२८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीरामांनी वसिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्वदेवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अध्वर्यूला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती, ती त्यांनी आचार्यांना दिली. त्यांना माहीत होते की, संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ नि:स्पृह ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्यालंकारच शिल्लक राहिले.

            जेव्हा आचार्यादी ब्राह्मणांनी पाहिले की, भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंत:करणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले. " प्रभु ! आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञानांधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हांला काय दिले नाहीत बरे ? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरणकमल दिले आहेत. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्ट दैवत मानता. भगवान ! अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...