१८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीरनिर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता आजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीपरायण पुरूषाची निवृत्ती त्याची उपजीविका चालविते, आत्मसुखात रममाण होणार्‍या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते,जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुठ्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अंध:पतित होतात.
            संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. आध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योगसाधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. आधिभौतिक दु:खाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि अध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्त्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्र्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात.
            शास्त्रामध्ये जितके नेयम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नेयमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत. उलट अनर्थकारक फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...