२३ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय बाविसावा

श्री गणेशाय नमः सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन. च्यवनाला कृती, कृतीला उपरिचरवसू आणि उपरिचरवसू बृहद्रथ इतयादी अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहद्रथ, कुशांब, मत्स्य, प्रत्यग्र,चेदीप इत्यादी चेदिदेशाचे राजे झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता‌. कुशाग्राचा ऋषभ,ऋषभाचा सत्यहीत, सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले.

            अयुताचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि ब्राह्मिक असे तीन पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला. म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभिष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी, तो तरूण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव 'शंतनू' पडले. एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, "तो थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस, म्हणून तू 'परीवेत्ता' आहेस. यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे." जेव्हा ब्राह्मणाने शंतनूला असे सांगितले, तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले होते की, ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला. म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला. आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योगसाधना करीत कलापग्रामात राहात आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील. शंतनूचा लहान भाऊ बाल्हीक याला सोमदत्त पुत्र झाला. सोमदत्तला भूरी, भूरिश्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला. तो सर्वधर्म जाणणाऱ्यांत अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीरसमूहांचा अग्रगण्य नेता होता. त्याने आपले गुरु परशुराम यांनासुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूशी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशरांना भगवंताचे साक्षात कलावतार, वेदसंरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद्भागवत महापुराणाचे अध्ययन केले, हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे. म्हणून माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदूराला जन्म दिला.

            परीक्षिता! धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला शंभर पुत्र व एक कन्या झाली. त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दु:शला होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्रीसहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायु आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले. हे तिघेही महारथी होते.

            हे राजा! तुझे हे जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला, हे समजल्यानंतर जनमेजय क्रोधाने सर्प-यज्ञ करून अग्निकुंडात सर्पाचे हवन करील. तो कावषेय तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंताची आराधना करील.

            हे राजा जनमेजयाचा पुत्र शतानीक होईल. तो याज्ञवल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडाचे तसेच कृपाचार्याकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानीकाचा सहस्त्रानीक, सहस्त्रानीकाचा अश्वमेधज, अश्वमेधजाचा असिमकृष्ण आणि असीमकृष्णाचा पुत्र नेमिचक्र होईल. जेव्हा हस्तीनापुर गंगा नदीत वाहून जाईल, तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमिचक्राचा पुत्र होईल चित्ररथ, चित्ररथाचा कवीरथ, कवीरथाचा वृष्टीमान, वृष्टीमानाचा राजा सुषेन, सुषेणाचा सुनीथ, सुनीथाचा नृचक्षू, नृचक्षूचा सुखीनल, सुखीनलाचा परीप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहद्रथापासून सुदास, सुदासापासून शतानीक, शतानीकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून वहीनर, वहीनरापासून दंडपाणी, दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशाप्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्तिस्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकविले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल. आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो.

            सहदेवापासून मार्जारी , मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल. निरमित्राचा सुनक्षत्र,सुनक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा सृतंजय, सृतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची असेल. शुचीपासून क्षेम,क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शम,शमापासून द्युमत्सेन, द्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीथ, सुनीथाचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहद्रथवंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असेल.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय एकविसावा

श्री गणेशाय नमः गर्गापासून शनी आणि शनीपासून गार्ग्याचा जन्म झाला. गार्ग्य जरी क्षत्रिय होता, तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला. महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता. दुरितक्षयाचे त्रय्यारुणी, कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले. हे तिघेही ब्राह्मण झाले. बृहत्क्षत्राचा पुत्र हस्ती झाला, त्यानेच हस्तिनापुर वसविले होते. हस्तीचे अजमीढ, द्धिमीढ आणि पुरूमीढ असे तीन पुत्र होते. अजमीढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमीढाच्या एका पुत्राचे नाव बृहदिषू होते. बृहदिषूचा पुत्र बृहद्धनू झाला. बृहद्धनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ झाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजित. रुचिराश्र्व, दृढहनू, काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले. रुचिराश्र्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथुसेन. पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव नीप असे होते. त्याचे शंभर पुत्र होते. याच निपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. ब्रह्मदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विष्वकसेन नावाचा पुत्र झाला. याच विष्वकसेनाने जैगीषव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विष्वकसेनाचा पुत्र उदक्स्वन. उदक्स्वनाचा भल्हाद. हे सर्वजण बृहदिषूचे वंशज झाले.

            द्विमिढाचा पुत्र यविनर होता, यवीनराचा कृतीमान. कृतिमानाचा सत्यधृती, सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून सन्नतिमान, सन्नतिमानापासून कृती झाला. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि "प्राच्यसाम" नावाच्या ऋचांच्या सहा संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र नीप होता. नीपाचा उग्रायुध,उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर युद्ध आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमीढाचा भाऊ पुरूमीढ. याला काही संतान झाले नाही. अजमीढाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुज, पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भर्म्याश्र्व झाला. भर्म्याश्र्वाचे मुद़ल ,यवीनर, बृहदिषू, कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र होते. भर्म्याश्र्व म्हणाला- "हे माझे पाच पुत्र पाच देशाचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत, " म्हणून हे " पंचाल" नावाने प्रसिद्ध झाले. यांच्यापैकी मुद्रलपासुन "मौद़ल्य" भाषण नावाचे ब्राह्मणगोत्र सुरू झाले.

            भर्म्याश्वाचा पुत्र मुद़ल याला जुळे झाले. त्यांपैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. गौतमाचा पुत्र शतानंद. शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता. तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान होते. एके दिवशी उर्वशीला पाहताच शारद्वानाचे वीर्य गवतावर पडले, त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्यांच्यावर पडली. दयाळू अंत:करणाने त्याने दोघांनाही उचलून घेतले. त्यांपैकी जो पुत्र होता, त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती, तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोनाचार्यांची पत्नी झाली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय विसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात-परीक्षिता! आता मी राजा पूरुच्या वंशाचे वर्णन करीन. याच वंशात तुझा जन्म झाला आहे. याच वंशातील वंशज पुष्कळसे राजर्षी आणि ब्रह्मर्षीसुद्धा झाले आहेत. पूरुचा पुत्र जनमेजय झाला. जनमेजयाचा प्रचीन्वान, प्रचीन्वानाचा प्रवीर, प्रविराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला. चारूपदापासून सुद्यु, सुद्यूपासून बहुगव, बहुगवापासून संयाती, संयातीपासून अहंयाती आणि अहंयातीपासून रौद्राश्व झाला.

            विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिये उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे ऋतेयू, कुक्षेयू, स्थंडिलेयू, कृतेयू, जलेयू, संततेयू, धर्मेयू, सत्येयू, व्रतेयू आणि सर्वात लहान वनेयू, असे दहा पुत्र झाले.
            परीक्षिता! त्यांपैकी ऋतेयूचा पुत्र रंतिभार झाला आणि रंतिभाराचे सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले. अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते. कण्वाचा पुत्र मेधातिथी झाला. याच मेधातिथीपासून प्रस्कण्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले. सुमतीचा पुत्र रैभ्य झाला. याच रैभ्याचा पुत्र दुष्यंत होता.

            एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता. तेथे तो कण्व मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. त्या आश्रमात देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसली होती. तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता. त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहीत झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला. तिला पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला. त्याच्या मनात कामवासना जागृत झाली. थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने स्मित हास्य करीत तिला त्याने विचारले, "कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या हे देवी! तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस? माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी! या निर्जन वनात तु कशासाठी राहातेस? हे सुंदरी! मला निश्चितपणे असे वाटते की, तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस. कारण पुरुवंशीयांचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही."

            शकुंतला म्हणाली- "आपले म्हणणे बरोबर आहे. मी विश्वामित्रांची कन्या आहे. मेनकेने मला वनांमध्ये सोडून दिले होते. महर्षी कण्वांना हे माहित आहे. मी आपली काय सेवा करू? हे कमलनयना! आपण येथे बसावे आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावे. आश्रमात अन्न आहे. आपली इच्छा असेल तर भोजन करावे. आणि योग्य वाटत असेल तर येथेच राहावे.

            "हे सुंदरी ! तू कुशिकवंशात जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे. कारण राजकन्या स्वत:च आपल्याला योग्य असा पती वरतात. " शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश, काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंताने गांधर्वविधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला. अमोघवीर्य दुष्यंताने शकुंतलेशी सहवास केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला. योग्यवेळी शकुंतलेला एक पुत्र झाला.

            वनामध्ये कण्वांनी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले. तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे.
            भगवंतांचा अंशा अंशांशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणीरत्न शकुंतला पतीकडे आली. आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र याचा दुष्यंताने जेव्हा स्वीकार केला नाही, तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली. "माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे. वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो. कारण पिताच पुत्ररूपाने उत्पन्न होतो; म्हणून दुष्यंता ! तू शकुंतलेचा त्याग करु नकोस. आपल्या पुत्राचे पालन-पोषण कर राजन ! वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे. हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे. "

            दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा जन्म भगवंतांच्या अंशापासून झाला होता. आजसुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गाइली जाते. त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिन्ह होते आणि पायांवर कमलपुष्पाचे. महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर त्याला अभिषेक झाला. भरत अतिशय शक्तिशाली राजा होता. ममताचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित म्हणून नेमून गंगातीरावर पंचावन्न आणि यमुनातीरावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले. या यज्ञांमध्ये त्यांनी अपरंपार धनाचे दान केले. भरताने अग्नीस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली होती. त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक-एक बद्व (१३०८४) गाई दिल्या होत्या. अशा प्रकारे भरताने १३३ यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केले. शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळवून श्रीहरींना प्राप्त करून घेतले. यज्ञामध्ये "मष्णार ' नावाचे एक कर्म असते. त्यामध्ये भरताने सुवर्णविभूषित, पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले. भरताने जे महत्कर्म केले, ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकणार नाही. स्वर्गाला कोणी हात लावू शकतो काय ? भरताने दिग्विजय करतेवेळी किरात, हूण, यवन, अंध्र, कंक,शक, म्लेंच्छ इत्यादी सर्व ब्राह्मणद्रोही राजांना मारून टाकले. पूर्वी बलवान असुरांनी देवांवर विजय मिळवून ते रसातळात राहू लागले होते. त्यावेळी ते देवांगनांना रसातळात घेऊन गेले होते. भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणले. त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते. भरताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व देशांचे एकछत्री राज्य केले. शेवटी सर्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर्य, सार्वभौम संपत्ती, अखंड साम्राज्य आणि हे जीवनसुद्धा मिथ्या आहे, असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय एकोणीसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा प्रकारे स्त्रिला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अध:पात त्याच्या लक्षात आला. तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला. हे भृगुनंदिनी ! पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांची ही शोकान्तिका ऐक. अशाच गृहस्थांविषयी वनात राहाणार्‍या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटते. एक बोकड होता. तो आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता. त्याने स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे, असे पाहिले. तो कामातून बोकड बकरीला विहिरीतून वर कसे काढावे याचा विचार करु लागला. त्याने आपल्या सिंगांनी विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला. जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली, तेव्हा तिला तो बोकड आवडला. तो दाढी-मिशावाला बोकड दुष्ट-पुष्ट, तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता. विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यांनीही त्याला आपला पती केले. त्या बोकडाच्या डोक्यावर कामरूपी पिशाच्च स्वार झाले होते. तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरवून बसला.

            विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की, हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांबरोबर रमत आहे, तेव्हा तिला त्याचे ते कृत्य सहन झाले नाही. तिने विचार केला कि, हा तात्पुरते प्रेम दाखविणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे. म्हणून त्या बकरीने त्या इंद्रियलोलुप बोकडाला सोडून दिले आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली. तो दिन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी "बें-बें" करीत तिच्या पाठोपाठ गेला. परंतु वाटेत तो तिची समजूत घालू शकला नाही. त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता. त्याने रागावून बोकडाचा लटकता अंडकोष कापून टाकला. परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला. त्याला अशाप्रकारचे पुष्कळ उपाय माहीत होते. प्रिये ! अशाप्रकारे अंडकोष जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत विषयभोग घेतले. परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही. हे सुंदरी ! माझीसुद्धा अशीच दशा झाली आहे. तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मीसुद्धा अत्यंत दिन झालो आहे. तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःलाच विसरलो आहे.

             प्रिये ! पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ, जव इत्यादी धान्ये, सुवर्ण, पशू आणि स्त्रिया आहेत, ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाहीत. विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही; जशी तुपाने आग आणखीच भडकते, त्याचप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवीत नाही, तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसते. विषयांची इच्छाच दुःखाचे उगमस्थान आहे. अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही. शरीर म्हातारे होत जाते, पण इच्छा नाही होत. म्हणून जो आपले कल्याण इच्छितो, त्याने तत्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे. आपली आई, बहीण किंवा मुलीबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये. कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात. विषयाचे वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्षे पुरी झाली. तरीसुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे. म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंत:करण परमात्म्यात ठेवून शीत-उष्ण, सुखदुःख इत्यादी द्वन्द्वांच्या पलीकडे जाऊन, अहंकारातून मुक्त होऊन, हरिणांसह वनात विहार करीन. इहलोक-परलोकाचे भोग मिथ्या आहेत, असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये अगर त्यांचे चिंतनही करू नये. त्याच्या चिंतनानेच जन्म-मृत्यू संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो, हे समजून त्यापासून अलिप्त राहणाराच आत्मज्ञानी होय.

            आपल्या पत्नीला असे सांगून ययातीने पुरुला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले; कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषयवासना राहिली नव्हती. यानंतर त्याने अग्निये दिशेकडे द्रुह्यूला, दक्षिणेकडे यदूला, पश्चिमेकडे तुर्वसूला आणि उत्तरेकडे अनुला राज्य दिले. सगळ्या भूमंडलावरील संपत्तीला योग्य अशा पुरुचा आपल्या सिंहासणावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला. ययातीने जरी पुष्कळ वर्षेपर्यंत इंद्रियांद्वारा विषयसुख उपभोगले होते, तरीसुद्धा ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरटे सोडून देतो, त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले. ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली. आत्मसाक्षात्कारमुळे त्याचे त्रिगुणमय लिंगशरीर नष्ट झाले. निर्मळ अशा परब्रह्य वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जाऊन, जी भगवंतांच्या भक्तांना प्राप्त होते, ती गती त्याला मिळाली. देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली, तेव्हा तिला असे वाटले की, हे मला निवृत्ती-मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत; कारण स्त्रि-पुरुषांमध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते, म्हणून मला सावरण्यासाठी यांनी ही कथा थट्टेत सांगितली. पाणपोईवर जसे वाटसरू येतात, त्याप्रमाणे ईश्वराच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात. हा भगवंतांच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे, असे जाणून देवयानीने सर्व पदार्थाच्या आशक्तीचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून, बंधनाला हेतू असलेल्या लिंगशरीराचा त्याग केला. ती म्हणाली, "सर्व जगाचे निर्माणकर्ते, सर्वान्तर्यामी, सर्वांचे आश्रयस्वरूप, सर्वशक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो. जे परम शांत आणि अनंत तत्त्व आहेत, त्यांना मी नमस्कार करते."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अठरावा

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जशी शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिये असतात, तसे नहुषाचे यती, ययाती, संयाती, आयती, वियती, आणि कृती असे सहा पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र येतीला, नहुष राज्य देऊ इच्छित होता, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता. जो राज्यकारभारात प्रवेश करतो, तो आत्मस्वरुपाला विसरतो. जेव्हा इंद्रपत्नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नहुषाला ब्राह्मणांनी इंद्रपदापासून पदच्युत केले आणि त्याला अजगर बनविले, तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला. ययातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केले आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला.

            परीक्षिताने विचारले - भगवान शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय. तर मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय वर असा प्रतिलोम (उलटा) विवाह कसा झाला ?

            श्रीशुक म्हणाले - दानवराज वृषर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणीसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीच्यामध्ये विहार करीत होती. त्या उद्यानात फुलांनी लहडलेले अनेक वृक्ष होते. त्यामध्ये एक मोठे सरोवर होते. सरोवरात कमळे उमललेली होती आणि त्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक-दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या.

            त्याच वेळी तिथे पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर येउन पोहोचले. त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोब वर येऊन त्यांनी आपापली वस्त्रे परिधान केली. शर्मिष्ठाने घाईने नकळत देवयानीचे वस्त्र आपले समजून परिधान केले. यावर देवयानी चिडून म्हणाली. "अग ! पहाणा या दासीचे हे भलतेच धाडस ! कुत्र्याने यज्ञातील हविष्यान्न खावे, त्याप्रमाणे हीने माझे वस्त्र परिधान केले आहे ! ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली, जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत, जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविला, लोकपाल, देवराज, आणि लक्ष्मीदेवीचे आश्रय परमपावन विश्वात्मा भगवानसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करतात, त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही भृगुवंशी त्यात तिचा पिता वृषपर्वा आमचा शिष्य. असे असतानाही शूद्राने वेदपठण करावे, त्याप्रमाणे हिने माझी वस्त्रे परिधान केली. " जेव्हा देवयानी अशाप्रकारे अद्वा-तद्वा बोलू लागली, तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने, डिवचलेल्या नागिणीप्रमाणे नि:श्वास टाकीत दात-ओठ खात तिला म्हणाली. "ऐ भिकारणी ! स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस ? कावळ्या- कुत्र्याप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाळभूतपने पाहात नाहीस काय ?" शर्मिष्ठेने अशाप्रकारे अतिशय कडवट शब्दांनी गुरुकन्या देवयानीला फटकारले आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिले.

             शर्मिष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तेथे येऊन पोहोचला. त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयानीला त्याने पाहिले. त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र नव्हते; म्हणून त्याने आपला शेला तीला दिला आणि दयाळू अंत:करणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढले. अत्यंत प्रेमळ शब्दांत देवयानी वीर ययातीला म्हणाली, "हे वीरशिरोमणे राजन ! आज आपण माझा हात धरलात. आता आपण माझा हात धरला आहे, म्हणून दुसर्‍या कोणीही तो धरू नये. हे वीरश्रेष्ठा ! विहिरीत पडलेल्याकारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले, ईश्वराने ठरविलेला सबंध होय, असेच समजले पाहिजे. यामध्ये मनुष्यप्रयत्न नाहीत. हे वीरश्रेष्ठा ! मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच याला शाप दिला होता. म्हणून त्यानेसुद्धा मला शाप दिला होता की, ब्राह्मण माझे पाणिग्रहण करणार नाही. " हा सबंध शास्त्रविरुद्ध असल्याने ययातीला मान्य नव्हता. परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असून आपले मनसुद्धा हिच्याकडे ओढ घेत आहे, असे पाहून ययातीने तिचे म्हणणे मान्य केले. वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला. तेव्हा देवयानी रडत पित्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली, आणि जे तिने केले, ते सर्व तिने त्यांना सांगितले. ते ऐकून भगवान शुक्राचार्यांचेसुद्धा मन उद्विग्न झाले. ते पौरोहित्याची निंदा करू लागले. त्यांनी असा विचार केला की, यापेक्षा कबुतराप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले. म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडले. वृषपर्व्याला हे समजले, तेव्हा गुरु शत्रूला जाऊन मिळू नये, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याने रस्त्यातच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता. ते वृषपर्व्याला म्हणाले, "राजन ! मी देवयानीला सोडू शकत नाही. म्हणून तिची जी इच्छा असेल, ती तू पुरी कर. " " ठीक आहे" असे वृषपर्व्याने म्हटल्यावर देवयानीने आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, " वडील मला जेथे देतील आणि मी जेथे जेथे जाईन, तेथे शर्मिष्ठा आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी येऊ दे. "

            आपल्या परिवारावर आलेले संकट आणि त्याच्या कार्याचे महत्त्व पाहून शर्मिष्ठेने देवयानीचे म्हणणे मान्य केले आणि एक हजार सख्यांसह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली.

            शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीबरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठेला दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की, " राजन ! हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. परीक्षिता ! थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली. हे पाहून एक दिवस शर्मीष्ठेने सुद्धा आपल्या ऋतुकाळात देवयानीच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली. शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे, हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही, धर्मज्ञ ययातीने प्रारब्धावर भरवसा ठेवला. यदु आणि तुर्वसू असे देवयानीला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला द्रुह्यू, अनु आणि पूरू असे तीन पुत्र झाले. मानी देवयानीला जेव्हा समजले की, शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता, तेव्हा ती रागाने जळफळत पित्याच्या घरी गेली. कामी ययातीने गोड शब्दांनी, पाय चेपणे इत्यादी पद्धतींनी देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; तिच्या पाठोपाठही तो गेला. परंतु तिचे मन वळवू शकला नाही. शुक्राचार्यसुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाले, " तु अत्यंत स्त्रिलंपट, मंदबुद्धी आणि खोटारडा आहेस. म्हणून मनुष्याला कुरूप करणारे वृद्धत्व तुला येवो. "

             ययाती म्हणाला- " ब्रह्मण ! आपल्या कन्येबरोबरच्या विषयभोगात अजून मी तृप्त झालो नाही. " यावर शुक्राचार्य म्हणाले "ठीक आहे. जो तुला आपले तारूण्य देईल, त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात खुशाल तारुण्य घे. " शुक्राचार्यांनी जेव्हा अशी व्यवस्था सांगितली, तेव्हा ययाती आपल्या जेष्ठ यदु नावाच्या पुत्रास म्हणाला. "पुत्रा तू तुझे तारुण्य मला दे आणि तुझ्या आजोबांनी दिलेले हे म्हातारपण तू स्वीकार; कारण हे पुत्रा, मी अजून विषय भोगून तृप्त झालो नाही; म्हणून तुझे आयुष्य घेऊन मी काही वर्ष विषयानंदाचा उपभोग घेईन. "

            यदू म्हणाला - "तात ! आपले हे म्हातारपण अकालीच घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही; कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषयसुखाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही. " परीक्षिता ! अशा प्रकारे तुर्वसू,द्रुह्यू आणि अनुनेसुद्धा आपल्या पित्याचे म्हणणे मान्य केले नाही. खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्त्व माहीत नव्हते. या अनित्य शरीरालालाज ते नित्य मानीत होते. शेवटी ययातीने सर्वांत धाकटा परंतु गुणांनी श्रेष्ठ अशा आपल्या पुरू नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले- "पुत्र ! आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस. "

            पूरू म्हणाला- 'तात ! ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले, अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल ? जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र. सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला मध्यम म्हटले जाते. जो आज्ञा केल्यानंतरसुद्धा मानत नसताना तिचे पालन करतो, तो अधम पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही, त्याला पुत्र म्हणणेच चूक आहे. " परीक्षिता ! असे म्हणून पूरूने मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचे म्हातारपण स्वीकारले. राजा ययातीसुद्धा त्याचे तारूण्य घेऊन पूर्वीप्रमाणेच विषयसेवन करू लागला. तो सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता. आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा इथेच्छ उपभोग घेत होता. देवयानी त्यांची प्रियतमा पत्नी होती. तीही आपल्या प्रियतमाला आपले मन, वाणी, शरीर आणि वस्तूंच्या द्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली. राजा ययातीने सर्व वेदांचे प्रतीपाद्य, सर्वदेवस्वरूप यज्ञपुरुष श्रीहरींचे पुष्कळ दक्षिणांनी युक्त यज्ञांनी पूजन केले. जशा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाहीत, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात हे जग स्वप्न, माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे. हे कधी अनेक नामे आणि रूपांनी प्रतीत होते, तर कधी नाही. ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांचे स्वरूप सुक्ष्माहूनही सुक्ष्म आहे. त्या सर्वशक्तिमान, सर्वव्यापी भगवान श्रीनारायणांना आपल्या हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावाने त्यांचे पूजन केले. अशाप्रकारे हजारो वर्षे त्याने आपल्या उच्छृंखल इंद्रियांना मनाच्या अधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले. परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सतरावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - पुरूरव्याचा आयू नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे तीन पुत्र झाले घरात समुदायाचा एक पुत्र झाले.गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले.
काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वन्तरी. हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोक्ते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वन्तरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ.
भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्यांचे एक नाव प्रतर्दन असेसुद्धा आहे. हाच द्युमान शत्रूजित,वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता ! अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राज्याने सहासष्ट हजार वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती. संततीचा सुनीथ. सुनीथाचा सुकेतन. सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू.
सत्यकेतूपासून धृष्टकेतू, धृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वीतिहोत्र, वीतिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला.

हे सर्व क्षेत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रंभस, त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून प्रक्रिया चा जन्म झाला अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मणवंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते.

देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्ह रजीचा मृत्यू झाला, तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार-विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रति, प्रतिपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृत, कृतापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संस्कृती, संस्कृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुषवंशाचे वर्णन ऐक.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सोळावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी "जशी आपली आज्ञा" म्हणून स्वीकार केला. त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून ते आपल्या आश्रमात परत आले. एकदा रेणुका गंगेवर गेली होती. गंधर्वराज चित्ररथ कमळपुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत, असे तिने तेथे पाहिले.ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. परंतु तेथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला. हवनाची वेळ टळून गेली असे पाहून ती महर्षी जमदग्नि शाप देतील असे वाटून भयभीत झाली. लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. पत्नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाले- "पुत्रांनो ! या पापिणीला ठार करा." परंतु त्यांनी तसे केले नाही. यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले. कारण आपल्या पित्याचे योगसामर्थ्य आणि तपश्चर्येचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते. या कृत्यामुळे सत्यवतीनंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले- "पुत्रा ! तुझी इच्छा असेल, तो वर माग. " परशुराम म्हणाले- "तात ! माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवोत. तसेच मी त्यांना मारले होते, याची त्यांना आठवण न उरो. " परशुरामांनी असे म्हणताच झोपेतून उठावे ,त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले. परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता.

            परीक्षिता ! सहस्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते, त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभरसुद्धा चैन पडत नसे. एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेले होते. ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्रबाहूची मुले तेथे येऊन पोहोचली. त्यावेळी जमदग्नी अग्निशाळेमध्ये पवित्रकीर्ती भगवंतांचेच चिंतन करण्यात मग्न होऊन बसले होते. त्याच वेळी त्या पाप्यांनी त्यांना मारले. परशुरामाची माता रेणुका दिनपणे त्यांना प्रार्थना करीत होती, परंतु ते नीच क्षेत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले. सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकूळ झाली. ती हातांनी आपली छाती बडवित "रामा ! पुत्रा रामा ! लवकर ये, " अशा हाका मारत जोरजोराने रडू लागली. परशुरामांनी लांबूनच आईचा "हे राम !" असा करूण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारले आहे. त्यावेळी परशुरामांना अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर क्रोध, असहिष्णुता, मानसिक व्यथा आणि शोकावेगाने ते दिड्मूढ झाले. " हाय तात ! आपण महात्मे व धर्मनिष्ठ होता. आपण आम्हांला येथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेलात !" अशाप्रकारे विलाप करुन त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावांकडे सोपविले आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला.

             परीक्षिता ! परशुरामांनी माहिष्मती नगरीत जाऊन सशस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या (छाटलेल्या) मस्तकांनी नगरीच्या मधोमध एका मोठा पर्वतच उभा केला. त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती, नीच क्षेत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती. त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली. तिला पाहूनच ब्राह्मणद्रोह्यांचे हृदय भयाने कापत असे. भगवंतांनी पाहिले की, सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत. म्हणून हे राजन ! त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि समंतपंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले. परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्याद्वारे सर्वदेवमय आत्मस्वरुप भगवंतांचे पूजन केले. यज्ञामध्ये त्यांनी पूर्वदिशा होत्याला, दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला, पश्चिम दिशा अध्वर्यूला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गागात्याला दिली. तसेच आग्नेय इत्यादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या. कश्यपांना मध्मभूमी दिली. उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसर्‍या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले. त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापातून मुक्त झाले आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागले. महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली. परशुरामांकडून सन्मानित होऊन ते सप्तऋषींच्या मंडळात सातवे ऋषी झाले. परीक्षिता ! कमललोचन जमदग्नीनंदन भगवान परशुराम पुढील मन्वन्तरामध्ये सप्तषींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. ते आजसुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत. तेथे सिद्ध, गंधर्व आणि चारण त्यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात. सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशाप्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला.

            प्रज्वलित अग्नीप्रमाणे परम तेजस्वी विश्वामित्र गाधीचे पुत्र झाले. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले. परीक्षिता ! विश्वामित्रांना शंभर पुत्र होते. त्यांपैकी मधल्या पुत्राचे नाव 'मधुच्छंद' होते. म्हणून सर्व पुत्र 'मधुच्छंद' या नावानेच प्रसिद्ध झाले. भृगुवंशी अजीगर्ताचा पुत्र जो शुन्य:शेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचे एक नाव देवराज असेही होते. विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले, " तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा. " जो हरीश्र्चद्राच्या यज्ञामध्ये यज्ञपशु म्हणून विकत आणला होता, तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी शुन्य:शेप होय. विश्वामित्रांनी प्रजापती, वरूण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडविले. हाच शुनःशेप देवतांच्या यज्ञात देवांनी विश्वामित्रांना दिला होता. म्हणून "देवै: रात: " या व्युत्पत्तीनुसार गाधिवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला. विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे जेष्ठ होते, त्यांना, शुन:शेपाला मोठा भाऊ मानावा, ही गोष्ट आवडली नाही. यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की, दुष्टांनो ! तुम्ही म्लेंच्छ व्हा, " अशाप्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंच्छ झाले, तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुच्छंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की,. " तात ! आपण आम्हांला जी आज्ञा कराल, तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. " असे म्हणून मधुच्छंदाने मंत्रदृष्ट्या शुन:शापाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले, " आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत. " तेव्हा विश्वामित्र आपल्या या आज्ञाधारक मुलांना म्हणाले " तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले. म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे. मी तुम्हांला आशीर्वाद देतो की, तुम्हांलासुद्धा सुपुत्र प्राप्त होतील. हा देवराज तुमच्याच गोत्राचा आहे. तुम्ही यांच्या आज्ञेत राहा. " विश्वामित्रांचे अष्टक, जय, क्रतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते. अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारणाने त्याचे प्रवरही अन्य झाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...