०६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, " बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की,"आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत. " तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. " वडील म्हणाले, " मुला ! तु त्यांचे म्हणणे ऐकू नकोस." अंगिरस-गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्र्वदेवसूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील, तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा." आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरसगोत्राच्या ब्राह्मणांनीसुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले.
            नाभाग ते धन घेऊ लागला, तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला- "या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे, ते सर्व धन माझे आहे."
             नाभाग म्हणाला, "ऋषींनी हे धन मला दिले आहे; म्हणून माझेच आहे. " यावर तो पुरुष म्हणाला, "आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, "दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की, यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील, तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल. म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे." नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, " प्रभू ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत, असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्रह्मण ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो. "( तेव्हा भगवान रुद्र म्हणाले), " तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तूसुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. " एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो, तो प्रतीभावत, वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपालासुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही.
            राजाने विचारले - भगवन ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...