनधर्माचे रक्षण होते. राजन, भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मन्वन्तरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात. संपूर्ण मन्वन्तरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञांत ज्यांचा संबंध आहे, त्यांच्याबरोबर देव त्या त्या मन्वन्तरांमध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. इंद्र, भगवानांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपयोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पडतो. भगवंत युगा-युगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात, राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. नाम-रूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात; परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत.
            मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला. इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये चौदा मन्वन्तरे सांगितली आहेत.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. ज्यांच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजारपटीने फळ मिळते.
            युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरवली आहे. राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो.त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादीची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरुपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठीरा, भगवंत या मनुष्यदी शरीरांमध्ये त्यांच्या वेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत.
            युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्य परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रध्देने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतू जे माणसांचा द्वेष करतात. त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधूळीने तिन्ही लोक पवित्र करतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामुग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. जर आपला अधिकार इत्यादी, आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे.
            धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र,जसे चित्रा, विशाखा, जेष्ठा इतक्यादिंनी युक्‍त असेल ती पौर्णिमा; मग त्यादिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्मनक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत. तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः युधिष्ठिराने विचारले - हे देवर्षी, माझ्यासारखा ग्रहाशक्त माणूस सहजपने कोणत्या साधनेने हे पद प्राप्त करू शकेल ?
            नारद म्हणाले ? राजा ! मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थधर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी. सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे. जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहात नाही, तसेच सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल, तसतशी आपोआप सुटणाऱ्या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणहून सोडावी. बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी. अधिक नको. आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा. माता-पिता, बंधू-बांधव, पुत्र-मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील, त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा.
            बुद्धिमान पुरूषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. जेवढ्यावर भूक भागेल, तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे, असे मानतो, तो चोर होय. तो शिक्षेला पात्र ठरतो. हरिण,उंट, गाढव,वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणे समजावे. तसे पाहता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे ? गृहस्थाश्रमी मनुष्यानेसुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. आपल्याकडील सर्व सामुग्री कुत्री, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतरच स्वतः उपयोगात आणावी. एवढेच काय,जिला मनुष्य आपली समजतो, त्या आपल्या पत्नीलासुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे. जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात, प्रसंगी आपले आई-बाप आणि गुरूलासुद्धा मारतात, त्या पत्नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले, त्याने नित्यविजयी भगवंतांवरसुद्धा विजय मिळविला असे समजावे. शेवटी किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कोठे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...