१५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामुग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. जर आपला अधिकार इत्यादी, आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे.
            धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र,जसे चित्रा, विशाखा, जेष्ठा इतक्यादिंनी युक्‍त असेल ती पौर्णिमा; मग त्यादिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्मनक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत. तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...