१९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - २

श्री गणेशाय नमः सगराची दुसरी पत्नी केशिनी. हिच्यापासून त्याला असमंजस नावाचा मुलगा झाला होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहात असे. असमंजस मागच्या जन्मी योगी होता. आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता. परंतु आताही त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. म्हणून बांधवांना प्रिय वाटणारा नाही असे काम तो करी. तो कधी कधी नींद्य कर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असे दाखवी. इतकेच काय, खेळताना मुलांना शरयू नदीत टाकून देई. अशा प्रकारे त्याने लोकांना उद्विग्न केले होते. शेवटी त्याचे असे उपद्व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेही टाकून त्याचा त्याग केला. त्यानंतर असमंजसाने योग्यबलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तेथून निघून गेला. आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली, तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजालासुद्धा पश्चात्ताप झाला. यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याने, आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने जाऊन, त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले. भगवंतांचे अवतार कपिल-मुनी तेथेच बसले होते. थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्र मनाने त्यांची स्तुती केली.

            अंशुमान म्हणाला - भगवन ! अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शिकले नाहीत. इतकेच काय, पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकले नाहीत. आम्ही तर त्यांच्या मन, शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत. तर मग आम्ही आपल्याला कसे बरे समजू शकू ? जगातील शरीर धारण करणारे जीव सत्त्वगुण, रजोगुण किंवा तमोगुनप्रधान आहेत. ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ, तर सुषुप्ति अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहातात. कारण, ते आपल्या मायेने मोहित आहेत. त्यांची दृष्टी बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहातात, परंतु स्वत:च्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहात नाहीत. आपण ज्ञानघन आहात. सनंदनादी मुनी, आत्मस्वरूपाच्या अनुभवाने मायेच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान, यांना दूर सारून आपलेच चिंतन करीत असतात. मायेच्या गुणांनी भुलून गेलेला मी मूर्ख आपले चिंतन कसे करणार ? माया, तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मे तसेच कर्मांच्या संस्कारांनी बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच. आपल्याला नाव नाही की रूप नाही. आपल्यामध्ये कार्य नाही, की कारण नाही. आपण सनातन आत्मा आहात. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच आपण हे शरीर धारण केले आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे. याला सत्य समजून लोभ, ईर्ष्या आणि मोहामुळे लोकांचे चित्र, शरीर तसेच घर इत्यादीमध्ये भटकत राहाते. सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या हे प्रभो ! कामना, कर्म आणि इंद्रियांचा आश्रय असणारा, माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे.

            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कपिल देवांच्या प्रभावाचे जेव्हा अंशुमान याने असे वर्णन केले, तेव्हा त्यांनी मनोमन अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - "पुत्रा ! हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञपशू आहे. याला तू घेऊन जा. तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगाजलानेच होईल. त्याला दुसरा कोणताही उपाय नाही. "अंशमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला. सगराने त्या यज्ञपशूच्या द्वारा यज्ञाची समाप्ती केली.
            तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपविला आणि तो स्वत: विषयांविषयी नि:स्पृह आणि बंधनमुक्त झाला. महर्षी और्व यांनी दाखविलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...