अशा प्रकारे असूर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि समुहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशू, तलवारी,मुद्गल,आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती कि, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढायचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रकट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा