१९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे. राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामदी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्यानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही.
            जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा,कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रत्तांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मुर्खाची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करीत ?
            उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे - शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे.( ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) राग, द्वेष, लोभ,शोक, मोह,भय, मद, मान,अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपाट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद,भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही वेळा सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. हा मनुष्यशरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. अन्यथा, बेसावध जीवाला हे इंद्रियरुप दुष्ठ घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरुप लुटारूंच्या हातात देतील.ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमय संसाराच्या विहिरीत ढकलून देतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...