१७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपर्च्श्रेमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरुपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योगसाधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणाऱ्यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देते. अन्नसमर्पण करतेवेळी देव, ऋषि, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वत:ला सुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे.
            धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतः ही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहींसिने नाही. ज्या लोकांना सद्धर्मपानाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांची हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशूपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या, मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे.
            विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत.अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा. धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो 'विधर्म' होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म 'परधर्म' होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे 'उपधर्म' किंवा 'उपमा' होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा 'छल' होय. आपल्या आश्रमाहुन वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो 'आभास' होय. आपल्याला स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...