अध्याय चौथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय चौथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय चौथा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! जेव्हा वसुदेव परत आले, तेव्हा नगरच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे आपोआपच पहिल्याप्रमाणे बंद झाले. यानंतर बालकांच्या रडण्याचा आवाज ऐकून द्वारपाल उठले. ते ताबडतोब कंसाकडे गेले आणि देवकीला मुल झाल्याचे त्यांनी सांगितले. भयभीत कंस याच गोष्टीची वाट पाहात होता. ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावरून उठून लगबगीने सुतिकाग्रहाकडे गेला. हा आपल्या काळाचाच जन्म आहे, असे समजून तो व्याकूळ झाला होता आणि यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेतच तो अडखळत चालला होता. तेथे येताच सती देवकी दीनवाणी होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली, "हे माझे हित चिंतिणाऱ्या बंधो ! ही कन्या तुला सूनेप्रमाणे आहे. शिवाय स्त्रीला मारणे मुळीच योग्य नाही. हे बंधो ! तू माझ्या पुष्कळ अग्नीसमान तेजस्वी बालकांना दैववशात मारले आहेसच.निदान आता ही कन्या तरी मला दे. हे राजा, माझी अनेक मुले मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहिण आहे. म्हणून हे बंधो ! मला अभागिनीला हे शेवटचे मूल तरी दे. "
            श्रीशुक म्हणतात - मुलीला कवटाळून देवकीने अत्यंत दिनपणे रडत रडत अशी याचना केली. परंतु दुष्ट कंसाने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली. आपल्या त्या नवजात भाचीचे पाय पकडून कंसाने तिला जोराने एका खडकावर आपटले. त्याच्या हृदयातील प्रेमाला जणू स्वार्थाने मुळासकट उपटून टाकले होते. परंतु श्रीकृष्णाची ती धाकटी बहिण त्याच्या हातातून निसटून आकाशात ताबडतोब आकाशात गेली आणि तीच आपल्या आठ हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली. ती दिव्य माळा, वस्त्रे, चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्रिशूळ,बाण,ढाल, तलवार, शंख, चक्र आणि गदा ही आठ आयुधे होती. सिद्ध, चारण, गंधर्व,अप्सरा, किन्नर आणि नाग पुष्कळशा भेटवस्तू तिला अर्पण करून तिची स्तुती करीत होते.देवी कंसाला म्हणाली. "अरे मुर्खा ! मला मारून तुला काय मिळणार आहे ? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कोठेतरी जन्मला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस. असे म्हणून भगवती योगमाया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली.

देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला. अग ताई ! अहो भावोजी ! अरेरे ! मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याचप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली.मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल, बरे ! मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली ! तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही.
            जे लोक ते तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात यामुळेच पुत्रादी देहांशी सयोग व वियोग होतो, तेव्हा (सुख-दुःखरुपी) संसारातून सुटका होत नाही. म्हणून हे ताई ! मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस; कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की, "आपण मरणारा आहे किंवा मारणारा आहे,) तोपर्यंत शरीराच्या जन्म-मृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा वा पीडा भोगणारा होतो. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी; कारण तुम्ही सजन असून दिनांचे रक्षण करणारे आहात. असे म्हणून व कंसाने देवकी-वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. कंसाला पश्चाताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले. "हे कंसा ! तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव, शरीर इत्यादींना मी असे समजतो. यामुळेच आप-परभाव निर्माण होतो. आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात. आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसऱ्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत, याचे त्यांना भान राहात नाही. "

श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपटभावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते, ते सर्व त्यांना कथन केले. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते.दैत्य असल्यामुळे स्वभावत:च ते देवांचा द्वेष करीत. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले. "भोजराज ! असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या इत्यादी ठिकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो. रणांगनाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत ? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकूनच नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दिनपणा प्रगट करू लागतात. तर काही जण शेंड्या सोडून व कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की, " आम्ही भयभीत झालो आहोत. आमचे रक्षण करा. " जे शत्रू शस्त्रास्त्रप्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, जे भयभीत झाले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची धनुष्ये मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरवली आहे, अशांना आपण मारीत नाही. जेथे भांडण-तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारकी मारतात. ते, तसेच एकांतवासात राहाणारा विष्णू , वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे ? आमचे मत असे आहे की, असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये; कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट करतो आणि मग असाध्य होतो. किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवितो आणि मग त्याचा प्रभाव पराभव करणे अवघड होऊन बसते. देवांचा आधार विष्णू आहे आणि जेथे सनातनधर्म आहे, तिथे तो राहातो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ; ही सनातन धर्माची मुळे होत. म्हणून हे भोजराज ! वेदवेत्ते ब्राह्मण, तपास्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हविद्रव्य देणाऱ्या गाईंचा आम्ही संपूर्ण नि:पात करू. ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. तो विष्णुच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहातो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे.
            श्रीशुक म्हणतात - अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला - मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला. त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संताचा द्वेष केला. जे लोक संतांचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, यह-परलोक, आशा-आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ४

श्री गणेशाय नमः मी, भगवान शंकर, भृगु इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियमांची बंध्द आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो. (त्यांच्या भक्तांचा द्रोह करणाऱ्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत.) ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले, तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले.
            श्रीमहादेव म्हणाले - ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे, योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहातात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही.
            मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव,अपांतरतम,देवल,धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर-असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही. कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले, तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले. ते म्हणाले,"हे अच्युता ! अनंता ! संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परम प्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो.
            श्रीभगवंत म्हणाले - हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या आधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्रह्मण ! माझ्या भक्तांच्या एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधूस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक, हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वत:ला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य-सारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांच्यासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत ? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, एक. मी तुला उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्यांच्याकडेच तू जा. निरापराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होते.
            तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा ! तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्यांची क्षमा माग,तरच तुला शांती मिळेल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ३

श्री गणेशाय नमः त्यांना पाहाताच राजा उठून उभा राहीला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वासमुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार-विनिमय केला.तो म्हणाला," ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही, असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो." असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहात राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे, हे ओळखले. त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले. "राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा ! हा कसला विष्णुभक्त ! मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. तो प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायाच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहुन एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूत्कारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दूर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे, असे पाहिले, तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्यामागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले, तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वासमुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा तर ते अधिकच घाबरले आता शोधत ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा.
            ब्रह्मदेव म्हणाले - दोन परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरुप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील, त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणाले - भाग्यवान अंबरीषाला सप्तव्दीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या, तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानीत असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो, हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ) वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये, वाणी भगवद़ॖणानुवर्णनामध्ये, हात हरीमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंगप्रत्यंग भगवभ्दक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादसेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे, भगवंतांना सर्वांत्मा तसेच सर्वस्वरूप समजून, त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष, इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवद्भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने 'धन्व' नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ, असित, गौतमी इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत, तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रुपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायिलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यामुळे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणार्‍या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोगसामुग्री आनंदित करू शकत नव्हती.तिला होणार्‍या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळू हळू त्याने सर्व प्रकारच्या आशक्तींचा त्याग केला. घर, स्त्रि, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती,रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे, असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रुंना भयभीत करणारे आणि भगवदक्तांचे रक्षण करणारे सुदर्शनचक्र दिले होते.
            एकदा त्याने आपल्यासारखाच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंत:करणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गाई पाठविल्या. त्या गाईची शिंदे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गाई गरीब, तरुण, दिसावयास सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, " बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की,"आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत. " तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. " वडील म्हणाले, " मुला ! तु त्यांचे म्हणणे ऐकू नकोस." अंगिरस-गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्र्वदेवसूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील, तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा." आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरसगोत्राच्या ब्राह्मणांनीसुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले.
            नाभाग ते धन घेऊ लागला, तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला- "या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे, ते सर्व धन माझे आहे."
             नाभाग म्हणाला, "ऋषींनी हे धन मला दिले आहे; म्हणून माझेच आहे. " यावर तो पुरुष म्हणाला, "आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, "दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की, यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील, तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल. म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे." नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, " प्रभू ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत, असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्रह्मण ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो. "( तेव्हा भगवान रुद्र म्हणाले), " तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तूसुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. " एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो, तो प्रतीभावत, वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपालासुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही.
            राजाने विचारले - भगवन ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौथा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परिक्षिता ! भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यासह तेथून निघून गेले. हे आपले प्रारब्ध होते, असे इंद्रद्युम्नाने मानले. यानंतर स्वतःचे विस्मरण घडविणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला पार्षद बनविले. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षदरुप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामकडे गेले. हे कुरुश्रेष्ठ परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकविली. ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. म्हणूनच (आपले) कल्याण इच्छिणारे द्विजगन दुःस्वप्न इत्यादीच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करतात. हे कुरूश्रेष्ठा, गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्वव्यापक तसेच सर्वभूतस्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले.
श्रीभगवान म्हणाले - जे लोक पहाटे उठून इंद्रियनिग्रह करून, एकाग्र चित्ताने माझे, तुझे तसेच हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत,वेळू आणि बांबू यांची बेटे, येथील दिव्य वृक्ष, माझे, ब्रह्मदेवाचे आणि शंकराचे निवासस्थान असलेली ही शिखरे, माझे प्रिय ठिकाण सिरसागर, प्रकाशमय श्र्वेतदीप, श्रीवत्स, कौस्तूभमणी, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षिराज गरुड, माझा सुक्ष्म अंश असणारा शेष, माझ्या आश्रयाने राहाणारी लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रल्हाद, मत्स्य, कच्छप, वराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नि, ॐकार, सत्य, मूलप्रकृती, गाय, ब्राह्मण, अविनाशी सनातनधर्म, सोम, कश्यप, आणि धर्माच्या पत्न्या दक्षकन्या, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत हत्ती, ध्रुव, सप्त ब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील, त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल. कारण ही सगळी माझीच रुपे आहेत. हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील, त्यांना मृत्युसमयी मी निर्मळ बुद्धी देईल.
श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौथा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषि आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हूहू" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला.
भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रप्रदुम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्टमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला तीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...