१७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - २

श्री गणेशाय नमः तो जी जी वेळ सांगे, त्याची वरूण वाट पाहात असत. रोहिताला जेव्हा समजले की, वडील आपले बलिदान करू इच्छितात. तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसांनंतर त्याला समजले की, वरूण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे. यामुळे त्याला जलोदर झाला आहे. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला. परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले.ते रोहिताला म्हणाले, " पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले." इंद्रांचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर मनातच राहिला. अशा प्रकारे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहिताने आपल्या वडीलांकडे जाण्याचा विचार केला. परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत. अशाप्रकारे सहा वर्षे रोहित मनातच राहिला. सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला, तेव्हा त्याने अजीगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शुनःशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशु बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी, श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरूण इत्यादी देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले. संयमी जमदग्नी अध्वर्यू झाले. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गगाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरीचंद्राला एक सोन्याचा रथ दिला.

            शुन: शेपाचे माहात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरीश्र्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करुन, आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले. नंतर अहंकाराला महत्तत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. त्यानंतर निर्वाणसुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही, आणि ज्याच्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला .

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...