श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीष होता, असे मी पूर्वी सांगितले. त्याचा आजोबा युवनाश्र्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यौवनाश्र्व आणि यौवनाश्र्वाचा पुत्र हारीत झाला. मांधांत्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्कत झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरूकुत्साला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन, वध करण्यायोग्य गंधर्वांना, पुरूकुत्साने मारले. यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की, जो या प्रसंगाचे स्मरण करील, त्याला सापांपासून भीती राहणार नाही. पूरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हर्यश्र्व. त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत. हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता, तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला. परंतु विश्वमित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले. तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो.
त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी यांच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले. हरिष्चंद्राला संतान नव्हते. म्हणून तो अतिशय उदास असे. नारदाच्या उपदेशानुसार तो वरूणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की, 'प्रभो ! मला पुत्रप्राप्ती व्हावी. महाराज ! जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. वरून म्हणाले - "ठीक आहे." तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिष्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरूण येऊन म्हणाले, " हरीचंद्रा ! तुला पुत्रप्राप्ति झाली आहे. आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला - "हा यज्ञपशु दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल. " दहा दिवसांनंतर वरूण पुन्हा येऊन म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला- " जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडात दात येतील, तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. " दात आल्यानंतर वरूण म्हणाले, "आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील, तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल. " दुधाचे दात पडल्यानंतर वरूण म्हणाले, " आता या यज्ञपशुचे दात पडले आहेत; माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील, तेव्हा हा पशू यज्ञासाठी योग्य होईल. " दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " वरूण महाराज ! क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो. तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. " अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा