श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राज्याच्या गुणांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले. दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला. इतके दिवसपर्यंत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊनच राहिला.
जेव्हा दुर्वास निघून गेले, तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले. आपल्यामुळे दुर्वासांना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली. या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊनही त्यांनी तो भगवंतांचाच महिमा मानला. अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रह्म परमात्मा श्रीभगवंतांविषयी भक्ती वाढवित होता. त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते.
त्यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वत: वनात निघून गेला. तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला. महाराज अंबरीषाचे हे परम पवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो, तो भगवंतांचा भक्त होतो.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा