१४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरंजयाचा पुत्र अनेना होता. त्याचा पुत्र पृथू झाला. पृथूचा विश्वरन्धी, त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्र्व. युवनाश्र्वाचा पुत्र झाला शाबस्त. त्याने शाबस्तुतीपुरी वसविली. शाबस्ताचा पुत्र बृहदश्र्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्र्व झाला. हा अत्यंत बलशाली होता. त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी आपली एकवीस हजार पुत्र बरोबर घेऊन धुंधू नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणूनच त्याचे नाव 'धुंधुमार' असे पडले. धुंधू दैत्याच्या मुखातील आगीमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले. फक्त तीनच जिवंत राहिले. परीक्षिचा ! जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे दृढाश्व, कपिलाश्र्व आणि भद्राश्र्व अशी होती. दृढाश्र्वापासून हर्यश्र्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला.

            निकुंभाचा बर्हणाश्र्व, त्याचा कृशाश्र्व, सेनजित आणि सेनजिताचा युवनाश्र्व नावाचा पुत्र झाला. युवनाश्र्वाला संतान नव्हते. म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यासह वनामध्ये निघून गेला. तेथे दयाळू ऋषींनी युवनाश्वाकडून एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ करविला. रात्रीच्या वेळी युवनाश्र्वाला तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला. परंतु ऋषी झोपलेले आहेत, असे पाहून अभिमंत्रित केलेले पाणीच तो प्याला. परीक्षिता ! जेव्हा ऋषी उठले, तेव्हा कलशात पाणी नाही, असे पाहून त्यांनी विचारले की, " हे कोणाचे काम आहे ? पुत्र उत्पन्न करणारे पाणी कोण प्याले ?" भगवंतांच्या प्रेरणेने राजा युवनाश्र्वच ते पाणी प्याला, असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले, " धन्य आहे ! दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय. "यानंतर प्रसवसमय आल्यावर युवनाश्र्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला. त्याला रडताना पाहून कृषी म्हणाले - "हे बालक दुधासाठी फार रडत आहे. तर मग आता हे कोणाचे दूध पिणार ? " तेव्हा इंद्र म्हणाला, "(मां धाता) माझे पिणार ? " "पुत्रा ! तू रडू नकोस. " असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली. (कारण तो इंद्र योगा इंद्रयागावातून जन्मला होता.) ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्र्व यालासुद्धा मृत्यू आला नाही. तो तिथेच तपश्चर्या करून मुक्त झाला. इंद्राने त्याचे नाव त्रसद्दस्यू असे ठेवले. कारण रावण इत्यादी दस्यू (लूटमार करणारे) त्याला भीत असत. युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता (त्रसद्दस्यू) चक्रवर्ती राजा झाला. भगवंतांकडून मिळालेल्या तेजामुळे त्याने एकट्यानेच सात द्विपे असलेल्या पृथ्वीचे पालन केले. तो जरी आत्मज्ञानी होता, तरीसुद्धा त्याने मोठ-मोठ्या दक्षिणायुक्त यज्ञांनी स्वयंप्रकाश, सर्वदेवस्वरुप, सर्वात्मा तसेच इंद्रियातीत अशा यज्ञस्वरुप प्रभूंची आराधना केली. यज्ञाची सामग्री, मंत्र, विधीविधान, यज्ञ, यजमान, ऋत्विज,धर्म, देश आणि काल, हे सर्व तर भगवंतांचेच स्वरूप आहे. जेथून सूर्याचा उदय होतो, तो सगळा भूभाग युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता याचाच होता.

            मांधात्याची पत्नी शशीबिंदूचि कन्या बिंदुमती ही होती. तिच्यापासून पुरूकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे तीन पुत्र झाले. त्यांना पन्नास बहिणी होत्या. त्या पन्नास-जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरले. परम तपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्‍चर्या करीत होते. तेथे त्यांनी पाहिले की, एक मत्स्यराज आपल्या पत्नीस सुख उपभोगीत आहे. त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्येसुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी त्याच्याकडे पन्नास कन्यांपैकी एक कन्या मागितली. राजा म्हणाला, " ब्रह्मन ! स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले, तर आपण तिला घेऊन जा." सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजले. त्यांनी विचार केला की, राजाने अशासाठी हे रूक्ष उत्तर दिले की, " आता मी वृद्ध झालो आहे, माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत. केस पिकले आहेत आणि माण हलू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. ठीक आहे ! मी आता स्वत:ला असा सुंदर बनवीन की, राजकन्याच काय पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील. " असा विचार करून समर्थ सौभरीने तसेच केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...