१६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. ज्यांच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजारपटीने फळ मिळते.
            युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरवली आहे. राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो.त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादीची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरुपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठीरा, भगवंत या मनुष्यदी शरीरांमध्ये त्यांच्या वेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत.
            युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्य परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रध्देने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतू जे माणसांचा द्वेष करतात. त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधूळीने तिन्ही लोक पवित्र करतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...