२५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौथा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषि आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हूहू" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला.
भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रप्रदुम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्टमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला तीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...