श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणिमात्रांचे सुहृद भगवान शंकर करूणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले.
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पाहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या शरण अभंग प्राण्यांना सज्जन दुसऱ्याच्या प्राण्याचे क्षणभंगुर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो.
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून विष पिण्याची तयारी केली.देवांना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वत:च ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे.
सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप,अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा