०८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ३

श्री गणेशाय नमः त्यांना पाहाताच राजा उठून उभा राहीला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वासमुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार-विनिमय केला.तो म्हणाला," ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही, असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो." असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहात राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे, हे ओळखले. त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले. "राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा ! हा कसला विष्णुभक्त ! मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. तो प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायाच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहुन एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूत्कारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दूर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे, असे पाहिले, तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्यामागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले, तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वासमुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा तर ते अधिकच घाबरले आता शोधत ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा.
            ब्रह्मदेव म्हणाले - दोन परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरुप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील, त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...