०७ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरूरवा म्हणाला - हे सुंदरी ! तुझे स्वागत असो. बैस. मी तुझी काय सेवा करू ? तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळापर्यंत चालत राहो.

            उर्वशी म्हणाली - हे सुंदरा ! कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही ? कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही. राजन ! जो पुरुष रूप-गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो, तोच स्त्रियांना हवाहवासा वाटतो. म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन. परंतु महाराज ! मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे. आपण यांचे रक्षण करावे.

            हे वीरशिरोमणी ! मी फक्त तूप खाईन आणि मैथुनाव्यातिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये. मनस्वी पुरुरव्याने "ठीक आहे" असे म्हणून तिची अट मान्य केली. आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला "पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भूत आहे. तुझा भावही अलौकिक आहे. तर मग हे देवी ! स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही ?"

            तो पुरुषश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार करू लागला. उर्वशीच्या शरीरातुन कमलकेसरासारखा सुगंध येत होता. राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंदविहार केला. तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध हरपून जात असे. उर्वशी नाही, असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविले. "उर्वशीखेरीज मला हा स्वर्ग सुना सुना वाटतो, " असे तो म्हणाला. मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते, ते त्यांनी चोरले. पुत्रासमान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले. तेव्हा ती म्हणाली, अरेरे ! स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुसकासारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला. यांच्यावर विश्वास ठेवल्याकारणाने माझा सर्वनाश झाला. लुटारूंनी माझ्या मुलांना पळवून नेले. पहाना ! हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिऊन झोपून राहातो. जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा. त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वागबाणांनी राजाला घायाळ केले. तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला. तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या.राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. (झाली ! ती लगेच त्याला सोडून निघून गेली.)

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...