२८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात. हे गिरीशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रीपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहातात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहाता. म्हणून जे लोक आपल्याला असक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठूर आहात असे म्हणतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादीकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगाण केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणिमात्रांचे सुहृद भगवान शंकर करूणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले.
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पाहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या शरण अभंग प्राण्यांना सज्जन दुसऱ्याच्या प्राण्याचे क्षणभंगुर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो.
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून विष पिण्याची तयारी केली.देवांना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वत:च ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे.
सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप,अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...