२२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय एकविसावा

श्री गणेशाय नमः गर्गापासून शनी आणि शनीपासून गार्ग्याचा जन्म झाला. गार्ग्य जरी क्षत्रिय होता, तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला. महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता. दुरितक्षयाचे त्रय्यारुणी, कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले. हे तिघेही ब्राह्मण झाले. बृहत्क्षत्राचा पुत्र हस्ती झाला, त्यानेच हस्तिनापुर वसविले होते. हस्तीचे अजमीढ, द्धिमीढ आणि पुरूमीढ असे तीन पुत्र होते. अजमीढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमीढाच्या एका पुत्राचे नाव बृहदिषू होते. बृहदिषूचा पुत्र बृहद्धनू झाला. बृहद्धनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ झाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजित. रुचिराश्र्व, दृढहनू, काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले. रुचिराश्र्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथुसेन. पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव नीप असे होते. त्याचे शंभर पुत्र होते. याच निपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. ब्रह्मदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विष्वकसेन नावाचा पुत्र झाला. याच विष्वकसेनाने जैगीषव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विष्वकसेनाचा पुत्र उदक्स्वन. उदक्स्वनाचा भल्हाद. हे सर्वजण बृहदिषूचे वंशज झाले.

            द्विमिढाचा पुत्र यविनर होता, यवीनराचा कृतीमान. कृतिमानाचा सत्यधृती, सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून सन्नतिमान, सन्नतिमानापासून कृती झाला. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि "प्राच्यसाम" नावाच्या ऋचांच्या सहा संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र नीप होता. नीपाचा उग्रायुध,उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर युद्ध आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमीढाचा भाऊ पुरूमीढ. याला काही संतान झाले नाही. अजमीढाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुज, पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भर्म्याश्र्व झाला. भर्म्याश्र्वाचे मुद़ल ,यवीनर, बृहदिषू, कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र होते. भर्म्याश्र्व म्हणाला- "हे माझे पाच पुत्र पाच देशाचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत, " म्हणून हे " पंचाल" नावाने प्रसिद्ध झाले. यांच्यापैकी मुद्रलपासुन "मौद़ल्य" भाषण नावाचे ब्राह्मणगोत्र सुरू झाले.

            भर्म्याश्वाचा पुत्र मुद़ल याला जुळे झाले. त्यांपैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. गौतमाचा पुत्र शतानंद. शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता. तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान होते. एके दिवशी उर्वशीला पाहताच शारद्वानाचे वीर्य गवतावर पडले, त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्यांच्यावर पडली. दयाळू अंत:करणाने त्याने दोघांनाही उचलून घेतले. त्यांपैकी जो पुत्र होता, त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती, तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोनाचार्यांची पत्नी झाली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...