अध्याय तेरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय तेरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता ! जनकाचा उदावसू, त्याचा नंदिवर्धन, नंदीवर्धनाचा सुकेतू, त्याचा देवरात, देवराताचा बृहद्रथ,बृहद्रथाचा महावीर्य, महावीर्याचा सुधृती, सुधृतीचा धृष्टकेतू, धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मुरु नावाचा पुत्र झाला. मरूचा अप्रतीपक, प्रतीपकाचा कृतिरथ, कृतिरथाचा देवमीढ, देवमीढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला. महाधृतीचा कृतीरात, कृतिराताचा महारोमा, महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्गरोमाचा पुत्र झाला हृस्वरोमा. ह्याच हृस्वरोमाचा पुत्र सीरध्वज होता. तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता, तेव्हा त्याच्या सीराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रगट झाली. म्हणून त्याचे नाव "सीरध्वज" असे पडले. सीरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे कृतध्वज आणि मितध्वज असे दोन पुत्र झाले. कृतध्वजाचा केशिध्जव आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला. केशिध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता.

            खांडीक्य कर्मकांड जाणणारा होता. केशिध्वजाला भिऊन तो पळून गेला. केशिध्वजाचा पुत्र भिनुमान आणि भानूमानाचा शतद्युम्न होता. शतम्नापासून शुची, शुचीपासून सनद्वाज, सनद्वाजापासून ऊर्ध्वकेतू, ऊर्ध्वकेतूपासून अज, अजापासून पुरुजित, पुरुजितापासून अरिष्टनेमी, अरिष्टनेमीपासून श्रुतायू, श्रुतायूपासून सुपार्श्वक, सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला. क्षेमधीपासून समरथ, समरथापासून सत्यरथ, सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरूपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला. हा अग्नीचा अंश होता.

            उपगुप्ताचा वस्वनन्त, वस्वनन्ताचा युयुध, युयुधाचा सुभाषण, सुभाषणाचा श्रुत, श्रुताचा जय, जयाचा विजय आणि विजयाचा ऋत नावाचा पुत्र झाला.
            ऋताचा शुनक, शुनकाचा वीतहव्याचा धृती, धृतीचा बहुलाश्व, बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला ‌.
            परीक्षिता ! मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे "मैथिल" म्हणविले जातात. हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असूनसुद्धा सुख दुःख इत्यादी द्वंद्वांपासून मुक्त होते. कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - १

श्रीशुकाचार्य म्हणतात - इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वशिष्ठ म्हणाले की, "राजा ! इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा. " हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वशिष्ठमुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमिने 'जीवन क्षणभंगुर आहे ' , असे समजून गुरु वशिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरु वशिष्ठ परत आले, तेव्हा त्यांनी मिनीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला कि, "स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. " निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की, "लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. " असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वशिष्ठांनीसुद्धा आपल्या शरीराचा त्याग करुन मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला, तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली. " हे देवांनो ! जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल, तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. " देव म्हणाले - 'तथास्तु. ' त्यावेळी निमी म्हणाला "मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार, या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीरालासुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे. "

            देव म्हणाले - निमीराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहिल. तो तेथे राहून सूक्ष्मशरीराने भगवंतांचे चिंतन करील. पापण्यांच्या उघडझापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल, असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव 'जनक' झाले.देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे 'वैदेह' आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव 'मिथिल' असे पडले. त्यानेच 'मिथिलापुरी' बसविली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी दहावा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भूरिषेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्व, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवाचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्र्वसृजाची पत्नी विषूचीपासून भगवान विष्वक्सेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील.
अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी अकरावे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील.
परीक्षिता, रुद्रसावर्णी बारावा मनू होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्या मन्वन्तरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, आग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वन्तराचे पालन करतील.
परम जितेंद्रिय देवसावर्णी तेरावा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगन होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवस्पतीला इंद्रपद देतील.
इंद्रसावर्णी चौदावा मनू होईल. उरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्या वेळी सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहध्दानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील.
परीक्षिता, ही चौदा मन्वन्तरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीन्ही कालात चालू असतात. यांच्याच द्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू,नभग,धृष्ट, शर्याती, नरिष्यन्त, नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव,मरुद्ण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वन्तरामध्येसुद्धा कशापासून अधितिच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला.
अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तिने युक्त अशा पुढे होणार्‍या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो.
परीक्षिता, मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते कि, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्नी होत्या. काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम,यमी आणि श्राध्ददेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्र्चर आणि उपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्‍विनीकुमार झाले. आठव्या मन्वन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगन होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल.
तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्र्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सर्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील.
हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार,मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा. जर वस्र नेसावयाचे असेल, तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तूंखेरीज, त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. संन्याशाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वत:तच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा. हे संपूर्ण विश्व, कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारणस्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे. आत्म्याकडेच लक्ष असणाऱ्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही, असे समजावे. शरीराच्या अवश्य होणाऱ्या मृत्यूचे किंवा अनिश्र्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये. सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या काळाची फक्त वाट पाहात राहावे. अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांची आवड नसावी. आपल्या जीवननिर्वाहासाठी काही काम करू नये. केवळ वाद-विवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. शिष्यसमुदाय जोडू नये, पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत. शांत, समदर्शी, महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही. आपल्या आश्रमाची चिन्हे त्याने धारण करावीत किंवा करू नयेत. त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह असो; परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे. त्याने अत्यंत विचारशील असावे, परंतु लोकांत वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे. स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की, हा मुका आहे.

            याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे. भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता. त्याने पाहिले की, सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते. त्यांचे कर्म, रूप, वाणी आणि वर्ण-आश्रम- चिन्हे यांवरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत, हे लोकांना समजू शकत नव्हते. भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला. ब्रह्मण, उद्योगी आणि भोगी पुरुषांच्याप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे की, उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते. याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहाता. म्हणून आपल्याजवळ धन नाही. मग आपल्याला भोग कोठून मिळणार ? भोगाखेरीजच आपले हे शरीर धष्टदुष्ट कसे ? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल, तर सांगावे. आपण विद्वान, समर्थ आणि चतुर आहात. आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे. असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहूनसुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय ?

             नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

             अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...