श्री गणेशाय नमः ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी,मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असूर नाही, मनुष्य किंवा पशु-पक्षी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही, तो गुण नाही, कर्म नाही, कार्य नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहाते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे.जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामुग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रम्ह परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योग्याच्या द्वारे कर्म, कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपांमध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो, आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंतांना मी शरण आलो आहे.
श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहीत भगवंताची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रुपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वत: प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्रला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्वुरो, भगवान, आपणास नमस्कार असो. "गजेंद्रला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्रला सोडविले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा