२१ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवन ! आम्ही हे जाणू इच्छितो की, महात्मा सौदासाला गुरु वशिष्ठांनी शाप का दिला ? जर यात काही गुप्त नसेल तर सांगावे.

            श्रीशुक म्हणाले - सौदास एकदा शिकारीसाठी गेला होता. तेथे त्याने एका राक्षसाला मारले आणि त्याच्या भावाला सोडून दिले. त्याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आचाऱ्याचे रुप घेऊन तो त्याच्या घरी आला. एक दिवस भोजनासाठी जेव्हा गुरु वशिष्ठ राजाच्या घरी आले, तेव्हा त्याने मनुष्याचे मांस शिजवून त्यांना वाढले. भगवान वसिष्ठांनी अभक्ष्य मांस वाढताना पाहून रागावून राजाला झटकन शाप दिला की, " या कृत्यामुळे तू राक्षस होशील. " हे राक्षसाचे काम आहे, असे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी तो शाप फक्त बारा वर्षाच्यापुरताच ठेवला. त्यावेळी सौदाससुद्धा आपल्या ओंजळीत पाणी घेऊन गुरु वशिष्ठांना शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. परंतु मदयंतीने त्याला अडविले. तेव्हा सौदासाने दिशा, आकाश आणि पृथ्वी ही सर्व जीवमय आहेत, असा विचार करून ते शापजल आपल्या पायांवर टाकले. ( म्हणूनच त्याचे नाव 'मित्रासह' असे पडले.) त्या पाण्यामुळे त्याचे पाय काळे झाले होते, म्हणून त्याचे नाव 'कल्माषपाद'असेही पडले. आता तो राक्षस झाला होता. राक्षस झालेल्या कल्माषपादाने एके दिवशी एका वनवाशी ब्राह्मण दांपत्याला एकांतात असताना पाहिले. कल्माषपादाला भूक लागली होती (म्हणून) त्याने ब्राह्मणाला पकडले. ब्राह्मणपत्नीची कामना पूर्ण झाली नव्हती. ती म्हणाली "राजा ! तू राक्षस नाहीस. महाराणी मदयंतीचा पती आणि इश्वाकुवंशाचा वीर महारथी आहेस. असा अधर्म करू नकोस. मला संतानाची इच्छा आहे आणि या ब्राह्मणाची सुद्धा कामना अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून मला हा माझा पती परत दे. हे मनुष्यशरीर जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून हे वीरा ! शरीराची हत्या म्हणजे सर्व पुरुषार्थांची हत्या, असे म्हटले जाते. शिवाय, हा ब्राह्मण विद्वान आहे. तपश्चर्या, शील इत्यादी गुणांनी संपन्न आहे. जो सर्व पदार्थामध्ये असूनही त्यांच्या वेगवेगळ्या गुणांमुळे लपून राहिलेला आहे, त्या पुरुषोत्तम परब्रह्याची, सर्व प्राण्यांच्या आतम्याच्या रूपामध्ये हा आराधना करू इच्छितो. हे धर्म जाणणाऱ्या राजा ! जसा पित्याच्या हातून पुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या श्रेष्ठ राजर्षीच्या हातून श्रेष्ठ ब्रह्मर्षीचा वध होणे कसे योग्य आहे ? तू सन्माननीय आहेस. असे असता तू परोपकारी, निरपराध, वैदिक आणि ब्राह्मवादी ब्राह्मणाचा, गाईचा वध करावा तसा वध करणे कसे योग्य आहे ? असे असताही जर तू याला खाणार असशील, तर अगोदर मला खा; कारण याच्याशिवाय मी मेल्यासारखीच असून एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. " असे काकुळतीने बोलून ती अनाथ असल्यासारखी रडू लागली. परंतु शापाने मूढ झाल्यामुळे सौदासाने, वाघाने एखाद्या पशूला खावे, त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. ब्राह्मणपत्नीने गर्भाधानास उद्युक्त झालेल्या पतीला राक्षसाने खाल्लेले पाहून तिला अतिशय शोक झाला. तिने संतापून राजाला शाप दिला. "अरे पाप्या ! मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लेस. म्हणून मुर्खा ! तू जेव्हा स्त्रीबरोबर संग करण्यास जाशील, तेव्हा तुझाही मृत्यू होईल, ही गोष्ट मी तुझ्या निदर्शनाला आणते. " अशा प्रकारे मित्रसहाला शाप देऊन पतिलोकात जाऊ इच्छिणारी ब्राह्मणपत्नी, आपल्या पतीच्या अस्थींनी धगधगनाऱ्या चितेत उडी घेऊन स्वतः सती गेली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...