अध्याय अठरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय अठरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अठरावा

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जशी शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिये असतात, तसे नहुषाचे यती, ययाती, संयाती, आयती, वियती, आणि कृती असे सहा पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र येतीला, नहुष राज्य देऊ इच्छित होता, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता. जो राज्यकारभारात प्रवेश करतो, तो आत्मस्वरुपाला विसरतो. जेव्हा इंद्रपत्नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नहुषाला ब्राह्मणांनी इंद्रपदापासून पदच्युत केले आणि त्याला अजगर बनविले, तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला. ययातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केले आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला.

            परीक्षिताने विचारले - भगवान शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय. तर मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय वर असा प्रतिलोम (उलटा) विवाह कसा झाला ?

            श्रीशुक म्हणाले - दानवराज वृषर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणीसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीच्यामध्ये विहार करीत होती. त्या उद्यानात फुलांनी लहडलेले अनेक वृक्ष होते. त्यामध्ये एक मोठे सरोवर होते. सरोवरात कमळे उमललेली होती आणि त्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक-दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या.

            त्याच वेळी तिथे पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर येउन पोहोचले. त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोब वर येऊन त्यांनी आपापली वस्त्रे परिधान केली. शर्मिष्ठाने घाईने नकळत देवयानीचे वस्त्र आपले समजून परिधान केले. यावर देवयानी चिडून म्हणाली. "अग ! पहाणा या दासीचे हे भलतेच धाडस ! कुत्र्याने यज्ञातील हविष्यान्न खावे, त्याप्रमाणे हीने माझे वस्त्र परिधान केले आहे ! ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली, जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत, जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविला, लोकपाल, देवराज, आणि लक्ष्मीदेवीचे आश्रय परमपावन विश्वात्मा भगवानसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करतात, त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही भृगुवंशी त्यात तिचा पिता वृषपर्वा आमचा शिष्य. असे असतानाही शूद्राने वेदपठण करावे, त्याप्रमाणे हिने माझी वस्त्रे परिधान केली. " जेव्हा देवयानी अशाप्रकारे अद्वा-तद्वा बोलू लागली, तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने, डिवचलेल्या नागिणीप्रमाणे नि:श्वास टाकीत दात-ओठ खात तिला म्हणाली. "ऐ भिकारणी ! स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस ? कावळ्या- कुत्र्याप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाळभूतपने पाहात नाहीस काय ?" शर्मिष्ठेने अशाप्रकारे अतिशय कडवट शब्दांनी गुरुकन्या देवयानीला फटकारले आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिले.

             शर्मिष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तेथे येऊन पोहोचला. त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयानीला त्याने पाहिले. त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र नव्हते; म्हणून त्याने आपला शेला तीला दिला आणि दयाळू अंत:करणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढले. अत्यंत प्रेमळ शब्दांत देवयानी वीर ययातीला म्हणाली, "हे वीरशिरोमणे राजन ! आज आपण माझा हात धरलात. आता आपण माझा हात धरला आहे, म्हणून दुसर्‍या कोणीही तो धरू नये. हे वीरश्रेष्ठा ! विहिरीत पडलेल्याकारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले, ईश्वराने ठरविलेला सबंध होय, असेच समजले पाहिजे. यामध्ये मनुष्यप्रयत्न नाहीत. हे वीरश्रेष्ठा ! मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच याला शाप दिला होता. म्हणून त्यानेसुद्धा मला शाप दिला होता की, ब्राह्मण माझे पाणिग्रहण करणार नाही. " हा सबंध शास्त्रविरुद्ध असल्याने ययातीला मान्य नव्हता. परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असून आपले मनसुद्धा हिच्याकडे ओढ घेत आहे, असे पाहून ययातीने तिचे म्हणणे मान्य केले. वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला. तेव्हा देवयानी रडत पित्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली, आणि जे तिने केले, ते सर्व तिने त्यांना सांगितले. ते ऐकून भगवान शुक्राचार्यांचेसुद्धा मन उद्विग्न झाले. ते पौरोहित्याची निंदा करू लागले. त्यांनी असा विचार केला की, यापेक्षा कबुतराप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले. म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडले. वृषपर्व्याला हे समजले, तेव्हा गुरु शत्रूला जाऊन मिळू नये, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याने रस्त्यातच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता. ते वृषपर्व्याला म्हणाले, "राजन ! मी देवयानीला सोडू शकत नाही. म्हणून तिची जी इच्छा असेल, ती तू पुरी कर. " " ठीक आहे" असे वृषपर्व्याने म्हटल्यावर देवयानीने आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, " वडील मला जेथे देतील आणि मी जेथे जेथे जाईन, तेथे शर्मिष्ठा आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी येऊ दे. "

            आपल्या परिवारावर आलेले संकट आणि त्याच्या कार्याचे महत्त्व पाहून शर्मिष्ठेने देवयानीचे म्हणणे मान्य केले आणि एक हजार सख्यांसह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली.

            शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीबरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठेला दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की, " राजन ! हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. परीक्षिता ! थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली. हे पाहून एक दिवस शर्मीष्ठेने सुद्धा आपल्या ऋतुकाळात देवयानीच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली. शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे, हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही, धर्मज्ञ ययातीने प्रारब्धावर भरवसा ठेवला. यदु आणि तुर्वसू असे देवयानीला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला द्रुह्यू, अनु आणि पूरू असे तीन पुत्र झाले. मानी देवयानीला जेव्हा समजले की, शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता, तेव्हा ती रागाने जळफळत पित्याच्या घरी गेली. कामी ययातीने गोड शब्दांनी, पाय चेपणे इत्यादी पद्धतींनी देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; तिच्या पाठोपाठही तो गेला. परंतु तिचे मन वळवू शकला नाही. शुक्राचार्यसुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाले, " तु अत्यंत स्त्रिलंपट, मंदबुद्धी आणि खोटारडा आहेस. म्हणून मनुष्याला कुरूप करणारे वृद्धत्व तुला येवो. "

             ययाती म्हणाला- " ब्रह्मण ! आपल्या कन्येबरोबरच्या विषयभोगात अजून मी तृप्त झालो नाही. " यावर शुक्राचार्य म्हणाले "ठीक आहे. जो तुला आपले तारूण्य देईल, त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात खुशाल तारुण्य घे. " शुक्राचार्यांनी जेव्हा अशी व्यवस्था सांगितली, तेव्हा ययाती आपल्या जेष्ठ यदु नावाच्या पुत्रास म्हणाला. "पुत्रा तू तुझे तारुण्य मला दे आणि तुझ्या आजोबांनी दिलेले हे म्हातारपण तू स्वीकार; कारण हे पुत्रा, मी अजून विषय भोगून तृप्त झालो नाही; म्हणून तुझे आयुष्य घेऊन मी काही वर्ष विषयानंदाचा उपभोग घेईन. "

            यदू म्हणाला - "तात ! आपले हे म्हातारपण अकालीच घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही; कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषयसुखाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही. " परीक्षिता ! अशा प्रकारे तुर्वसू,द्रुह्यू आणि अनुनेसुद्धा आपल्या पित्याचे म्हणणे मान्य केले नाही. खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्त्व माहीत नव्हते. या अनित्य शरीरालालाज ते नित्य मानीत होते. शेवटी ययातीने सर्वांत धाकटा परंतु गुणांनी श्रेष्ठ अशा आपल्या पुरू नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले- "पुत्र ! आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस. "

            पूरू म्हणाला- 'तात ! ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले, अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल ? जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र. सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला मध्यम म्हटले जाते. जो आज्ञा केल्यानंतरसुद्धा मानत नसताना तिचे पालन करतो, तो अधम पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही, त्याला पुत्र म्हणणेच चूक आहे. " परीक्षिता ! असे म्हणून पूरूने मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचे म्हातारपण स्वीकारले. राजा ययातीसुद्धा त्याचे तारूण्य घेऊन पूर्वीप्रमाणेच विषयसेवन करू लागला. तो सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता. आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा इथेच्छ उपभोग घेत होता. देवयानी त्यांची प्रियतमा पत्नी होती. तीही आपल्या प्रियतमाला आपले मन, वाणी, शरीर आणि वस्तूंच्या द्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली. राजा ययातीने सर्व वेदांचे प्रतीपाद्य, सर्वदेवस्वरूप यज्ञपुरुष श्रीहरींचे पुष्कळ दक्षिणांनी युक्त यज्ञांनी पूजन केले. जशा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाहीत, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात हे जग स्वप्न, माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे. हे कधी अनेक नामे आणि रूपांनी प्रतीत होते, तर कधी नाही. ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांचे स्वरूप सुक्ष्माहूनही सुक्ष्म आहे. त्या सर्वशक्तिमान, सर्वव्यापी भगवान श्रीनारायणांना आपल्या हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावाने त्यांचे पूजन केले. अशाप्रकारे हजारो वर्षे त्याने आपल्या उच्छृंखल इंद्रियांना मनाच्या अधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले. परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - २

श्री गणेशाय नमः त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्‍वमेध यज्ञ करीत आहे, असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावलापावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर 'भृगुकच्छ' नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बळीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले, तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला, असे वाटले. परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की, यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनत्कुमार तर येत नाहीत ना ? शिष्यांसह भृगू याप्रकारे अनेक कल्पना करीत होते, त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजिन आणि मस्तकावर जटा होत्या. अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह, त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्निसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहानलहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केली. देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते, तेच अत्यंत मंगल, लोकांचे पाप-ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले.
बली म्हणाला - हे ब्राह्मणकुमार, आपले स्वागत असो. आपणांस मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ? आर्य, असे वाटते की, आज ब्रह्यर्षीची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला. हे ब्राह्मणकुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्षाने पृथ्वीही पवित्र झाली. हे सर्वपूज्य ब्राह्मणकुमार, असे वाटते की, आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मणकन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ, असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पीतांबरधारी भगवान अदीतीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्षण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीच झळकत होती. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिहृ, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूबंद, मस्तकावर किरीट, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतु एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पवित्र या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला.
            ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू-गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्यांच्याबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला.
जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. भगवान स्वत: अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते,त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे बटुवेषधारी ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे.
            त्या वामन ब्राह्मचाऱ्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करविले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तऋर्षीनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. अशा रितीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटूवेषधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षिनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...