०९ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात- परीक्षिता ! उर्वशीपासून आयू, श्रुतायू, सत्यायू,रय, विजय आणि जय असे पुरूरव्याला सहा पुत्र झाले.

            श्रुतायूचा पुत्र वसुमान, सत्यायूचा श्रुतंजय,रयाचा एक आणि जयाचा अमित. विजयाचा भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जहृ होता. ज्याने गंगेला आपल्या ओंजळीत घेऊन पिऊन टाकले, तोच हा जहृ होय. जहृचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा अजक.अजकाचा पुत्र कुश. कुशांबू,तनय,वसू आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते. यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता.

            गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचीक ऋषींनी तिला मागणी घातली. हा वर कन्येसाठी योग्य नाही, असे वाटून गाधी ऋचीकाला म्हणाला.

            "मुनेश्वर ! आम्ही कुशिक आहोत. आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शिल्करुपाने द्या. त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा. " गाधी असे म्हणाला, तेव्हा ऋचीक मुनींना त्याच्या आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला. एकदा महर्षी ऋचीकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महर्षी ऋचीकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघीसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले. सत्यवतीच्या आईला वाटले की, ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल, म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला. तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत: खाल्ला मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले, " तू मोठा अनर्थ केलास ! आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल. " सत्यवतीने ऋचीक मुनींना प्रसन्ना करून प्रार्थना केली की, " असे होऊ नये. " तेव्हा ते म्हणाले- "ठीक आहे. पुत्राऐवजी तुझा नातू तसा होईल. " नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला. सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी 'कौशिकी' नदी झाली. रेणू ऋषींची कन्या रेणुका होती. जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले. जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान परशुराम होते. त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कि, हैहयवंशाचा नाश करण्यासाठी स्वत: भगवंतांनीच हा अशावतार ग्रहण केला होता. त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षेत्रीयहीन केले. क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता, तरीसुद्धा ते क्षेत्रिय दुष्ट, ब्राह्मणांचे द्वेष्टे,रज-तमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते. म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...