३१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ४

श्री गणेशाय नमः राजा बलीने दहा इंद्रावर, तीन ऐरावत हत्तीवर, चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत-हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीव पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडुन आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली. परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एकापाठोपाठएक शुल,भाला,तोमर आणि शक्ती हातात घेतली. परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई, त्याचे इंद्र तुकडे करून टाकी.
परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन "मारा, तोडा" असे ओरडत शेकडो नागड्या-उगड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरु होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असूरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रकट झाले. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांच्या आठ हातात आठ आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी, मस्तकावर अमूल्य मुगुट तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात, त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते, हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले, तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला, परंतु त्याचक्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतानी चक्राने तोडणे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करत होता. बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरून हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपराजिताशी, अश्‍विनीकुमार वर्षपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले. राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमाबरोबर वायुचे युद्ध झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता, जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्नीदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्षाची कामदेवाशी,उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची ब्रहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्र्चराशी लढाई होऊ लागली.निवातकवचांच्या बरोबर मृरुद़णांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला.
अशा प्रकारे असूर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि समुहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशू, तलवारी,मुद्गल,आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती कि, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढायचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रकट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - २

श्री गणेशाय नमः राजा, त्यावेळी रंगी-बेरंगी ध्वज, शुभ्र छत्रे, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चवऱ्या आणि वार्‍याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चकाकणारी कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यांमुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे, अशा शोभत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मय दानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तेथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला. युद्धाची सर्व सामुग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आच्श्रर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमानसुद्धा करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे ? त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतीस बसला होता. त्याच्यावर ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यांमुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमूची, शंभर,बाण, विप्रचित्ती, अयोमुख,द्विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती,इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक, चंक्राक्ष, शुभ, निशुभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिषटनेमी, त्रिपुराधिपती मय,पौलोम,कालेय आणि निवातकवच वगैरे सेनाविभागप्रमुख होते. हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते. परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले.
या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरुढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरुढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने,ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगन तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरून इत्यादी लोकपाल येऊन उभे टाकले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, जरी दैत्यदानवांनी मोठ्या हुषारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते, तरीसुद्धा भगवंतांशी विन्मुक असल्या-कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. हे राजन, भगवंताने समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला. इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती. शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे तेसुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. राजा, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासुरसंग्राम होय. तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यावेळी शंख, तुतार्‍या, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चीत्कार, घोड्यांची खिंकाळणी, रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हलकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. त्यांपैकी काही वीर उंटांवर, हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते; तर काहीजण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहांवर बसून लढत होते. काय सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, ससाने आणि कोंबडे यांच्यावर बसले होते; तर पुष्कळसे तिमिंगिल मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरेडे, गवे आणि रानडुक्करांवर स्वार झाले होते. काहीजण तर कोल्हा, उंदीर, सरडे, ससे, मनुष्ये, बकऱ्या, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले होते. हे राजा, अशाप्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहाणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. तेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मूख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मत:च क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे. म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले. यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत.
            त्याचवेळी राहू दैत्य देवांचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवाबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला 'ग्रह' बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्याला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूनी, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी दैवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांपासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण,धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर,पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करणारे ते सर्वांना मिळते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. ते विचार करू लागले, " किती अनुपम सौंदर्य हे ! किती हे तेज ! काय हे हिचे नवतारुण्य ! "असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले. " हे कमलनयने, तू कोण आहेस ? कोठून आलीस ? काय करू इच्छितेस ? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस ? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. आम्ही असे समजतो की, आतापर्यंत देव, दैत्य सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल. तर मग माणूस तुला कोठून स्पर्श करीत ? हे सुंदरी, विधात्याने दया घेऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे काय ? हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे. म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव, आम्ही सर्वजण कष्यापाचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. म्हणून तू नि:पक्षपातीपणे हे आम्हांला असे वाटून दे की, ज्यामुळे आमच्यांत भांडण होणार नाही, " असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्रीवेषधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कसे लागलात ? कारण विवेकी मनुष्य स्त्रायांवर कधी विश्वास ठेवीत नाही. दैत्यांनो, लांडगे आणि व्याभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही. कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, मोहिणीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहनीच्या हातात दिला. नंतर अमृतकलश घेऊन किंचित स्मित हास्य करीत भगवान म्हणाले, "उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन, ते तुम्हांला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन. " मोहिनीचे हे बोलणे ऐकूण मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही. म्हणून सर्वांनी 'ठीक आहे' असे म्हणून ते मान्य केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - ३

श्री गणेशाय नमः यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारूणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातुन एक अत्यंत अलौकीक पुरुष प्रकट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्नकुंडले होती. रुद्र छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशांशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक 'धन्वंतरी' या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दिनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, " देवांनो" ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो."
परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरु झाले. सर्वजण म्हणू लागले, " मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही. " हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. " एवढ्यात सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भीती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायांतील नूपुर रुणझुण रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...