०६ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो. या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठ-मोठ्या पवित्रकीर्ती राजांचे वर्णन आहे.

हजारो मस्तके असणाऱ्या विराटपुरुष नारायणांच्या नाभिसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते. त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला. यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. देवगुरु बृहस्पतींनी आपली पत्‍नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली. परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की, त्याने तिला मुळीच परत दिले नाही. याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली. देवराज इंद्रानेसुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली. अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला.

त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली. यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भर्त्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. तेव्हा तारा गर्भवती आहे, असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले. " दष्टे ! माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक. हे स्त्रिये, मी तुला जाळून टाकणार नाही. कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तिची इच्छा आहे. पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली. तिने सोन्यासारख्या चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला. त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनीही वाटू लागले की, हा आपल्याला मिळावा. आता ते एकमेकांशी "हा तुझा नाही, माझा आहे. " असे म्हणत जोरजोराने भांडू लागले. ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता, लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या मातेच्या दिखाऊ लज्जेने रागावून बोलक म्हणाला, "दुराचारिणी ! तू बोलत का नाहीस ! मला लवकर सांग तुझे कुकर्म. " त्याचवेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले. तेव्हा तारा हळूच म्हणाली 'चंद्राचा.' म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले. परीक्षिता ! ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव 'बुध' असे ठेवले. कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला.

परीक्षिता ! बुधापासून इलेला पुरूरवा झाला. याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे. एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरूरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते. ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरूरव्याकडे आली. उर्वशीला जरी मित्रावरूणांच्या शापामुळेच मृत्युलोकात यावे लागले होते, तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे, असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली. देवांगना उर्वशीला पाहून पुरूरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले. त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. गोड शब्दांत तो म्हणाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...