श्रीभगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरुपी मायेने पूर्णपणे मोहीत होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहीत करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांच्या निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरुपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. " देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तु पाहिलीस ना ? मी सर्व कालांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद त्यांचे वर्णन करू शकत नाहीत.
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परिक्षिता, ज्यांनी समुद्र-मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र-मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा