श्रीमहादेव म्हणाले - ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे, योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहातात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही.
मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव,अपांतरतम,देवल,धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर-असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही. कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले, तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले. ते म्हणाले,"हे अच्युता ! अनंता ! संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परम प्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो.
श्रीभगवंत म्हणाले - हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या आधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्रह्मण ! माझ्या भक्तांच्या एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधूस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक, हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वत:ला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य-सारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांच्यासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत ? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, एक. मी तुला उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्यांच्याकडेच तू जा. निरापराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होते.
तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा ! तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्यांची क्षमा माग,तरच तुला शांती मिळेल.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा