१४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - २

श्री गणेशाय नमः हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरडा करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाहीत. ते कोठेच नाहीत. असे पाहून तो म्हणू लागला, "मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही, अशा लोकी निघून गेला असावा. बस ! आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रल्हादनंदन विरोचन फार मोठा ब्राह्मणभक्त होता. इतका की, त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे, गृहस्थ, ब्राह्मण, आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको. कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकतेइतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही.
बली म्हणाला - ब्राह्मणकुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे; परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना ?म्हणून आपला फायदा-तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय ? हे ब्रह्मचारी,जो एक वेळ माझ्याकडे आला, त्याला पुन्हा कधी कोणाकडून ही काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेवढ्या भुमीची आवश्यकता असेल, तेवढी माझ्याकडुन मागून घे.
श्रीभगवान म्हणाले - राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल, तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. जो तीन पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही; कारण सातही द्वीपे मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहातेच. मी असे ऐकले आहे की, पृथू, गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होते. परंतु इतके धन आणि भोग मिळूनसुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहाणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा, तिन्ही लोकांचे राज्य मिळूनसुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण, दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर असे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देणाऱ्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यकतेइतकेच धन जवळ बाळगावे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...