श्री गणेशाय नमः नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. तेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मूख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मत:च क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे. म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले. यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत.
त्याचवेळी राहू दैत्य देवांचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवाबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला 'ग्रह' बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्याला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूनी, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी दैवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांपासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण,धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर,पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करणारे ते सर्वांना मिळते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा