श्री गणेशाय नमः सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन. च्यवनाला कृती, कृतीला उपरिचरवसू आणि उपरिचरवसू बृहद्रथ इतयादी अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहद्रथ, कुशांब, मत्स्य, प्रत्यग्र,चेदीप इत्यादी चेदिदेशाचे राजे झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता. कुशाग्राचा ऋषभ,ऋषभाचा सत्यहीत, सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले.
अयुताचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि ब्राह्मिक असे तीन पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला. म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभिष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी, तो तरूण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव 'शंतनू' पडले. एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, "तो थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस, म्हणून तू 'परीवेत्ता' आहेस. यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे." जेव्हा ब्राह्मणाने शंतनूला असे सांगितले, तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले होते की, ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला. म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला. आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योगसाधना करीत कलापग्रामात राहात आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील. शंतनूचा लहान भाऊ बाल्हीक याला सोमदत्त पुत्र झाला. सोमदत्तला भूरी, भूरिश्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला. तो सर्वधर्म जाणणाऱ्यांत अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीरसमूहांचा अग्रगण्य नेता होता. त्याने आपले गुरु परशुराम यांनासुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूशी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशरांना भगवंताचे साक्षात कलावतार, वेदसंरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद्भागवत महापुराणाचे अध्ययन केले, हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे. म्हणून माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदूराला जन्म दिला.
परीक्षिता! धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला शंभर पुत्र व एक कन्या झाली. त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दु:शला होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्रीसहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायु आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले. हे तिघेही महारथी होते.
हे राजा! तुझे हे जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला, हे समजल्यानंतर जनमेजय क्रोधाने सर्प-यज्ञ करून अग्निकुंडात सर्पाचे हवन करील. तो कावषेय तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंताची आराधना करील.
हे राजा जनमेजयाचा पुत्र शतानीक होईल. तो याज्ञवल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडाचे तसेच कृपाचार्याकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानीकाचा सहस्त्रानीक, सहस्त्रानीकाचा अश्वमेधज, अश्वमेधजाचा असिमकृष्ण आणि असीमकृष्णाचा पुत्र नेमिचक्र होईल. जेव्हा हस्तीनापुर गंगा नदीत वाहून जाईल, तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमिचक्राचा पुत्र होईल चित्ररथ, चित्ररथाचा कवीरथ, कवीरथाचा वृष्टीमान, वृष्टीमानाचा राजा सुषेन, सुषेणाचा सुनीथ, सुनीथाचा नृचक्षू, नृचक्षूचा सुखीनल, सुखीनलाचा परीप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहद्रथापासून सुदास, सुदासापासून शतानीक, शतानीकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून वहीनर, वहीनरापासून दंडपाणी, दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशाप्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्तिस्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकविले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल. आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो.
सहदेवापासून मार्जारी , मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल. निरमित्राचा सुनक्षत्र,सुनक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा सृतंजय, सृतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची असेल. शुचीपासून क्षेम,क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शम,शमापासून द्युमत्सेन, द्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीथ, सुनीथाचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहद्रथवंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असेल.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा