संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. आध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योगसाधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. आधिभौतिक दु:खाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि अध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्त्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्र्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात.
शास्त्रामध्ये जितके नेयम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नेयमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत. उलट अनर्थकारक फळ देतात.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा