श्री गणेशाय नमः एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असता त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्नीला म्हणत होता. तू दुष्ट आणि कुलटा आहेस. तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस. स्त्रीलोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही. मूर्ख लोकांना खूष ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिऊन सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मीकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मीकींनी त्यांचे जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश व लव अशी नावे ठेवली. परीक्षिता ! लक्ष्मणाला अगंद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भारतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते. तसेच शत्रूघ्नालाही दोन पुत्र झाले - सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला. त्याने त्यांची सर्व संपत्ती म्हणून ती श्रीरामाकडे सोपविली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधुचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसविली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकीच्या हाती सोपविले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धीपुर:सर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त, विषयी पुरुषांच्यासबंधी काय सांगावे ?
यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचार्य धारण करून तेरा हजार वर्षेपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले.
भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ कसा असू शकेल ? देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नाव्हे की, त्यांनी शास्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहाता, शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे साहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती ? ही सर्व त्यांची लीलाच आहे.
ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीसुद्धा आज उजळ करते, मोठ-मोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट जेथे टिकवतात, त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांच्या सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले ते सगळे अयोध्यानिवासीसुद्धा त्याच लोकी गेले, जेथे योगी योगसाधनेने जातात. राजा ! जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते. आणि तो सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा