युधिष्ठीरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तीकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठीरा, हेच पहा ना! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले.
पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अत्यंत प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलाचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह(वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हे आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शुध्द जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवासुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने ग्रहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो.
या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रम्ह मनुष्यरूपात गुप्तरुपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहीत, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत!
श्रीशुक म्हणतात- देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली.भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.अशाप्रकारे मी तुला दक्षकन्यांचा वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असूर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा