०५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवांगनांच्या केसांच्या अंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहत असते. सोनेरी खिडक्‍यांमधून अगुरूचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो. त्याच मार्गावरून देवांगना ये-जा करतात. मोत्यांच्या झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात. सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात. गच्च्यांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात. मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगणा गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी,टाळ, ऋष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्यदेवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे, दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत. हे दोष ज्यांच्या अंगी असतील तेच तिथे जातात. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंक वाजविला.
बलीने युध्दाची मोठी तयारी केली आहे. हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरू बृहस्पती यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला. भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही, असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे, ते कळत नाही. मला वाटते, यावेळी बलीला कोणीच, कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलयकालच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे.तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील. जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यांतील ज्वालांनी दिशा भस्म करुन टाकील, असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय ? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे की, ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे, ते आपण मला सांगा.
देवगुरु म्हणाले - इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत, तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पाहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करीत, तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला, तेव्हा ते स्वच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर वीरोचनपुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला. तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी शंभर अश्वमेध यज्ञ करविले.त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकांत प्रसिद्ध कीर्ती, दाही दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मणदेवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वत:ला कृत्यकृत्य मानू लागला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...